मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही. बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही. पण एका खास मित्राने आग्रही शिफारस केल्यामुळे 'The Kerala Story' हा चित्रपट परवाच्या रविवारी आम्ही दोघं आणि माझा एक अतिशय जवळचा मुस्लिम मित्र व त्याची बायको अशा चौघांनी बघितला आणि तो बघण्यासाठी खर्चलेला वेळ आणि पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला असेच मी म्हणेन.
चित्रपट संपल्यावर "मस्त पिक्चर बनाया हैं यार... ये किसी के भी साथ हो सकता हैं!" असा त्या मित्राने गंभीर स्वरात दिलेला अभिप्राय आणि त्याला "सच्ची" असा एका शब्दात त्याच्या बायकोने तितक्याच गंभीरपणे दिलेला दुजोरा मलाही अंतर्मुख करून गेला. तो अभिप्राय आणि त्याला दुजोरा देणाऱ्या दोन्ही व्यक्ती धर्माने मुस्लिम असल्या तरी त्यातून व्यक्त झालेल्या भावना ह्या लवकरच वयात येऊ घातलेल्या एका मुलीचा पिता आणि मातेच्या होत्या, त्यात डोकावलेली काळजी अगदी स्पष्टपणे जाणवली होती आणि माझ्या मते हेच 'The Kerala Story' ह्या चित्रपटाचे खरेखुरे यश आहे.
तर मंडळी, सध्या अनेक कारणांनी चर्चेत असलेला आणि परवा संध्याकाळी बघितलेला हा चित्रपट मला कसा वाटला, तो का आवडला हे सांगण्यासाठी आणि त्या अनुषंगाने माझी काही मते मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच!
'द केरला स्टोरी'
निर्माता: विपुल अमृतलाल शहा.
आंखे, वक्त, नमस्ते लंडन, सिंग इज किंग, फोर्स, कमांडो अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांपैकी काहींचे दिग्दर्शनही समर्थपणे करणारे विपुल शहा हे नाव तसे सुपरिचित. पण आत्तापर्यंत केवळ व्यावसायिक, करमणूकप्रधान अशा मसालापटांची निर्मिती करणाऱ्या विपुल शहांनी लव्ह जिहाद सारख्या धगधगत्या विषयावरील 'द केरला स्टोरी' ह्या त्यांच्या पठडीबाहेरच्या आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय सरस अशा चित्रपटाची यशस्वीरीत्या निर्मिती करून सुखद धक्का दिला आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे अगत्याचे वाटते!
दिग्दर्शक: सुदिप्तो सेन.
'सुदिप्तो सेन' ह्यांनी दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट मी ह्याआधी पाहिला नसल्याने हे नाव माझ्यासाठी अनोळखी असले तरी नाटकीपणाला अजिबात थारा न देता वेगवान, अतिशय वास्तवदर्शी आणि अत्यंत प्रभावी सादरीकरणातुन त्यांनी दिग्दर्शक म्हणुन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कित्येक प्रसंग पाहाताना आपण नक्की हिंदी सिनेमा पहातोय कि हॉलीवुडपट पहातोय असा प्रश्न पडावा इतके ते प्रभावी आहेत. अर्थात त्यांचा मी हा पहिलाच चित्रपट पहिला असल्याने असे वास्तवदर्शी चित्रपट देण्यात हातखंडा असलेले आणि दिग्दर्शक म्हणून माझ्या आवडीच्या असलेल्या 'अनुराग कश्यप' ह्यांच्या पंक्तीत त्यांना इतक्यात नेऊन बसवण्याची मला घाई नाही, त्याआधी सातत्य जोखण्यासाठी त्यांचे आणखीन काही सिनेमे बघणे आवश्यक आहे असे वाटते.
संक्षीप्त कथानक:
चित्रपटाची कथा-पटकथा सुर्यपाल सिंग, विपुल शहा आणि सुदिप्तो सेन ह्यांनी लिहिली असुन ती थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
'शालिनी उन्नीकृष्णन' ही पितृछत्र हरपलेली आणि आपल्या आई व आजीबरोबर राहणारी सर्वसामान्य हिंदू घरातली मुलगी, 'गीतांजली मेनन' हि कम्युनिस्ट विचारसरणी असणाऱ्या घरात वाढलेली, आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आणि 'निमाह मॅथ्यूस' हि एका ख्रिश्चन कुटुंबातली मुलगी अशा एकमेकींशी अपरीचीत असलेल्या तिघीजणी कासारगोड ह्या परजिल्ह्यातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तिथे शिकण्यासाठी होस्टेलवर राहायला जातात. तिथे 'असिफा' हि स्थानिक मुलगी त्यांची चौथी रूममेट असते!
तिथल्या वास्तव्यात असिफा त्यांचे ब्रेनवॊशिंग करून त्या तिघींना 'लव्ह-जिहाद'च्या सापळ्यात अडकवण्याचे आणि त्यांचे धर्मांतरण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करते. शालिनी आणि गीतांजलीला त्या सापळ्यात अडकवण्यात ती यशस्वी होते. पैकी शालिनी हे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याने तीचे पूर्णपणे ब्रेनवॉशिंग होऊन ती जिहाद साठी सीरियाला जायलाही तयार होते (अर्थात त्यासाठी तिची फसवणूक करून तशी परिस्थिती कशी निर्माण केली जाते वगैरेचा तपशील इथे देणे अयोग्य ठरेल). गीतांजली उर्फ 'गीतू' आणि धर्मांतर केल्यानंतरचे नाव अनिशा हि देखील त्या सापळ्यात पूर्णपणे अडकते, पण काही कारणाने शालिनीपेक्षा थोडी सुदैवी ठरल्याने ती जिहादी वगैरे बनण्यास तयार होत नाही, ज्याच्या परिणामी तिला आयुष्यातून पूर्णपणे उठवण्यात येते. आणि निमाह हि बऱ्यापैकी कट्टर कॅथलिक विचारसरणीची असल्याने आसिफा आणि तिच्या सहकाऱ्यांना तिला धर्मांतर आणि लव्ह जिहदच्या सापळ्यात अडकवणे शक्य होत नाही तेव्हा ड्रग्स देऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला मानसिकदृष्ट्या उध्वस्त केले जाते.
जिहाद साठी सीरियाला जायला निघालेल्या शालिनीच्या कोलंबो मार्गे पाकिस्तानातील क्वेट्टा ते अफगाणिस्तान ह्या प्रवासात घडणाऱ्या घटना, इसिस ह्या दहशतवादी संघटनेच्या तळावर तिला येणारे निर्घृण अनुभव अशा घटनांमधून पुढे सरकणाऱ्या कथेचा अंत त्वचारोग झालेली (तो कदाचीत Sexually transmitted diseases - STD असावा) शालिनी उर्फ फातिमा इसिसच्या तावडीतुन केलेल्या यशस्वी पलायनानंतर अफगाणिस्तानच्या एका जेल मध्ये जाउन खितपत पड्ल्यावर होतो.
चित्रपटाची इतपतच कथा सांगणे इष्ट वाटते, बाकीच्या घटना समजण्यासाठी सिनेमा बघणे योग्य ठरेल...
कलाकार
प्रमुख पात्रः शालिनी उन्नीकृष्णन | अभिनेत्री: अदा शर्मा
आधी बघितलेल्या तेलगू सिनेमांमुळे परिचयाची झालेली 'अदा शर्मा' हि एकमेव अभिनेत्री वगळता बाकीचे सर्वच कलाकार माझ्यासाठी अनोळखी होते. पण तेलगू सिनेमांमध्ये बघितलेली ग्लॅमरस अदा शर्मा आणि ह्या चित्रपटात पूर्वाश्रमीची 'शालिनी उन्नीकृष्णन' आणि धर्मांतरित झाल्यावर 'फातिमा' ची प्रमुख भूमिका साकारणारी अदा शर्मा ह्यांत भरपूर फरक जाणवला. भूमिकेची गरज म्हणून वजन वाढवलेली अदा शर्मा 'हिरोईन मटेरियल' वाटली नसली तरी अभिनयात बऱ्यापैकी बाजी मारून गेली आहे.
बाकी चित्रपटातील महत्वाच्या पात्रांपैकी असिफाच्या भुमिकेतली सोनिया बलानी, गीतांजली मेननच्या भुमिकेतली सिद्धि इदनानी, निमाह मॅथ्युसच्या भुमिकेतली योगीता बिहानी, शालिनिच्या आईची भुमिका साकारणारी देवार्शीनी चेतन, गीतांजलीच्या आईची भुमिका साकारणारी उषा सुब्रमणीयम-सक्सेना, तसेच युनोचे आणि जेल अधिकारी, लव्ह जिहादच्या सापळ्यात ह्या तरुणींना अडकवणारे असिफाचे सहकारी, मुल्ला/मौलवी वगैरे सर्वच कलाकारांनी आपापल्या भुमिका अगदी चोख बजावल्या आहेत. त्यामुळे कास्टींग साठीही पुर्ण मार्क्स ह्या चित्रपटाला द्यायला हरकत नाही!
चित्रपटातील सर्वाधीक आवडलेले किंवा मनाला चटका लावणारे प्रसंगः
संपुर्ण चित्रपटच आवडला असला तरी हा चित्रपट केवळ हिंदुविरोधी कारवायांवर प्रकाश टाकत नसुन हिंदुंकडुन होणाऱ्या चुकांवरही अप्रत्यक्षरीत्या भाष्य करत असल्याने त्यातील सर्वाधीक आवडलेले किंवा मनाला चटका लावणारे काही प्रसंग नमुद करण्याचा मोह टाळता येत नाहिये!
१) एका प्रसंगात शालिनी, गीतांजली, निमाह आणि असिफा अशा चौघीजणी जेवायला बसलेल्या असतात. टेबलच्या एका बाजूला बसलेल्या निमाह आणि असिफा जेवण्याआधी अनुक्रमे ख्रिस्ती आणि मुस्लिम पद्धतीने प्रार्थना करतात जेव्हा टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या शालिनी आणि गीतांजली त्याविषयी विचारणा करतात तेव्हा असिफा आणि निमाह त्यांच्या धर्मात जेवणाआधी अनुक्रमे गॉड आणि अल्लाचे आभार मानण्यासाठी करण्याच्या प्रार्थनेचे असलेले महत्व विशद करतात आणि त्यावर शालिनी व गीतांजली ह्या हिंदू मुली जी उत्तरे देतात ती ऐकून हसावे कि रडावे हे समजत नाही.
वास्तविक घरचे संस्कार वेगळे, पण जेवणाआधी "वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" अशी प्रार्थना आपल्यापैकी बहुतेक सर्वांना शाळेत डबा खाण्याआधी शिकवली जात असल्याचे आठवत असेल. कुठल्याही मंगल प्रसंगी पंगतीत जेवतानाही "पार्वती पते हर हर महादेव" असा गजर झाल्याशिवाय लोक घास तोंडात घालत नसत/नाहीत. आज आपल्यापैकी कितीजण जेवणाआधी अशी प्रार्थना करतात? शाळेनंतर मी स्वतः जेवणाआधी अशी प्रार्थना करत नसल्याने खरंतर मला हा प्रश्न विचारायचा बिलकुल अधिकार नाही पण आपल्या मिपाकरांपैकी किंवा अन्य सोशल मीडियावर तावातावाने हिंदु धर्मा विषयी मोठमोठ्या बाता मारणारे कितीजण रोजच्या प्रत्येक जेवणाआधी अशी प्रार्थना करतात किंवा स्वतः करत असले तरी कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात जाणून घ्यायला नक्की आवडेल!
२) ब्रेनवॊश झालेली शालिनी हिजाब परीधान करून सुट्टीवर घरी येते त्यावेळी दरवाजा उघडल्यावर तिला त्या अवतारात बघितल्यावर आणि घरात आल्यानंतर आईने आणून दिलेला प्रसाद खाण्यास नकार देऊन ती जेव्हा देव-देवतांची निंदा नालस्ती करते आणि प्रसादाची थाळी टीपॉय वर ठेवण्याआधी आईने तिचा त्यावर ठेवलेला पाय खाली केल्यावर पुन्हा आपला पाय मुद्दामहून त्या प्रसादाच्या थाळीजवळ ठेवणाऱ्या आपल्या मुलीला बघून तिच्या आईची झालेली अवस्था मनाला चटका लावून जाते.
३) शरिया नुसार स्त्रियांना मोबाईल फोन वापरायला बंदी आहे असे जेव्हा शालिनी उर्फ फातिमाला इसिसच्या दहशतवाद्याकडून सांगितले जाते तेव्हा ती अतिशय निरागसपणे त्याला उलट प्रश्न विचारते "पण शरिया तयार झाला तेव्हा मोबाईल फोन कुठे अस्तित्वात होता ?" हा एकमेव प्रसंग असा आहे जेव्हा प्रेक्षागृहात हशा पिकतो. हा अपवाद वगळता चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी शांतता असते.
४) धर्मांतरित झालेलया गीतांजली उर्फ अनिशाला तिचे वडील हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याचे सांगणारा तिच्या आईचा फोन येतो. असिफा त्याबद्दल विचारणा करते तेव्हा वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी आणि तिच्यासाठी म्हणून ठेवलेले दाग-दागिने घेऊन जाण्यासाठी आईने फोन केला होता पण हे घरच्यांनी तिला परत बोलावण्यासाठी केलेले ढोंग वाटत असल्याचे ती सांगते.
