या आधीचे भाग
2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला
3)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा
4)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस तीसरा
5)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस चौथा
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्फिंगला तिथल्याच एका जवळच्या बीचवर गेलो. ज्या बीचवर आम्ही गेलो होतो तो वरकला पासून तीन चार किलोमीटर लांब होता आणि तिथे पाण्याची उंची फार काही नव्हती. कमरेपेक्षा जास्त पाणी तिथे होते. बरेचसे देशी विदेशी पर्यटक तिथे आधीपासूनच सर्फिंग करत होते. सकाळी सात ते आठ असा एक तासाचा वेळ होता.
तेथे गेल्यावर त्यांनी आम्हाला स्विमिंग ड्रेस ,त्याचबरोबर सर्फिंग पॅड , त्यावर कसे उभे राहायचे, लाट आल्यानंतर नेमके काय करायचे, अशा पद्धतीच्या काही सूचना दिल्या व हलका व्यायाम करून घेतला. आमच्या सोबत अजून दोन नवरा बायकोचे ग्रुप होते. खरंतर त्या सर्व्हिंग पॅड वरती पूर्णपणे हात वर करून आडवे झोपायचे आणि लाट आल्यानंतर पटकन हात छाती खाली घेऊन पाय न वाकवता उभे राहून तोल सांभाळायचा अशा पद्धतीच्या पाच ते सहा वेळा प्रॅक्टिस करून घेतले.
त्यावेळी ते सहज जमले कारण आम्ही वाळूवर होतो. नंतर आम्ही आमचे सरफिंग पॅड हातात घेऊन समुद्रात गेलो. एक माणूस समुद्राच्या काठावर देखरेखीसाठी उभा होता आणि तीन-चार मदतनीस समुद्रात आमच्या मदतीसाठी होते.
मी, माझा नवरा आधी आत गेलो. मुलाला त्यांनी सगळ्यात शेवटी थोडा वेळ देणार असे सांगितले. साधारण छातीला लागेल एवढ्या पाण्यामध्ये आम्ही त्या सर्फिंग पॅड वरती आडवे झोपलो आणि लाट कधी येते आहे हे पाहू लागलो. मदतनीस लोकांनी पॅड धरले होते आणि लाट आली की ते सोडणार होते व आम्हाला त्यासाठी वरती उभे राहण्यासाठी सांगितले होते. आणि लाट आली ……. लाट येताच मी छातीखाली दोन्ही हात घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे मी आता पाण्यावरती होते त्यामुळे ते सर्फिंग पॅड एका दिशेला म्हणजेच उजव्या बाजूला कलंडले आणि मी पाण्यात पडले…….!!! पाण्यात पडल्यानंतर तेथील रेती वरती उभे राहायचे असे आम्हाला सांगितले होते. पण मी उभे राहण्याचा प्रयत्न करताच पायाखालची वाळू सरकून जात होती. मी हातपाय मारत होते आणि जवळपा पंधरा सेकंद पाण्याखाली होते. मग तिथल्या इन्स्ट्रक्टरने जवळ येऊन मला पाण्याबाहेर काढले. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत भयानक होता. याचे कारण म्हणजे त्या पॅड वरती उभा राहणे हा काही खेळ नाही. आणि एका दिवसात अशा प्रकारचे कौशल्य येणे हे केवळ अशक्य आहे. तिथे अनेक परदेशी पर्यटक या सगळ्या गोष्टी सहज करत होते. पण आम्हाला काही या गोष्टी जमत नव्हत्या. माझ्या मिस्टरांनी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी ते जमवले. जमवले म्हणजे काय , तर पहिल्या लाटेतच त्यांना कळाले की या पॅड वर उभे राहता येणे शक्य नाही. तेव्हा त्यांनी लाट येतात पॅड वरती तसेच झोपून राहत होते व लाटांवर तरंगण्याचा आनंद घेत होते. त्यांचे काय चालले आहे याकडे माझे लक्ष नव्हते. परंतु मी मात्र पाण्यात बुडतच होते. सोबतच्या इन्स्ट्रक्टरने दोन-तीन वेळेला मला बुडता-बडता बाजूला काढले. शेवटी ते म्हणाले की तुम्ही हे करू नका जमणार नाही. चुकून तुम्ही बुडाल. जवळपास चार ते पाच वेळा मी समुद्राच्या आतल्या पाण्यामध्ये दहा-पंधरा सेकंद बुडले होते. त्यामुळे आता पाण्यात पडले तर बुडण्याची भीती राहिलेली नाही.
