कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६
आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५
"कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो... "
-----
दुपारी दोन वाजता बहिणीने जेवणासाठी उठवले. अंघोळी-पांघोळी उरकल्यावर छोले-पुरी, गुलाबजाम आणि सांबार भात असे जेवण झाल्यावर तयार होऊन बहिणीच्या घरापासून ५५ - ५६ की. मी. अंतरावरच्या, सव्वा-दीड तासाचा प्रवास असलेल्या प्राचीन 'तांबडी सुरला महादेव मंदिरात' जायचा विचार केला होता पण त्यावेळी करोना निर्बंधांमुळे मंदिर दुपारी तीन वाजताच बंद होत असल्याचे समजल्यावर तो बेत रद्द केला.
पोर्तुगीज राजवटीत त्यांच्या आधीपत्या खालील प्रदेशातल्या हिंदू, मुसलमान धर्मियांवर बळजबरीने कर्मठ ख्रिस्ती धर्म लादण्यासाठी १५६०-१५६१ मध्ये सुरु झालेल्या 'द गोवा इन्क्वीजीशन' (The Goa Inquisition) अंतर्गत जे अनन्वित अत्याचार केले गेले त्यात १५६६ ते १५६८ ह्या काळात गोव्यातली जवळपास सर्व (७५० पेक्षा जास्त) प्राचीन मंदिरे उध्वस्त केली गेली.
'पोर्तुगीज अर्काईव्हज' (Portuguese Archives) मधल्या १५६९ सालच्या एका राजपत्रात भारतातल्या पोर्तुगीज वसाहतीतली सर्व हिंदू मंदिरे जाळली अथवा जमीनदोस्त करण्यात आली असल्याची नोंद आहे.
पण मुख्य वस्ती पासून दूर जंगलात (मोलेम अभयारण्याच्या परिसरात / Mollem National Park) असल्याने १२ व्या शतकात यादव राजा रामचंद्र ह्यांच्या मंत्र्याने बेसॉल्ट दगडांत बांधलेले आणि उत्तम शिल्पकलेने सजलेले हे प्राचीन मंदिर धर्मांध ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या आणि प्रशासकांच्या अत्याचारांपासून बचावले. आजघडीला हे मंदिर गोव्यातले सर्वात प्राचीन मंदिर म्हणुन ओळखले जाते.
अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेले हे प्राचीन महादेव मंदिर 6-7 वर्षांपूर्वीच्या एका गोवा भेटीत पाहिले आहे, ते ह्या भेटीत पुन्हा पाहता नाही आले. त्यामुळे त्याविषयी इथे जास्ती लिहीत नाही, पण गेल्यावर्षी फेसबुक वर प्राचीन वास्तुकला/स्थापत्य/संस्कृती विषयक एका ग्रुपवर ह्या मंदिराचा परिचय करून देण्यासाठी एक सचित्र लघुलेख लिहिला होता त्याची लिंक इच्छुकांसाठी देतो.
Tambdi Surla Mahadev Temple - Goa
तांबडी सुरलाचा बेत रद्द झाल्यावर मग साडे तीनच्या सुमारास मी आणि भाऊ दक्षिण गोव्यातील सालसेत (साष्टी) तालुक्यातील 'कुडतरी' (कुर्तरीम / Curtorim) इथे असलेल्या माझ्या बायकोच्या आजोळी जायला निघालो आणि तासाभरात ३७ की. मी. चा प्रवास पार पाडून तिच्या आजोबांच्या (आईच्या वडिलांच्या) पोर्तुगीज कालीन घरी पोचलो.
.
.
.
प्रत्येक वेळी गोव्याला आलो की आम्ही आजोबांची सदिच्छा भेट घ्यायला अगदी थोड्या वेळासाठी का होईना पण आवर्जून ह्या ठिकाणी येऊन जातो.
पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा यायची. अनेक जुन्या गोष्टी समजायच्या, माहिती मिळायची. पण आता आजोबा बरेच थकले आहेत. यंदा त्यांनी एक्याण्णवव्या वर्षात पदार्पण केले आहे, तब्येतही नरम-गरम असते आणि गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांची श्रवणशक्ती कमी कमी होत त्यांना अजिबात ऐकू येईनासे झाल्याने आता त्यांच्याशी संवाद असां होत नाही, पण तिथे गेलं की त्यांना बरं वाटतं.
गोव्यातली जुनी घरं चांगली मोठी असतात त्याला हे रघुनाथरावांचं (आजोबांचं) पोर्तुगीज कालीन घरही अपवाद नाही. जुने वाडे / घरांची आवड असलेले अनेक मिपाकर आहेत, कितीतरी गोवेकरही मिपावर आहेत त्यांना माहिती असेलच पण ज्यांना त्याविषयी कुतूहल किंवाआवड असेल त्यांच्यासाठी घरातील अंतर्भागाचे/काही खोल्यांचे फोटोज खाली देत आहे.
.
.
.
.
.
.
.
.
स्वयंपाकघर.
.
स्वयंपाकघर.
.
अडगाळीची खोली.
.