त्यावर तुझे वडील काफिर असल्याने ते तसेही 'दोज़ख' (नरकात) जाणार आहेत, त्यांचे पाप कमी करण्यासाठी तूला त्यांच्यावर थुकावे लागेल किंवा त्यांना दगड मारावा लागेल असे सांगतानाच तू जाऊन हे कर आणि दागिने घेऊन ये, काफ़िरांची दौलत ताब्यात घेणे शरियाला मान्य आहे.
असिफाने सांगितल्याप्रमाणे गीतांजली हॉस्पिटल मध्ये जाऊन आईच्या डोळ्यांदेखत आपल्या वडिलांच्या डोक्यावर जाऊन थुंकते तो प्रसंग मनाला फार यातनादायी आहे.
५) आपण फसवले गेलोय हे लक्षात आल्यावर अंमली पदर्थांचे व्यसन जडलेली पश्चातापदग्ध गीतांजली आपल्या वडीलांच्या मांडीवर डोके ठेउन जेव्हा "तुम्ही मला परकिय कम्युनिझमचे धडे देत राहीलात त्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकवल्या असत्या तर आज माझ्यावर हा प्रसंग ओढवला नसता" अशा शब्दांत त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडते तो प्रसंगही फार प्रभावी वाटला.
संपुर्ण चित्रपटात असे अनेक परिणमकारक प्रसंग आहेत त्यबद्दल आणखीन लिहिले तर चित्रपट बघण्याची इच्छा असलेल्यांचा रसभंग होण्याचा धोका टाळण्यासाठी ते आवरते घेतो!
बाकी चित्रपटात कुठेही अंगप्रदर्शन वगैरे काही नाही. बलात्काराचे दोन-तिन प्रसंग आहेत पण कल्पकतेने चित्रित केले असल्याने त्यातही कुठे बिभत्सपणा नाही, ज्यांनी OTT वरच्या वेबसिरीज बघितल्या असतील त्यांना तर ते बलात्काराचे प्रसंग अगदी बाळबोध वाटतील. केवळ हिंसाचाराचे काही तुरळक रक्तरंजीत प्रसंग कथानकाची गरज म्हणुन चित्रपटात असल्याने ह्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने 'A' प्रमाणपत्र दिले असावे असे वाटले, अन्यथा हा चित्रपट कोणीही पहाण्यासारखा आहे त्यासाठी खरंतर १८+ वय असण्याची काही गरज नाही, ह्यापेक्षा कितीतरी रक्तरंजीत व्हिडीओ गेम्स लहान मुले खेळतात!
असो... एकंदरित चित्रपट चांगला आहे. गाणी दोन-तिनच असली तरी संगीत सुश्राव्य आहे. 'दिल से' नंतर मल्याळम बोल असलेले गाणे असलेला हा बहुदा त्यानंतरचा पहिलाच चित्रपट असावा. सध्या ह्या चित्रपटावरुन बराच गदारोळ माजवला जातोय. ह्या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी केरळ सरकारने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली असली तरी काल परवाकडे तामिळनाडुतील मल्टीप्लेक्स मालक/चालकांनी हा चित्रपट न दखवण्याचा निर्णय घेतला आहे तर पश्चिम बंगालच्या तथाकथीत "फ्री स्पिच" समर्थक मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये 'बॅन' केला आहे. असे असले तरी ह्या सर्व गदरोळावर मात करुन हा चांगला चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला आहे ही नक्कीच समाधनाची गोष्ट आहे!
तर मंडळी वर उल्लेख केलेल्या माझ्या मित्राच्या अभिप्रायातील "ये किसी के भी साथ हो सकता हैं!" ह्या वाक्यातील गर्भीतार्थ लक्षात घेउन केवळ 'लव्ह जिहाद' च्या परिप्रेक्षातुन आणि धार्मीक दृष्टिकोनातून ह्या चित्रपटाकडे न पहाता वास्तवाचे भान देणारी हि 'उत्तम कलाकृती' ज्यांना शक्य असेल त्यांनी चित्रपटगृहात जाऊन तर ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी पुढे OTT किंवा अन्य कुठल्याही माध्यमावर आवर्जून पहावी अशी आग्रही शिफारस करतो आणि "ये किसी के भी साथ हो सकता हैं!" ह्या वाक्याचा पुनरुच्चार करुन आता इथेच थांबतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!