जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. पुढे काय संघर्ष/सवलत वाट्याला येणार, याची कल्पना न देता आत्म्यांच्या सतत ढासळणाऱ्या कड्यावरून आपले जीव या प्रवाहात फेकले जातात. काहींना पहिलाच तडाखा एवढा जबरदस्त बसतो, की उपजत शारीरिक मर्यादांमुळे 'अपंग' म्हणून जन्माला आलेले हे जीव कसे जगणार याची 'समर्थ' जीवांना काळजी लागते. एकदा या जगण्याच्या लोंढ्यात माणूस गटांगळ्या खाऊ लागला, की मग प्रत्येकातले सुप्त अपंगत्व बाहेर येते. ज्यांना दुर्दैवाने एखादा अवयव/ज्ञानेंद्रिय नाही असे जीव त्यांच्या परीने जगण्याची कला शिकून जीवन लीलया सार्थकी लावतात. मात्र सर्व अवयव असूनही मने अपुरी असणारे जीवनाचा मतितार्थ शोधण्यास असमर्थ ठरतात. या महापुरात कधी नात्यांचा ओंडका आधाराला येतो तर कधी अविश्वासाचा भोवरा श्वास गुदमरून टाकतो. हे परीक्षेचे क्षण नसतात. ही केवळ जगण्याची तयारी! पुढे एखादा असा टप्पा येतो, की तिथे चक्क महापुराची मजा वाटू लागते. सगळे भेदाभेद जीवन-प्रवाहाने व्यापून टाकलेले, सगळीकडे फक्त आपल्यासारखे जीवन, भावनांची चौफेर इतकी दाटी, की त्यातून वाट शोधताना वाऱ्याची सुद्धा दमछाक व्हावी. आणि आपण मात्र स्तब्ध, निश्चल, प्रवाहापासूनही विरक्त... कदाचित किंचितसे हवेतच! तो जीवनाच्या परीक्षेचा क्षण - सगळ्या लवाजम्याची निरर्थकता पटूनही त्यात अर्थ शोधण्याची आंतरिक ऊर्मी पेटून ती तेवत ठेवण्याची धडपड! या परीक्षेला केवळ सामोरे जाणे हेच परीक्षा पास करण्यासाठी पुरेसे ठरते. प्रश्नांच्या स्वरूपात जीवन कशाने सार्थकी लागणार याचे उत्तर मिळते. जिवंतपणाचे स्वागत आणि मृत्यूचे आभार मानता आले की जीवन सार्थकी लागते.