कां कुणास ठाऊक आज प्रो.देसाई मला म्हणाले ” सामंत,आज तुम्ही जरा उदास,उदास दिसता.कारण समजेल का? मी म्हणालो ” हे बघा, भाऊसाहेब मी एव्हड्या कविता लिहीतो,बरेच वेळा तुम्ही मला स्फूर्ती दिलीत आणि मी लिहीत गेलो.बरेच जणाना मी कविता पाठवतो,पण मी पहातोय तुम्ही आणि एक दोन सोडले तर इतर कोणी टीका पण करत नाहीत.का कळत नाही.” त्यावर भाऊसाहेब म्हणाले ” सामंत तुम्ही लिहित चला,कुणी गाईली नाही,वाचली नाही,आणि वाचून ऐकली नाही तरी हरकत नाही.”हे त्यांचे शब्द ऐकल्यावर मला एक कविता सुचली.
माझ्या कविता
कुणिही गात नाही
कुणिही वाचत नाही
वाचली तरी ऐकत नाही
परंतु
कविता लिहील्याविना
मला राहवत नाही
लिहूया कविता म्हणून
लिहिली जात नाही
विचारांच्या वेलीची
शब्दरुपी फुलें जेव्हा
मनाच्या पाण्यात
एकत्र तरंगतात
तेव्हा कविता लिहिल्या
वाचून रहावत नाही
दुःखा मागून
आनंद डोकावतो
यातना मागून
निर्मीती होते
कवितेचे असेच आहे
अशावेळी
कविता लिहील्यावाचून
रहावत नाही
अन तुम्ही
गायिलीत नाही
वाचलीत नाही
आणि वाचून
ऐकलीत नाहीत
तरी हरकत नाही
कविता लिहील्या शिवाय
मी सोडणार नाही.