पोर्तुगीज राजवटीत ही मोठाली घरे रंगावायला सरकार पैसे देत असे!
बायकोच्या आजोबांची आणि मामा, मामीची भेट झाली. मामाचा मोठा मुलगा नोकरी निमित्ताने तर धाकटा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
चहा-पाणी झाले. मग घराच्या मागे असलेल्या त्यांच्या बागेत फेरफटका मारून परतल्यावर इकडच्या-तिकडच्या गप्पा चालू असताना मामीने बनवलेले गरमा गरम ब्रेड रोल्स आणि कोक असा अल्पोपहार झाला.
सगळ्यांचा निरोप घेऊन सव्वा सात वाजता आम्ही तिथून जायला निघालो त्यावेळी मामाही आम्हाला मेन रोड पर्यंत सोडण्याच्या बहाण्याने निघाला तेव्हा मामीने हसत हसत मामाला "जावई आलाय म्हणुन जास्ती रंगात येऊ नका... लिमिट सांभाळा आणि लवकर घरी या..." अशी इशारेवजा सूचना देऊन पत्नीधर्माचे काटेकोरपणे पालन केले 😀
घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या कुडतरी बस स्टॅंड जवळच्या एका बारमध्ये आम्ही तिघे प्रवेशकर्ते झालो.
गोव्याची 'उराक' मला प्रचंड आवडते, पण अजून तिचा सिझन सुरु व्हायला दीड-दोन महिने अवकाश होता म्हणुन माझ्यासाठी दुसऱ्या पसंतीची 'कोकोनट फेणी', मामासाठी 'बिअर' आणि आता जाताना भावाला बाईक चालवावी लागणार असल्याने त्याच्यासाठी 'मिरिंडा' ची ऑर्डर दिली!
सव्वा आठ पर्यंत तिथला कार्यक्रम आटपून मामाचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि पावणे दहा वाजता मुक्कामी पोचलो. आम्हाला विशेष भूक नसल्याने आमचे जेवण बनवू नकोस असे बहिणीला आधीच कळवले होते तरी तीने 'इडली फ्राय' करून ठेवला होता तो खाल्ला.
काल रात्रीची झोप पूर्ण झाली नव्हती आणि उद्या पासून दक्षिण गोव्यातले किल्ले पाहायला सुरुवात करायची होती त्यामुळे फार वेळ गप्पा वगैरे मारत न बसता साडे दहाच्या सुमारास निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
----------
सकाळी उठायला साडे नऊ वाजले, म्हणजे तसा उशीरच झाला होता. संकष्टी चतुर्थी असल्याने बहिणीचा उपास होता म्हणुन तीने साबुदाण्याची थालीपीठे करण्याचा घाट घातला होता. थालीपीठे बनण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याने मी आणि भावाने चहा बिस्किटे खाऊन अंघोळी उरकून घेतल्या.
साजूक तुपावर भाजलेल्या साबुदाण्याच्या खमंग थालीपीठांच्या जोडीला दही, लिंबाचे (उपासाचे) लोणचे आणि केळी असा दणदणीत नाश्ता (नाश्ता कसला Brunch) झाल्याने दुपारी जेवायची गरजच उरली नव्हती 😀
कंपनीच्या कामासाठी आठवडाभर मुंबई हेड ऑफिसला गेलेले बहिणीचे मिस्टर आज संध्याकाळी परतणार होते आणि त्यांना आणायला तिला गाडी घेउन एअरपोर्टला जायचे असल्याने आजच्या दक्षिण गोव्यातल्या किल्ले दर्शनासाठी मी आणि भाऊ दोघेच जाणार होतो. पण अकराच्या सुमारास आम्ही निघण्याच्या तयारीत असताना भाऊजींनी त्या कामासाठी ड्रायव्हर अरेंज केला असल्याचे कळवणारा फोन तिला आला तसा आमचा प्लॅन बदलला!
मग बहिणीची किचनमधली जुजबी आवरा आवरी आणि तयारी झाल्यावर आम्ही तिघेजण निघेपर्यंत साडे अकरा वाजले. ड्रायव्हरला द्यायला कारची चावी समोरच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या दक्षिणात्य कुटुंबाकडे ठेऊन माझी बाईक आणि बहिणीची ऍक्टिवा घेऊन आम्ही निघालो.
साईट सिइंगची सुरुवात शेवटच्या टोकापासून करण्याची सवय माझ्या अंगावळणी पडली असल्याने दक्षिण गोवा जिल्ह्यातल्या'काणकोण' (कॅनाकोना / Canacona) तालुक्यातील 'काबो-डी-रामा' (Cabo de Rama) ह्या संपूर्ण गोव्यातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन किल्यांपैकी एक असलेल्या दक्षिण गोव्यातील शेवटच्या किल्ल्याच्या दिशेनी प्रवास सुरु झाला.
.
.
वास्तविक 'काबो-डी-रामा' हा भौगोलिकदृष्ट्या गोव्याच्या दक्षिणेकडचा शेवटचा किल्ला नाही. त्यापुढेही 'अंजेदिवा' नावाचा एक फार प्राचीन (अवशेषरुपी) किल्ला 'अंजदीप' नावाच्या बेटावर आहे पण आता त्या बेटावर भारतीय नौदलाचा तळ असल्याने तिथे जाण्यास पर्यटकांना परवानगी नाही.