मी निमूटपणे किनाऱ्यावर येऊन सासूबाईंच्या जवळ उभी राहिले. त्या खरच खूप घाबरल्या होत्या आणि माझे बुडणे पाहून त्या म्हणाल्या मी काही हे करणार नाही. मग तिथेच एका सर्फिंग पॅड वरती मी सासूबाईंना आपण फोटो काढूयात म्हणले त्यावर समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेला सरफिंग इन्स्ट्रक्टर मात्र ओरडला की असे काही करू नका मी सांगेन त्याच वेळेला फोटो काढा ते धोकादायक आहे, असे सांगू लागला. मला कळेना की यात काय नेमकं धोका आहे. तो आगाऊपणा करतोय असं मला वाटायला लागलं . एक दहा पंधरा मिनिटे गेली असतील आणि तेवढ्यात अचानकच एक मासेमारीची बोट जोरात आल्यावर ती त्यांनी सर्व सर्व्हिंग करणाऱ्यांना बाजूला व्हा बाजूला असे जोरजोरात बोलून बाजूला व्हायला सांगितले. आम्हाला कळेना नेमकी काय झाले . ती बोट आडवी तीडवी अशी कशीपण येत होती आणि शेवटी कशीतरी करून ती किनाऱ्याला लागली. किनाऱ्यावरचे सगळे ममच्छीमार धावत तिकडे गेले आणि त्यांनी ती बोट अडवली होती. मी त्यांना विचारले की एवढे तुम्ही का घाबरलात? हे तर तुमचं रोजचं काम असेल की बोट कुठे पार्क करायचे? बाकीच्यांना बाजूला व्हायला का सांगत होता ? त्यावेळी त्यांनी एक भयानक गोष्ट सांगितली ती म्हणजे त्या बोटीला आतून ब्रेक नसतो म्हणे!!!! त्यामुळे वाटेत जर कोणी आलं तर त्यांना ती पूर्ण धडकूनच जाते. याआधी तिथे असे अनेक अपघात झालेले आहेत. तसेच यामध्ये कित्येक विदेशी पर्यटकांची हाडे फ्रॅक्चर झालेली आहेत. असे त्यांनी सांगितले. ते ऐकल्यानंतर मात्र मला खरंच भीती वाटली. हे सरफिंग च खुळ उगाच आपण काढलं असं मला वाटलं. हे अत्यंत रिस्की आहे. कारण तिथे सर्फिंग करणाऱ्या कंपन्या कितीही काळजी घेत असल्या तरी बऱ्याच गोष्टींवर त्यांचा कंट्रोल नाही हे स्पष्ट दिसत होतं.
मुलाला मात्र पहिल्याच झटक्यात सरफिंग पॅड वर उभे राहता आले. त्याने तीन ते चार वेळा सर्फिंगचा आनंद घेतला.
तथापी तो लहान असल्यामुळे त्यांनी त्यापेक्षा जास्त वेळा त्याला ते करू दिले नाही. थोडेफार फोटो शूटिंग करून व समुद्राच्या पाण्यात खेळून एकंदरीतच सरफिंग साठी घातलेले पैसे पुरेपूर वसूल केले .असो. कोणी फॅमिली येथे जाणार असाल तर त्यांना हे सर्व माहिती असावे म्हणून मी मुद्दाम हे लिहीत आहे. फॅमिली साठी वर्कला ही जागा योग्य नाही असं माझं निरीक्षण आहे.
साधारण साडेनऊ ते दहा वाजता रूमवरून आंघोळ करून नाश्ता करण्याकरता कालच्याच हॉटेलमध्ये पोहोचलो. तेथे केरळाचा पारंपारिक नाश्ता पुट्टु आणि कडला करी म्हणजेच चण्याची उसळ या वरती ताव मारला.
हा पट्टू, कडला करी व व्हेज कुर्मा यासोबत दिला होता. आम्ही पापड वेगळ्याने मागून घेतले. पुट्टूला स्वतःची अशी वेगळी काही चव नसते. तांदळाचे पीठ त्यावरती ओल्या नारळाचा कीस परत तांदळाचे पीठ त्यावर ओल्या नारळाचा कीस अशा एका साच्यामध्ये भरून तो वाफवून काढतात. त्यामध्ये कडला करी व पापड मिक्स करून खातात. या हॉटेलमधली कडला करी अतिशय चविष्ट होती. अजिबात स्पायसी नव्हती . आम्ही एक्स्ट्रा मागून घेतली . पोटभर नाश्ता करून तृप्त मनाने आम्ही बाहेर पडलो.
त्यानंतर जटायू अर्थ सेंटर कडे प्रस्थान केले. जटायू अर्थ सेंटर हे वर्कला पासून साधारण दीड तासाच्या अंतरावर आहे. आता थोडे जटायू अर्थ सेंटर बाबत…. जटायूचे हे शिल्प एखाद्या पक्ष्याचे असलेले आशियातील सर्वात मोठे शिल्प आहे. या शिल्पाचे शिल्पकार आहेत राजीव अंचल. हे शिल्प दोनशे फूट लांब दीडशे फूट रुंद व 70 फूट उंच आहे. जर आपण त्रिवेंद्रमच्या आसपास असाल तर हे पर्यटन स्थळ अजिबात चुकवू नये असेच आहे.
आम्ही तिथे साडेबाराच्या सुमारास पोचलो. तेथे केबल कारने जटायूच्या शिल्पा जवळ जावे लागते.
