कविता लिहायच्या, आपणच खर्च करून कवितासंग्रह काढायचा आणि पुस्तकाच्या दुकानात पुस्तक विकायला ठेवा म्हणून विचारायला गेलं तर “कवितेची पुस्तक कुणी घेत नाहीत म्हणून,” उत्तर मिळणार, मग आपली पुस्तकं आपणच लोकपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा. काही जण विकत घेतातही काही अशीच. ज्यांना आपण पुस्तक देतो ते तरी वाचतात की नाही हा प्रश्न? जर लोकं आपल्या कविता वाचणार नसतील तर का लिहायच्या कविता? हा प्रश्न बरेच दिवस डोक्यात घोळत होता, त्यापेक्षा आपण गद्यलेखन केलेलं बरं. गद्यलेखन जरा बऱ्यापैकी लिहीत होतो, लोकांना आवडत ही होतं. पण कविता काही माझी पाठ सोडत नव्हती, आणि एके दिवशी डोक्यात विचार आला आपण कविता लिहितो त्यापेक्षा गीतकार म्हणून प्रयत्न करायला काय हरकत आहे. पण सुरवात कशी करायची? मी कविता लिहीत होतो आणि कुसुमाकर मासिका साठी पाठवत होतो, कधी मायबोली वर लिहीत होतो. पण कधी कोणत्या कार्यक्रमाला न गेल्यामुळे माझ्या फारशा ओळखी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे कुणी मार्गदर्शन करणारं ही नव्हतं म्हणून गूगल आणि यूट्यूब वरून थोडीफार माहिती मिळवली, गूगल वरून काही डायरेक्टर, प्रोड्यूसरचे ईमेल आयडी मिळवून बऱ्यापैकी असणाऱ्या भावगीत प्रकारच्या रचना पाठवून देत होतो. पण कुणाकडून ही काही उत्तर येत नव्हतं, तरीसुद्धा कुठून कुठून नंबर शोधून कविता पाठवतच होतो. हळूहळू प्रतिसाद मिळू लागला पण कुणाला “सैराट” सारखं गाणं हवं असायच तर कुणाला “ओ शेठ” काही मंडळी अजूनही सैराट मध्ये अडकून होती. पण एक गोष्ट कळली की लोकांना जसं हवं तसंच लिहायला हवं,त्याप्रमाणे ते सांगतील तसं लिहायला लागलो. कुणाला आवडत होतं आपण हे गाणं करायचं आहे म्हणून काहीजण सांगायचे ही पण पुढं काहीच घडत नव्हतं. आता पर्यंत कळून चुकलेलं आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी अवघड आहे या क्षेत्रात सुरवात करणं पण तरीसुद्धा प्रयत्न सोडले नाहीत आणि आता एक गाणं तयार झालं. ही जरी छोटीशी सुरवात असली तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, आणि जरी मी माझ्या कवितांना न्याय देऊ शकलो नाही तरी, गाण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करायचे म्हणून हा लेखनप्रपंच.
एकदा गाणं नक्की ऐका आणि कसं वाटलं ते सांगा.