'अंजदीप' हे बेट गोव्याच्या मुख्यभूमीपासून लांबवर, कर्नाटकातील कारवारच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ असले तरी त्यावर प्रशासन गोवा सरकारचे आहे. अशी गंमत गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही टोकांना बघायला मिळते. उत्तरेकडे 'तेरेखोल' (Terekhol / Tiracol) किल्ल्याच्या बाबतीत तर दक्षिणेकडे अंजदीप बेट आणि त्यावरच्या 'अंजेदिवा' किल्ल्याच्या बाबतीत.
तेरेखोल हे गाव भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यात असले तरी तिथला 'तेरेखोल किल्ला' आणि त्याच्या आसपासचा थोडा प्रदेश मात्र गोवा सरकारच्या अखत्यारीत येतो. तर 1961 साली भारतीय सेनेने 'ऑपरेशन विजय' सुरु करून गोवा, दिव-दमण आणि अंजदीप (अंजेदिवा) बेट पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केल्यावर ते गोवा राज्याचा भाग बनले.
विशेष गोष्ट म्हणजे 1498 साली दर्यावर्दी 'वास्को-डी-गामा' आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रूपाने समुद्रमार्गे येऊन भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवणारे युरोपीयन लोकं देखील पोर्तुगीजच होते आणि 1961 साली 'ऑपरेशन विजय' नंतर भारत सोडून जाणारे सर्वात शेवटचे युरोपीयन शासकही पोर्तुगीजच होते!
असो, करमळी पासून 57 किमीचा प्रवास रमत गमत दोन तासात पार करून आम्ही दुपारी दीड वाजता 'काबो-डी-रामा' किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो.
.
तीन बाजूने पाणी आणि एका बाजूला जमीन अशी भौगोलिक स्थिती असणाऱ्या समुद्रात शिरलेल्या जमिनीच्या टोकाला आपण भुशीर म्हणतो त्यालाच पोर्तुगीज भाषेत 'काबो' (Cabo) म्हणतात. साडे-चार ते पाच एकर क्षेत्रफळ व्यापणारा हा किल्ला अशाच एका भुशीरावर बांधलेला आहे.
प्रभु श्री रामचंद्र आपल्या वनवासाच्या काळात सीतामाई आणि लक्षमाणसह कर्नाटकातून ह्याठिकाणी येऊन काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे ह्या भुशीराला 'राम भुशीर' किंवा 'रामाचे भुशीर' असे नाव पडल्याची दंतकथा आहे. पुढे ह्या रामाच्या भुशीराचे पोर्तुगीज राजवटीत 'काबो-डी-रामा' असे भाषांतर झाले.
अतिशय निसर्गरम्य परिसरात चिऱ्यांनी (जांभा दगडात) बांधलेल्या आणि पूर्वी खोलगड म्हणुन ओळखला जाणाऱ्या ह्या किल्ल्याचा ताबा इतिहासात अनेकवेळा मराठे, मुस्लिम राज्यकर्ते, आणि पोर्तुगीजांकडे फिरता राहिला. सोंधे संस्थानाकडून हैदरअली कडे मग पुन्हा सोंधे संस्थानाकडे जात शेवटी 1791 मध्ये ह्या किल्ल्याचा ताबा पूर्णपणे पोर्तुगीजांकडे आला तो थेट 1961 पर्यंत.
किल्ल्याच्या मध्यभागी आजही वापरात असलेला एक चर्च सोडला तर बाकी सर्व भाग्नावशेष उरले आहेत, पण अजूनही सुस्थितीत असलेल्या मजबूत तटबंदीवरून आपण बऱ्यापैकी लांब फेरफटका मारत आसपासचा नयनरम्य परिसर पाहू शकतो.
'काबो-डी-रामा' किल्ल्याचे आणि परिसराचे काही फोटोज -
.
प्रवेशद्वार ओलांडल्यावर समोर ठेवलेली तोफ.
.
किल्ल्याला जमिनिपासुन वेगळे करणारा खंदक.
.
बुरुजावरची तोफ.
.
दुसर्या बुरुजावरच्या दोन तोफा.
.
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा १
.
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा २
.
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा ३
.
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा ४
.
.
फारच प्रेक्षणीय परिसर असलेल्या ह्या किल्ल्यात सुमारे दीड तास व्यतीत करून आम्ही परतीच्या वाटेवरील पुढचे किल्ले बघायला निघालो.
किल्ल्यापासून दीड किलोमीटर पुढे गेल्यावर 'काबो-डी-रामा व्हयू पॉईंट' (Cabo De Rama Viewpoint) असे ठिकाण आहे तिथून लांब पर्यंत पसरलेल्या समुद्रकिनाऱ्याचे खूप सुंदर दृष्य बघायला मिळते. त्या ठिकाणी टिपलेले दोन फोटोज -
.
.
.
ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला...
क्रमश: