आपली तुपली स्वप्नं..

स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. भली,बुरी. मलाही पडतात. पण कशी? कर्मदशा! मला नेहमी स्वप्नं पडतात ती बस,ट्रेन चुकल्याची,गणित, इंग्रजी ते नापास झाल्याची (हो. अजूनही..), शिक्षकांनी शिक्षा केल्याची, वर्गाबाहेर काढल्याची, छड्या खाल्ल्याची, स्पेलिंग चुकल्याची,दूध उतू गेल्याची,भाजी करपल्याची,ग्यास संपल्याची, अंगावर झुरळ चढल्याची, पायाखाली पाल आल्याची,नळाला पाणी येत नसल्याची,वन्सं आणि सासू सासरे पंधरा दिवस राहायला येत असल्याची,आपण खूप लठ्ठ आणि बेढब झाल्याची, तोंडाचं बोळकं झाल्याची (हे उलट म्हणता येईल, म्हणजे वास्तवातलं स्वप्नात) ,कधी आपण मेल्याची,मेलेली माणसं स्वप्नात येण्याची,कधी एखाद्या स्वप्नाची "अगली कडी"पुढच्या रात्री दिसते.

मला जनरली आनंदाची, हसरी,पास झाल्याची, सुंदर, सडपातळ दिसत असल्याची , मोठ्या बंगल्यात राहात असल्याची,कारंजी उडत असलेल्या उपवनातून फिरल्याची स्वप्नं पडत नाहीत. लोकांना कशी पडतात कोण जाणे.
अगदी तरुण वयात देखील अगदी डार्क गुलाबी जाऊदे पण फेंट गुलाबी स्वप्नंही मला पडली नाहीत. पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार होऊन कुणीही राजकुमार माझ्या स्वप्नात आला नाही. शुभ्र घोडा तर दूरच,पण पाय मोडलेली गाढवं, हडकुळी कुत्री आणि एक डोळा फुटलेली मांजरं माझ्या स्वप्नात आली. कर्मदशा! कर्मदशा बरं ही!!

देवाचे नामस्मरण झोपण्यापूर्वी करुन पाहिलं तर लांब दाढी, जटा पिंजून एक म्हातारा साधू माझ्या स्वप्नात येऊन कर्मसंन्यासाचा उपदेश करून गेला. चाॅकलेट हिरो आणि कमनीय बांधा असलेल्या हिराॅइनींची गाणी टीव्हीवर बघून झोपी गेले तर तेच हिरो दाढी वाढवून,वेडे होऊन कपडे फाडत रस्त्यावर हिंडताना दिसले. आणि हिराॅईणी हडळ, चेटकीण,रा‌क्षसिणीसारख्या दिसल्या. एखाद्याचं नशीब म्हणायचं.

जोक अपार्ट. पण भारतरत्न डॉ.अब्दुल कलामांचं एक अर्थपूर्ण वाक्य आहे. ते म्हणाले होते की, स्वप्नं ती नाहीत,जी तुम्हांला झोपेत दिसतात. स्वप्नं ती की जी तुमची झोप उडवतात.
अशी झोपू न देणारी, दिवसाढवळ्या पाहिलेली स्वप्ने उमलत्या वयात सर्वजण पाहतात. गायक व्हायचं डाॅक्टर, इंजिनिअर,पायलट व्हायचे, सैन्यात भरती व्हायचे, हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर चढणारा गिर्यारोहक व्हायचे. क्रिकेटचे मैदान गाजवायचे. त्यांतल्या काहीजणांची स्वप्नं पुरी होतात. मनाची आणि मनगटाची शक्ती एकवटते. निग्रह जिंकतो.
असंच छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वप्न बघून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. क्रांतीकारकानी, देशभक्तांनी भारतीय स्वातंत्र्याचं स्वप्न सत्यात साकारले. शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, धार्मिक उन्नतीची स्वप्नं प्रत्यक्षात आणली. स्वप्नं मानवी जीवनाचं अंग आहेत.

शास्त्रीय ज्ञान देखील वाचायला मिळतं. स्वप्नांबद्दल खूप संशोधन झाले आहे. माझा अभ्यास नाही. मी त्यातली तज्ज्ञ नाही.

एका मानसशास्त्रज्ञाचं मत मी पूर्वी वाचलं आहे. तो म्हणतो, दिवसभर आपल्या ज्ञानेंद्रियांवर विविध स्पर्श,चवी,गंध मारा करत असतात. आपला मेंदू त्यानुसार त्यांना प्रतिसाद देत असतो. रात्रीही असे आघात शरीरावर होत असतात. निद्रिस्त मेंदू त्यांचे जे अर्थ लावत असतो ते म्हणजेच स्वप्नं. छातीवर जड पांघरूण, पोटात गॅस, ॲसिडिटी,डास चावणे अशा संवेदनाचा निद्रिस्त मेंदूने लावलेला अर्थ म्हणजे छातीवर दगड ठेवला आहे. आपण खूप उंचावरुन खोल दरीत कोसळतोय. तेच स्वप्न असतं. असं म्हणतात की "मनी वसे ते स्वप्नी दिसे."दिवसभर मनात जे विचार येतात तेच स्वप्नात दिसतं. मनात घोळणारे विचार मेंदू परत परत अर्थबद्ध करत असतो.

काही शास्त्रज्ञांनी असं मत मांडले आहे की , माणूस ज्या भावना मनात दाबून ठेवतो, त्यांचं दमन करतो,ज्या सप्रेस करतो , त्यांची पूर्तता तो स्वप्नात करतो.

वर म्हटली तशी झोपू न देणारी, दिवसाढवळ्या पाहिलेली काही स्वप्ने माझीही आहेत. त्यांतली काही पूर्णही झाली आहेत. माझा दीर्घोद्योग, चिकाटी त्यांच्या पूर्तीसाठी पणाला लागली. श्रमांचं सार्थक झालं. उदाहरणार्थ काही विचारू नका. वो किस्सा फिर कभी!

स्वप्नांची दुनिया (कधी कधी का होईना,) न्यारी, नवलाईची असते. प्रसन्न, सुंदर, आशादायी स्वप्नं जीवनात हवीतच.

"स्वप्नामधील गावा
स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला
मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा
स्वप्नीच वेध घ्यावा।।