जन्माला येण्यापासून मरेपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा 'क्यू' काही संपत नाही. एकांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. ओळीत ठेवलेले अनेकांचे मृतदेह पाहून 'क्यू' ची कल्पना सुचली.
जन्म होण्यासाठी कारणीभूत असलेली गुणसूत्रे मोठ्या प्रमाणात एकमेकांशी स्पर्धा करत मिलनासाठी येतात. योग्य मिलन झाल्यावरच जन्म होतो. इथपासून आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 'क्यू' काही सुटलेला नाही. तुमचा जन्म झाल्यावर तुमच्या आधी/नंतर बाळे जन्म घेतात, दवाखान्यात अंघोळ घालण्यासाठी सुद्धा दाई किंवा नर्स एका नंतर एक असे करून बाळांच्या अंघोळीसाठी नेतात.
त्या पुढे शाळा असो, कॉलेज असो, कुठलेही खेळ असो, मनोरंजनात्मक कार्यक्रम असो वा सादरीकरण असो सर्वच ठिकाणी 'क्यू' शिवाय पर्याय नाही. बँकेत गेलो असता पैसे काढायला, भरायला 'क्यू'.. ऑफिसरसमोर काम करून घ्यायला 'क्यू' त्यातच ते ऑफिसर एकमेकांना सांगत होते 'अरे, ते मी चलन सोडलय त्याचा क्यू काढून दे', इथे बसल्याबसल्याही 'क्यू' आहेच.
तुम्ही कितीही पुढे गेला, पुढे राहिला तरीसुद्धा तुमच्या आधी किंवा नंतर कित्येक जण असतातच. जन्मास येताना असणाऱ्या 'क्यू' पासून मृत्यूच्या 'Q = Quit' पर्यंत आपल्याला पर्याय नाही.
मृत्यू झाल्यावर अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आल्यावर तिथे एकापाठोपाठ एक मृतदेह ठेवलेले होते.. तिथेसुद्धा विद्युत दाहिनी, डिझेल दाहिनी, पूर्वापार चालत आलेले लाकडे वापरून केलेले अंत्यविधी असे उपलब्ध पर्याय आणि त्यांचे स्वतंत्र 'क्यू' आहेत.
गुरुजींनी एकाचे विधी करुन झाले की दुसऱ्याचे विधी सुरु करण्यासाठी तिथला माणूस म्हणायचा, 'हा पुढचा नंबर कोणाचा... घ्या पुढे आता..!' अनंतात विलीन होताना सुद्धा नंबर आल्याशिवाय शरीराची पूर्ण मुक्तता होत नाही हेच खरे...!
मला वाटले चला आता यांची 'क्यू' तून सुटका झाली. आता तरी 'क्यू' लागणार नाही.. दिवस कार्य करायचे ठरले. गुरुजींना बोलावले. सर्व दिवस करताना पिंडदानाच्या वेळी त्यांनी सांगितले की ह्या विधीसाठी आत्ता जी व्यक्ती गेली आहे त्यांच्यामागील तीन पिढ्यांची नावे हवी आहेत. कारण त्यांना आवाहन केले की त्या ह्या आत्म्याला घेऊन पुढील प्रवासास निघून जातात आणि त्यातील तीन पिढ्यांमागील एक आत्मा मुक्त होतो.
तीन पिढ्या नंतर तरी संपावा हा *'क्यू'*....