पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल. स्त्रीमुक्तीचा विचार जसा सशक्त होत गेला तसा विवाह संस्थेचे भवितव्य अशक्त होत गेले.पुढील काही शतकात विवाह संस्था नामशेष होत जाईल असे आमचे भाकित आहे.आपला देश किमान तीन शतकात एकाच वेळी वावरतो. त्यामुळे कैक पिढ्या जातील. विवाह संस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन वाढत जाईल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सहजीवन व व्यक्तिस्वातंत्र्य एकाच वेळी जपता आले पाहिजे हा विचार लिव्ह इन मधे करार स्वरुपात केला जातो. अजून हा प्रकार प्रायोगिक अवस्थेत आहे. पण भविष्यात याला चांगले दिवस आहेत असेही भाकित या निमित्त वर्तवतो.
पुरोगामी विचारांच्या जेष्ठ लोकांच्या सहजीवनात अजून एक बाब येते. जेष्ठत्वाच्याच नव्हे तर एकूण सहजीवनातील प्रवासात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास ही स्वतंत्रपणॆ होत असतो. तो या टप्पात परस्पर पूरक राहिला असतोच असे नाही. दोन्ही व्यक्तिमत्वे विचारांनी, आर्थिक दृष्ट्याही स्वतंत्र असतात. तसेही सहजीवन ही तडजोडच असते. पुरोगामी विचारांमधे व्यक्ति स्वातंत्र्याला, विचार स्वातंत्र्याला अधिक महत्व आहे. सहजीवनाच्या एका टप्प्यावर जेव्हा व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक राहत नाहीत त्या टप्प्यात तडजोडी करत सहजीवन जगणे जाचाचे बनत जाते. चिडचिड वाढते. आतापर्यंत सहन केले आता नाही असा विचार बळावू लागतो. शिवाय तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असता. मग आता तडजोडी करत का जगायचे? आता पर्यंत केल्याच ना! तुमचे उर्वरित ऎक्टिव्ह आयुष्य थोडे असते. ते आपल्या मनाप्रमाणे जगावे असे वाटत राह्ते. त्यात सहजीवनाचे ओझे व्हायला लागते. त्यामुळे उतारवयातही घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे निरिक्षण तसे धक्कादायक वाटते. ज्या काळात एकमेकांना एकमेकांची गरज आहे त्याच काळात हे प्रमाण कसे वाढत चालले असा प्रश्न उपस्थित होतो. तसेही जेष्ठ ही काही एकजिनसी संकल्पना नाही. पण मुले व आईवडील अशा चौकटीत सोयीसाठी ती एकजिनसी ग्राह्य धरली जाते. व्यक्तिस्वांतंत्र्याचा अतिरेक असे जरी म्हटले जात असले तरी कुठल्या बिंदूपासून तो अतिरेक व कुठपर्यंत तो विवेकी असे काही ठोस उत्तर नसते. ते सापेक्ष आहे.अनेकदा असे होते की आयुष्याच्या उत्तरार्धात पतिपत्नी एकमेकांना कंटाळलेले असतात. मग एकमेकांची डोकी खात बसतात. तडजोडींची संख्या वाढायला लागक्ली की "सहजीवन" हे "सहनजीवन" होते. मग मागचे हिशोब निघतात. कधी जुने हिशोब चुकते केले जातात. असे स्कोअर सेटलिंग चालू असते. या वयात घटस्फोट घेणे ही एकमेकांना परवडणारे नसते मग नाईलाजाने संसार रेटत राहतात. तुम्ही एकटे राहिलात तरी ही समाजाशी तडजोड ही करावीच लागते. मग अपरिचतांशी तडजोड करत बसण्यापेक्षा परिचितांशी तडजोड केलेली बरी असा समन्वय साधला जातो.
करोना काळात एक निरिक्षण आहे. हे निरिक्षण जेष्ठांच्या सहजीवनालाही लागू आहे. एकमेकांच्या "स्पेस" वर या सामायिक काळात अतिक्रमण झाले. एकमेकांच्या सहवासात जास्त काळ गेल्याने एकमेकांचे गुणदोष समोरासमोर प्रकर्षाने दिसू लागले. परिणिती एकमेकांना सहन करण्याची वेळ आली. कुटुंबासाठी वेळ दया, घरासाठी वेळ द्या हे जे पुर्वी सांगाव लागायच तेच इथे प्रश्नांकित झाले. घटस्फोट ही बाब असफल वैवाहिक जीवन, विवाहाचे अपयश अशी मानली जाते. त्यामुळे वाढलेल्या घटस्फोटांची संख्या ही विवाहसंस्थेला उतरती कळा किंवा विवाहसंस्थेची गरज कमी कमी होत चालल्याचे लक्षण म्हणता येईल. आता त्याला पर्यायी व्यवस्था म्हणुन लिव्ह इन रिलेशनशिप उदयास आली आहे. त्याचे प्रमाण ही एका वर्गात लक्षणीय वाढते आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशा तत्वावरचे हे एक प्रकारचे ट्रायल मॅरेज आहे. तो सामंजस्याने सहजीवन जगण्याचा एक प्रकारचा करार आहे. तो लिखित वा मौखिक/ अलिखित असू शकतो. त्याला कायद्याची मान्यताही आहे. स्त्री व पुरुष दोघेही कमावते असल्याने एकमेकांच्या प्रॉपर्टीवर, आर्थिक कमाईवर हक्क न सांगता परस्परांची लैंगिक, वैचारिक, सांस्कृतिक भूक परस्पर संमतीने भागवून सहजीवन जगणे हा हेतु. या सहजीवनाच्या प्रवासात होणार व्यक्तिमत्वातील बदल जर परस्परांना घातक ठरु लागले तर सहजीवनातून बाहेर पडण्याचे प्रत्येकाचे हक्क सुरक्षित ठेवुन हा मार्ग अवलंबला जातो. अजून तरी हा प्रायोगिक अवस्थेत आहे. एकमेकांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा अवकाश जपत सहजीवन जगणे ही तशी कसरतच आहे. त्यासाठी विवेकी प्रगल्भता लागते. ती आपोआप येत नाही. तो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. आपली शारिरिक व मानसिक प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स, सायकियाट्रिस्ट,सायकॉलॉजिस्ट, कौन्सिलर्स अशा तज्ञांची मदत घ्यावी लागते. काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. शरीराच्या फिटनेसाठी जशा जिम्स आहेत तशा मनाच्या फिटनेसाठी माईंड जिम्स ही आहेत.
मला वाटते 2021 मधे जेष्ठांचे लिव्ह इन हे सरिता आव्हाड यांचे लोकसत्तेतील पंधरा दिवसांनी चालणारे सदर सर्वांनीच वाचले असेल. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी निरिक्षणे व उदाहरणॆ त्यात दिली आहेत.