श्रीगणेश लेखमाला २०२३ - बाप्पा आणि हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु

गणपती उत्सवाचे दिवस आहेत. वाजतगाजत गणपतीचं आगमन झालंय. कुठे दीड दिवसांचा गणपती असतो, तर कुठे पाच दिवसांचा. कुठे सात दिवसांचा, तर कुठे दहा दिवसांचा. गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवसांचा हा उत्सव असतो. गणपतीची आई गौरी. तीसुद्धा या उत्सवात येते. तिच्या येण्याचा दिवस, जेवणाचा दिवस आणि ती जाण्याचा दिवस,असे तीन दिवस ती असते. काही घरांमध्ये गौरी-गणपती एकदमच जातात. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात, तर काही ठिकाणी पाणवठ्यावरचे पाच खडे पाण्याने भिजवून ते आंब्याच्या पानांनी सजवलेल्या कलशात ठेवतात. त्याच गौरी.

गणपतीबाप्पा आले की की सगळीकडे उत्साह संचारतो. त्याच्यासाठी मखर सजवलं जातं. दिव्यांचा लखलखाट केला जातो. त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
फोटो

गौरीसाठी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात.

photo

नैवेद्य दाखवला जातो. पहिल्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्याची षोडशोपचारे पूजा केली जाते. दुहीसांज गणपतीची आरती केली जाते. देशावरचा चाकरमानी कोकणात गावी जातो. सार्वजनिक गणपतीही असतात. त्यात तर काही वाईट घटनाही घडतात. धिंगाणा, हैदोस घातला जातो. मोठ्या आवाजात गाणी काय, दारू, भांग पिऊन केलेले हिडीस नाच काय! त्यामुळे ध्वनिप्रदूषण होतं, वायुप्रदूषण होतं, वाहतूक कोंडी होते. काही जणांना याचं भानच नसतं. अर्थात याला अपवाद आहेत. पण हेही तितकंच खरं आहे की सर्वसामान्य माणूस अशा उत्सवांमुळे मुक्त, मोकळा होतो. वर्षभरात पोटाची खळगी भरण्यासाठी केलेले कष्ट, ताणतणाव तो विसरतो. त्याचं शरीर, मन हलकं होतं. त्याचा जल्लोश, उत्साह, उन्माद, हर्ष, जोश यांचा निचरा होतो. समाजाच्या सामूहिक मनासाठी, संतुलनासाठी हे आवश्यक आहे.

मग बाप्पा जायचा दिवस उजाडतो. दुपारी सुरू झालेली विसर्जनाची मिरवणूक मोठ्या शहरांतून दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरी सुरू असते. घरातला गणपतीबाप्पा विसर्जित झाला की वाईट वाटतं. रिकाम्या मखराकडे बघवत नाही. लहान मुलांना रडू कोसळतं. मीही लहानपणी गणपती गेला की रडायची. (अजूनही डोळे ओले होतात. उदास वाटतं.) गणपतीला पाण्यात बुडवणं हे तर क्रूरपणाचं वाटतं. लहान वयात तर अगदी.

लहानपणी गणपतीमध्ये मोदक तर व्हायचेच, तसंच रोज गोडधोड खायला मिळायचं. आजच्या काळातल्या मुलांच्या मानाने आम्ही कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो. पण तरीही खाण्यापिण्याची मजा असायची. आम्ही खाल्लेले कितीतरी पदार्थ आजच्या मुलांना ठाऊकच नाहीत. हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु, उकड आठळ्या, मुटकुळे, कच्चांबा, थापटवडी, रामप्रसाद ही नावंही त्यांनी ऐकलेली नाहीत. आम्ही तेच खाऊन लहानाचे मोठे झालो. अशाच काही पदार्थांच्या थोडक्यात कृती सांगते.

१) हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु - पिकलेली चिंच घ्यायची. तिचे चिंचोके, काड्या काढून साफ करून घ्यायची. त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, आणि गूळ घालून पाट्यावर वरवंट्याखाली चांगली एकजीव होईपर्यंत कुटायची. तिखट थोडं जास्तच टाकायचं. कुटून एकजीव होऊन त्याचा गोळा करून तळहातावर घेऊन चाटत चाटत खायचा. नो वाटी-चमचा. नो आइसक्रीमची रिकामी कांडी. आइसक्रीमच मिळायचं नाही, तर रिकामी कांडी कुठून येणार?

२) कच्चांबा - कच्च्या कैरीच्या बारीक फोडी करायच्या. त्यावर तिखट, मीठ, मेतकूट घालून, एकत्र मिसळून एकेक फोड उचलून खायची.

३) बकुळीच्या झाडाला फळं लागतात, त्यांना बकुळ म्हणतात. ते बकुळ चिरून त्यावरही तिखट, मीठ, मेतकूट घालून एकत्र मिसळून एकेक फोड उचलून खायची.