केबल कारने शिल्पा जवळ पोहोचण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. वाटेतील दृश्य ही अत्यंत सुंदर आहेत. केबल कार साठी साधारण आम्हाला 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले.
केबल कार मधून जटायू शिल्पाचे होणारे पहिले दर्शन
वरती राम लक्ष्मण सीतेचे देऊळ आहे. श्रीरामाचे प्रत्यक्षातले दगडात उमटलेले पाय आहेत असे म्हणतात.
साधारण हे सर्व पाहून आम्हाला तिथून परत यायला दुपारचे दोन वाजले.
आम्हाला आता कन्याकुमारीला जायचे होते . शमी भाई ने आम्हाला सुचवले की त्याला कन्याकुमारीला जाण्यासाठी गाडीचे परमिट काढावे लागते तेवढ्या वेळात तुम्ही पुवरला बोटिंग करून घ्या. म्हणजे आपल्याला परत उलटे तिकडे यायला नको .आम्ही ते मान्य केले आणि पूवरला साधारण आम्ही पाच वाजता पोहोचलो. पूवर वरून आम्ही एक बोट ठरवली. ते आम्हाला गोल्डन सँड बीच, एलिफंट रॉक व मदर मेरी या पॉईंट वरती नेणार होते. तेथे आम्हाला सूर्यास्त पाहता येणार होता .
हा देखील एक अविस्मरणीय व न चुकवू नये असा अनुभव ठरला. जरी मुनरो आयलँड मध्ये आपण बोटिंग केले तरीही पूवर मध्ये स्पीड बोट ने केलेले बोटिंग हा एक वेगळा अनुभव होता. दोन्ही ठिकाणी तेच पक्षी, प्राणी दिसत असले तरीही निसर्ग अत्यंत वेगळा आहे !!!
आम्हाला तुलनेने संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप भरपूर असे पक्षी दिसले.
अत्यंत घनदाट अशा खारफुटी जंगलातून आपण जात आहोत असा अनुभव तिथे येतो. जो मुनरो आयलंड मध्ये येत नाही…
इथले पाणी जरी गढूळ असले तरी झाडी मात्र घनदाट आहे.
शेवटी आम्ही गोल्डन सँड बीच वरती पोहोचलो . येथे एका बाजूला नेयर नदी आणि एका बाजूला अरबी समुद्र आणि मधेच तो बीच आहे . हे दृश्य फार सुंदर आहे!!!
आम्ही येथे सूर्यास्ताचे अत्यंत मनोहर असे दृश्य पाहिले!!! आणि परत निघालो .
येताना हा एलिफंट रॉक दिसतो. याचा आकार हत्तीसारखा आहे म्हणून याला एलिफंट रॉक म्हणतात .
मदर मेरी
क्लब महिंद्रा चे फ्लोटिंग रिसॉर्ट
परतत असतानाची काही सुंदर निसर्ग चित्रे
.अत्यंत तृप्त मनाने आम्ही कन्याकुमारी कडे प्रस्थान केले ….त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. पूवर येथील बोटिंग मुळीच चुकवू नये आणि शक्यतो संध्याकाळी किंवा पहाटे लवकर बोटिंग करायला मिळेल हे पाहावे असे सुचवेन. कारण या वेळेला पक्ष्यांची संख्या खूप जास्त असते. तसेच तुम्हाला सूर्योदय व सूर्यास्त पाहता येईल. जो अत्यंत सुंदर व मनोहर आहे.
कन्याकुमारीला जाताना आम्हाला वाटत चित्रा नावाचे एक हॉटेल सापडले. हे हॉटेल जर कोणी जाणार असेल तर जेवणासाठी मुळीच चुकवू नये असे आहे. इथला मेदुवडा हा मी आतापर्यंत खाल्लेला जगातील सर्वोत्तम मेदुवडा आहे. हा मेदू वडा इतका चांगला होता की तो नुसताच खावा अशी त्याची अत्यंत फ्रेश चव होती .मेदुवडा फस्त करून झाल्यानंतर लक्षात आले की अरे आपण तर फोटो काढलाच नाही. त्यामुळे याचा फोटो माझ्याकडे नाही . येथेही आम्ही मलाबार पराठा व पनीरची भाजी, तसेच मशरूम फ्राईड राईस घेतला.
फारच चविष्ट होता. पुन्हा इथे जेवायला यायचे हे आम्ही ठरवले. मुळात हे हॉटेल तमिळ थाळी साठी प्रसिद्ध होते. त्यामुळे पुन्हा येताना इथे जेवायला मिळाले तरी यायचे हे ठरवूनच आम्ही निघालो. कन्याकुमारीला आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. चेकइन करून आम्ही सामान टाकले आणि निद्रादेवीच्या आधीन झालो . उद्या आम्हाला कन्याकुमारी येथील स्थळ दर्शन करायचे होते. कन्याकुमारीच्या अप्रतिम स्थलदर्शनाची गोष्ट पुढील भागात…..