एक गंमतीशीर भयानक अनुभव

नमस्कार मंडळी!!
शीर्षक वाचुन गोंधळला असाल ना? मी ही तसाच गोंधळलो होतो म्हणुन आलेला अनुभव जसाच्या तसा मांडतोय.

b

बँगलोरहुन परत येण्यासाठी काल सकाळचे ५.३० चे विमानाचे तिकीट काढले होते. मी आणि बायको , शिवाय बरोबर थोडेफार सामान. तसे सुटसुटीतच होते म्हणा. आदल्या दिवशी मित्राकडे जेवायला गेलो असताना गप्पांमध्ये त्याने आग्रहाने सांगितले की एक तास आधी नक्की चेक इन कराच. थोडा जरी उशीर झाला तरी बोर्डिंग बंद होईल आणि मनस्ताप होईल शिवाय अधिक पैसे देउन नवीन तिकिटे घ्यावी लागतील. सध्या पोस्ट कोविड जास्त विमानप्रवास होत नसल्याने आम्ही त्याचे म्हणणे मनावर घेतले आणि रात्री झोपतानाच ३.३० ची ओला बूक करुन टाकली. का कोणास ठाउक, लवकर उठायच्या टेन्शन मुळे धड झोप लागली नाही आणि आम्ही ३.१५ लाच उठुन बसलो. पटकन आवरले आणि सामान घेउन हॉटेल मधुन चेक आउट करुन खाली आलो. तोवर ओला अ‍ॅप वर ड्रायव्हरचा नंबर, गाडी नंबर वगैरे आले होतेच. त्यामुळे ५ मिनिटे आधीच त्याला फोन केला. ड्रायव्हरने फोन उचलला आणि अर्धवट हिंदी /कन्नड मध्ये काहीतरी बरळला. साहेब झोपेत होते की नशेत समजेना. अ‍ॅप मध्ये कॅब एकाच जागी उभी दिसत होती. ५ मिनिटे थांबुन पुन्हा फोन केला, पण नंतरचा एकही फोन त्याने घेतला नाही. वैतागुन बायकोच्या फोनवरुन दुसरी कॅब बूक केली आणि ही रद्द केली. तोवर समोर २ के आय ए-८ आणि ९ बस निघुन गेल्या होत्या. ह्या बस सरळ विमानतळावर नेउन सोडतात. बरेच वर्षांपुर्वी मी सतत बँगलोरला कामानिमित्त जात असे तेव्हा ईलेक्ट्रॉनिक सिटी ते विमानतळ याच बसने जात असे. पण आत्ता दुसरी कॅब येत असल्याने डोके चालले नाही. १० मिनिटे गेली . अ‍ॅपवर कॅब पुढे सरकताना दिसेना.पुन्हा कॅबवाल्याला फोन केला. पुढचा एकही फोन भाईने घेतला नाही. आता मात्र घड्याळाकडे बघुन माझा धीर सुटत चालला होता. जवळपास २० मिनिटे गेली होती. काय करावे सुचेना.

ईतक्यात समोरुन एक रिक्षा आली. त्याला घाईघाईने हात करुन बोलावले. तोही लगेच आला. विमानतळावर सोडणार का? विचारले तर हा ही अर्धेमुर्धे कन्नड्/हिंदी मध्ये काहीतरी बोलला.७०० रुपये घेइन म्हणाला. पुढे त्याच्या म्हणण्याचा मला समजलेला अर्थ असा की मला एअरपोर्ट ला पिक अप आहे, पण मी तुम्हाला माझ्या भावाकडे सोपवीन, तो तुम्हाला ड्रॉप करेल असे काहीतरी. पण आम्ही सध्या फार विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्यामुळे पटकन सामान रिक्षात टाकले आणि बसलो. रिक्षा सुरु झाली आणि हायवेने सुसाट निघली. १० मिनिटे झाली असतील, अचानक त्याने हायवे सोडला आणि डावीकडे यु टर्न मारला. समोर २ माणसे थांबली होती. माझे डोके एकदम सतर्क झाले, पेपरमध्ये आपण काय काय बातम्या वाचतो त्या आठवु लागल्या. पण सुदैवाने त्यातल्या कोणाला त्याने रिक्षात घेतले नाही. रिक्षा सर्विस रोडने पुढे निघाली. म्युनिसिपालिटीचे दिवे अर्धवट अंधार अर्धवट उजेड देत होते. पुढे एक बस चालली होती त्यामुळे निदान रस्ता वापरातील आहे हे समजत होते, पण लवकरच तीही कुठेतरी वळुन दिसेनाशी झाली. आता रस्ता जास्तच सुनसान वाटु लागला. मी आपला अधेमधे मोडके तोडके हिंदी वापरुन रिक्षावाल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. त्यातुन मला समजले की मधला टोल वाचवण्यासाठी त्याने रिक्षा या रस्त्याला घातली होती. मी कपाळावर हात मारला. अरे भावा, ७०० रुपये दिले तसा अजुन २०० रुपये टोलही भरला असता की मी. कशाला ईथे रानात घातलीस रिक्षा? असे मनातच म्हणालो. रिक्षा आपली खड्डे चुकवत धावत होती. अंधार किर्र् होत चालला होता. मधुनच एखादवेळी लॉज टाईप हॉटेल्स लागत होती तेव्हढाच काय तो उजेड दिसत होता.