४) मुटकुळे - पूर्वी गिरणीत बारीक पीठ दळून मिळायचं नाही. त्यात कोंडा खूप असायचा. तो टाकून नाही द्यायचा. त्यात गूळ घालायचा. सुंठ घालायची. कारण वेलदोडे परवडत नसत. ह्यात पाणी घालून कोंडा भिजवून, एकत्र गोळा करायचा. अगदी थोडं गव्हाचं पीठ घालायचं. त्याचे लहान लहान गोळे करून एकेक गोळा तळहातावर घेऊन मुठीत आवळून मुटकुळी करायची. मोदकपात्रात उकडायची. गार झाल्यावर खायची.

५) उकड आठळ्या - फणसाच्या आठळ्या पाण्यात मीठ टाकून उकडायच्या. गार झाल्यावर तिखट टाकून खायच्या.

६) थापटवडी

फोटो

थोडं जास्त तेल घेऊन त्यात मोहरी, जिरं, हिंग, घालून फोडणी करून घ्यायची. त्यात मिरची, लसूण, जिरं याचं वाटण घालायचं. थोडं परतून हळद घालायची. नंतर त्यात एक कप पाणी घालायचं. उकळी आली की एक कप डाळीचं पीठ घालायचं. पटकन ढवळायचं. गुठळी होऊ द्यायची नाही. नंतर झाकण ठेवून पाण्याचा हबका मारून वाफ येऊ द्यायची. थोडं तेल सोडायचं. ढवळायचं. गोळा झाला की पाटावर थापून (हल्ली ट्रे मिळतात.) खोबरं, कोथिंबीर घालून वड्या पाडायच्या.

७) रामप्रसाद - थोड्या तुपावर कणीक भाजायची. गरम असतानाच त्यात गूळ चिरून मिसळायचा. कोरडी कणीक. थोडी गोड आणि त्यात गुळाच्या थोड्या गुठळ्या! दिल खूश!!

८) तेल, तिखट, भाकरी - एखाद्या दिवशी भाजी नसेल, तर आम्ही तेल, तिखट, मीठ एकत्र मिसळून त्याला लावून भाकरी खायचो. त्यात आम्हाला कसलाही कमीपणा वाटत नव्हता. ते सगळं नाॅर्मल वाटायचं.

९) रंजका - कधी घरात भाजी नसेल, तर आम्ही रंजक्याबरोबर भाकरी खायचो. रोज जेवायला भाकरीच. सणासुदीला पोळी. चैन म्हणजे पोळीबरोबर गुळांबा - साखरांबा नाही. रंजका कसा करायचा ते सांगते. लाल ओल्या मिरच्या तेलावर परतायच्या. वाटायच्या. त्याच तेलात एक चमचा मेथीदाणा भाजून पूड करायची. लसूण वाटून, मिरचीच्या वाटणावर घालायची. मेथीपूडही घालायची. मीठ घालून लिंबू पिळायचं. फोडणीत मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करायची. फोडणी गार झाल्यावर लाल मिरच्यांच्या वाटलेल्या गोळ्यावर टाकून नीट कालवायचं. झाला रंजका.

१०) लाल भोपळ्याची बाकर भाजी - लाल भोपळा चांगला दळदार घ्यायचा. सालासकट मोठ्या, जाड फोडी करायच्या. खसखस, तिखट, तीळ, गोडा मसाला, कांदा, लसूण यांचं मिश्रण भाजायचं, वाटायचं. फोडणीत मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालायचा. त्यात तिखट, मीठ, चिरलेला तांबडा भोपळा घालून भाजी शिजवायची. तांबडा भोपळा लवकर शिजतो. ही भाजी मस्त लागते.

अशा या रेसिपीज आणि असा हा आमच्या बालपणातला गावमेवा. मला खातरी आहे की मी आत्ता दिलेल्या रेसिपीजपैकी तुम्ही कुठलीही करून बघणार नाही आहात. आजच्या काळातल्या मुलांना तर हे पदार्थ अजिबातच आवडणार नाहीत, कारण त्यांच्या जिभेला पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, पास्ता, मॅक्रोनी, नूडल्स या पदार्थांच्या चवीची सवय आहे. पण आम्हाला मात्र हा गावाकडचा मेवा आवडतो आणि काटकसरीत संसार करून निगुतीने आम्हा मुलांना चार चटकदार पदार्थ खायला घालणाऱ्या आईच्या आठवणीने सद्गदित व्हायला होतं.

असा हा आमचा लहानपणीचा गणपतीबाप्पा. आणि असा हा आमचा लहानपणीचा गावमेवा.

माणसाच्या आयुष्यात समाजमनातल्या दबलेल्या भावनांचा निचरा होण्यासाठी एक सायकोथेरपी म्हणून असे सण, उत्सव आवश्यक आहेत. जगात सर्वत्र असे सण, उत्सव साजरे होतात.

बोला..
"गणपतीबाप्पा मोरया , सर्वांना सदा सुख द्या"