माझं ठरलं होतं आता थेट पुष्पा २ बघायला थिएटरला जायचं.पण मैत्रिणी म्हणाल्या बाईपण भारी देवा या सिनेमाला जायचं.असे सगळे आनंदासाठी एकत्र येणार असतील तर मला उधाण येतं.मग सोमवारपासून गुरूवार पर्यंत रोज बुक माय शो चेक करत होते.गुरूवारी रविवारीच बुकिंग दिसायला लागलं.लगेच तिकिटे,बर्गर ,पोपकार्न सगळं बुक केलं.फर्मान सोडलं ट्रेंड नुसार गागल आणि नथ कम्पल्सरी घालून यायचं.रविवारी सगळे थिएटरला धडकलो.ले सेल्फी दंगा नी काय सुरू.डम्बेल वर्क आऊट सुरू केल्यापासून बायकांनी रडायचं असतं हे मी विसरले आहे.त्यामुळे सिनेमात बायकांची फार रडारड असेल तर आपलं कसं होईल याची मला धास्ती होती.
पण पहिल्याच सिनला वंदना गुप्तेची तडफडार एन्ट्री दाखवून पुढे मौजच आहे हे समजलंच.
तर वंदना (शशी), रोहिणी हट्टंगडी(माई), सुकन्या (साधना),दीपा(चारू), सुचित्रा (पल्लवी), शिल्पा(केतकी) या सहा काकडे बहिणी.आता मध्यमवयीन स्वावलंबी मध्यमवर्गीय आहेत.बहिणी म्हटलं की तो ओलावा,ती माया हे सगळं हरवलंय..का? कारण प्रत्येकीने मनात एकमेकांविषयी अढी बनवली आहे.
तडफदार शशी मंगळागौर स्पर्धेसाठी भाग घ्यायला टीम तयार करत असते.मग काय बहिणी एकमेकांपासून जवळ नसल्यातरी वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी सोडविण्यासाठी मंगळागौर स्पर्धा एक संधी म्हणून पाहतात.आणि हो हेच बाईपण भारीच एक महत्त्वाचं रूप आहे.वर्षांवर्षे चालणार्या नवरा बायको दोन चाकांच्या संसारात केव्हा बायको या चाकावर माघार,मन मारणं, मुलांच्या संगोपनाची,पै पाहूण्यांचा ,कधी आर्थिक नियोजन , पुरूषी अहंकाराची मर्जी सांभाळणे या सगळ्यांचा अतिरिक्त भार पडतो समजतच नाही.जरा यातून वेळ काढून बाई निसर्गालाही घट्ट बांधील आहे.वयात येणं,गर्भारपण, रजोनिवृत्ती याही गोष्टी तिला टाळता येत नाही.अशावेळी आपली स्वप्ने,आकांक्षा तिने बाजूला केलेल्या असतात.एका टप्प्यावर तिला त्या जुन्या स्वप्नांची जोड परत मिळाली तर तिच्या पंखात कमालीचे बळ येईल.ती खर्या अर्थाने बाई म्हणून जगेल.
मग काय मंगळागौर निमित्ताने जे एक एकेची समज गैरसमज,गिल्ट , वैयक्तिक अडचणी ढवळून निघतात.एकमेकींच्या मानसिक आधाराने त्या मार्ग काढतात आणि जिंकतात.
या सिनेमातील काही आवडलेल्या गोष्टी -
१.सिनेमात प्रत्येक पात्र समाजातील आढळणाऱ्या सगळ्या बायकांना समाविष्ट केलं आहे.एक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर,एक मातृत्वापासून वंचित,सिंगल प्यरेंट,एक पुरूषी वर्चस्व असलेल्या घरातली, नवर्याच्या चुकांना पाठीशी घालत संसाराचा बोजा एकटी घेणारी,पैशावाल्या घरात किंमत नसणारी अगतिक,
ज्यामुळे सिनेमा बघणारी प्रत्येक बाई कोणत्या तरी एका किंवा एकापेक्षा जास्त पात्रात स्वतः ला रिलेट करते.आणि यामुळेच बायकांची प्रचंड साथ सिनेमाला मिळत आहे.
२.रजोनिवृत्तीवर भाष्य -अजूनही हा विषयावर अवेरनेस खुप कमी आहे.या बदलासाठी कसं सामोरं जायचं हे बायकांना ठाऊकच नाहीये.
३.गर्भपिशवी काढून टाकणे-ही आरोग्याची समस्या लहान वयापासून मोठ्या स्त्रियांपर्यत कोणालाही जाणवू शकते.बाईपणाच सर्वात मोठं वरदान गर्भ पिशवी आहे.ते शरीरातून बाहेर काढल्यावर स्वतः तिला आणि आजूबाजूच्या व्यक्तींना कमीपणा वाटू नये.
३.यातला एक संवाद "एक दिवस स्वतः चा तो बर्थडे आणि ३६४ दिवस कशाचे तर स्ट्रेस चे" खरोखर बायकांसारखा स्ट्रेस जगात कोणी घेत नाही.ते बायकांनी व्यायामाची जोड लावून दूर केलं पाहिजे.
४.ती जेव्हा स्वतः च्या पैशाने आय फोन घेते.स्वावलंबी असणं अधोरेखित करते.
५.नवरा अथवा कोणत्याच बळावर घट्ट बांधता येत नाही . अशावेळी अशा नात्यातून 'मोकळं ' होऊनच स्वतः साठी जगावं.
६.आपण बांध स्वतः हून बांधत राहिलो तर पुढच्या मुलींनाही/पिढीला ते बांध तोडायला अजून वेळ लागेल.विनाकारण छंदांना बांध नकोच.
७.रोहिणी हट्टंगडी आणि तिच्या सपोर्टिव्ह नवर्याचं बोडिंग खुपच छान दाखवलं आहे.
८.आणी ते शेवटचं गाणं "जय देवी मंगळागौर"जबरदस्त!काय सुंदर दिसल्या आहेत सगळ्या.खुपच गोड!शेवटी बाई ईश्वराची सौंदर्यवती,नाजूक देणगी या पृथ्वीवर आहे पण भारी बाईपण निभवायला देवाने तिला अद्भूत मानसिक ताकदही बहाल केली आहे.
टीप-पुर्ण लेखात स्त्री, स्त्रिया असा शब्द पुस्तकी न वापरता थेट सतत बायका शब्द वापरून भारी वाटलं!
-भक्ती
आम्ही भारी बायका :)