आमचा रिक्षावाला कोणाकोणाशी फोन करुन बोलत होता. अर्थातच ते मला समजत नव्हते, पण एयरपोर्ट, लेडिज असे काही काही शब्द समजत होते. हा भल्या पहाटे ४.३० वाजता नक्की कोणाशी ईतका वेळ बोलतोय ते समजेना. गूगल मॅप मात्र आम्ही एअर पोर्ट्च्या दिशेने चालल्याचे दाखवत होता. तरीही मला खात्री वाटत नव्हती. एखादा अवघड प्रसंग आला तर हाताशी काठीही नव्हती. मी आपला रस्त्याच्या कडेकडेने विटा, दगड वगैरे पडले आहेत का ते बघत चाललो होतो. वेळेला निदान कामाला आले असते. दु:खात सुख म्हणजे दर २ मिनिटाला एखादी गाडी जवळुन पास होत होती, त्याच्या दिव्यांमुळे जरा धीर येत होता. अशीच १०-१५ मिनिटे अस्वस्थ गेली आणि एक गाव लागले. रस्त्यावर कोणी माणुस नव्हते, पण निदान वस्ती होती. अजुन ५ मिनिटे गेली आणि रिक्षाने एक वळण घेतले. आणि चित्र एकदम बदलले. एक मोठा पेट्रोल पंप लागला. त्याच्या आसपास विमानतळावर येजा करणार्‍या अनेक कॅब दिसत होत्या आणि समोर रस्त्यावर चक्क केम्पेगौडा इंटरनॅशनल एअर पोर्ट ४ कि.मी. अशी पाटी होती. कपाळावरचा घाम पुसला. पण स्टोरी अजुन बाकी होती. आमच्या रिक्षावाल्याने एका ठिकाणी रिक्षा थांबवली आणि यापुढे रिक्षा जात नाही असे सांगितले. ईथुनही विमानतळ किमान १ कि.मी. होता. मी वैतगलो. पण आमच्या चेहर्‍यावरील प्रश्न चिन्ह बघुन तो खाली उतरला आणि येणार्‍या एका कॅबला हात करुन थांबवले. त्याच्याशी काहीतरी बोलला आणि १०० रुपयात आम्हाला तो विमानतळावर सोडेल असे सांगुन त्या कॅबमध्ये बसवले. रिक्षाचे पैसे चुकते करुन कॅबमध्ये बसलो. त्यानेही ईमाने ईतबारे आम्हाला विमानतळावर सोडले. घड्याळात ४.३० वाजले होते. आम्ही चेक ईन करण्यासाठी धावतच सुटलो. आमची लगबग पाहुन विमान कंपनीचे कर्मचारीही मदतीला धावले. पटापट ईंडिगो च्या देस्कवर पोचलो, पण तोवर ४.४० झाले होते. त्यांची सिस्टीम लॉक झाली होती आणि नवे चेक ईन घेत नव्हती, पण आमच्या विनंतीवरुन डेस्क वरील मुलीने कोणालातरी फोन केला आणि सिस्टीम ओपन करुन आमचे बोर्डींग पास प्रिंट करुन सामान घेतले. सामानाच्या टॅगवर आम्हाला सही करावी लागली(आयुष्यात प्रथमच असे काहीतरी केले, बहुतेक काहीतरी नवीन प्रोसेस असावी). अखेर सगळे सव्यापसव्य करुन अखेर आम्ही गेटवर पोचलो आणि एकदाचे विमानात बसलो. हुश्श!!!

b