१९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली. लोकशाही असलेल्या देशासाठी हा निश्चितच दुःखद प्रसंग होता. लोकाना आंदोलने वगैरे करता येत नव्हते, झोपडपट्टी हटवणे नी नसबंदीची चुकीची अंमलबजावणी हे दोन मुद्दे पुढे रेटले जातात. पण ह्या आणीबाणीला एक चांगली बाजूही आहे. आजही बर्याच सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत, लाचलुचपत खात्याने सरकारी अधिकारी पकडला तरी “निर्दोष” सुटेपर्यंत त्याचा पगार चालू राहतो, बऱ्याच वर्षांनी काम न करता पगार घेऊन तो परत त्याच नोकरीला चिकटतो. श्रीमंत माणसाने कार चालवून लोक मारले तरी त्या श्रीमंता साठी अख्खी सरकारी यंत्रणा कामाला
लागते, उशिरा ब्लड सँपल घेतले जातात नी ते बदललेही जातात. मुंबई पुण्यासारखे शहर पहिल्या पावसातच तुंबतात, कारण नाले /गटार सफाईत भ्रष्टाचार झालेला असतो. कुठेतरी वाचल की मुंबई फक्त आणीबाणी काळात तुंबली नव्हती, कारण नालेसफाई व्यवस्थित झाली होती.
तसेच एका मिपाकराचा अनुभव वाचला
“आणिबाणीपूर्वी एका ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या सरकारकडून फार अपेक्षा नव्हत्या. रेशनला रांगा लावूनही कधी रॉकेल मिळायचे नाही तर कधी साखर संपून जायची. रेशनचा काळा बाजार जोरात चालू असे. एसटी आगारातून खेड्यापाड्यात जाणाऱ्या गाड्या कधीही वेळेवर सुटत नसायच्या आणि बऱ्याचश्या फेऱ्या रद्द व्हायच्या. संपूर्ण आगारातून कायम गर्दी असायची. रात्रीच्या मुक्कामी गाडीलाही गर्दी असायची आणि बऱ्याचदा काहीतरी सटर-फटर कारणाने तीही रद्द झाली की एस्टी आगारातच रात्री मुक्काम करावा लागत असे. तेव्हा रिक्षासारखी खाजगी वाहने तुरळक असायची आणि ती भरायलाही तास तास थांबायला लागायचे. संध्याकाळी तर खेड्यापाड्यात रिक्षा जात नसत. आणीबाणीत रेशन वेळेवर मिळायचे, रॉकेल संपले किंवा साखर संपली असे कधी होत नसे . कोणी तक्रार करेल म्हणून रेशन दुकानदार शिधापत्रिका व्यवस्थित भरत असे. एसटी आगारातून वेळच्या वेळी गाड्या सुटत, गाड्या रद्द होणे बंद झाले त्यामुळे गाड्यांमध्ये होणारी गर्दी कमी झाली. रात्रीच्या शेवटच्या गाडीला फारच कमी प्रवासी असतं. जि. प. च्या कार्यालयात कधी कर्मचारी वेळेवर येत. साहेबपासून शिपयापर्यंत सगळे कार्यालयीन वेळेत जागेवर सापडायचे त्यामुळे कामेही झटपट होत असत. शाळेत जाताना किंवा येताना एसटी वेळेवर मिळत असल्याने वेळेची बचत होत होती.”
मी अनेक वयस्क लोकांशी बोललो, ते सर्वसामान्य होते, आणीबाणीत सामान्य माणसाला काहीही त्रास नव्हता असेच त्यांच्या बोलण्यातून दिसले. सरकार “सरकार” म्हणून काम करत होते, सरकारी अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक होता, सरकारी नोकर वेळेवर कामावर दाखल होत, रेल्वे वेळेवर धावत होत्या, रस्त्यावर गाडे लाऊन जागा अडवल्या जात नव्हत्या, रात्री फिरायला बंदी होती त्यामुळे गुन्हे कमी झाले होते.
वरील सर्व जर खरं असेल तर आणीबाणी हा भारतासाठीचा सुवर्णकाळ मानावा का?? सर्वसामान्य माणसास हवेच काय असते आणखी?
ता.क- विनोबा भावे ह्यानी आणीबाणीस “अनुशासन पर्व” असे संबोधले होते.