नमस्कार मंडळी
माझा एक मित्र दरवर्षी आळंदी ते पुणे वारी करतो आणि मी दरवर्षी त्याला "येतो" म्हणुन आळशीपणा करुन जात नाही. पण यावर्षी जमवुच असे ठरवले आणि माउलींच्या कृपेने ते साधलेसुद्धा. तर यावर्षीच्या वारीची काही क्षणचित्रे देतो आहे.
सकाळी ६ वाजता मनपाला भेटायचे ठरले होते. पी एम पीची नेहमीप्रमाणेच प्रवाशांविषयी अनास्था. ताटकळत उभी असलेली माणसे, हरवलेले चालक्/वाहक, भोसरी फाट्याला जायला कोणती बस लागणार हे माहिती नसलेले कंट्रोलर, कोणतीही बस आली की आशाळभूतपणे धावणारे प्रवासी, एकुण सगळा सावळा गोंधळ
शेवटी एकदाची योग्य बस मिळाली आणि प्रवास सुरु झाला
यथावकाश गाडी भोसरीला पोचली आणि तिकडुन चर्होली फाट्याला रिक्षा करुन पुढे निघालो. वाटेत असे ट्रक दिसु लागले.
आणि वातावरण भक्तिमय होउ लागले.
वारकर्यांच्या स्वागताला उभा असलेला विठुराया
कुठे एका तालात चाललेले वारकर्यांचे जत्थे तर कुठे पालखीपासुन जास्त अंतर पडल्याने विसावलेले वारकरी
वाटेत थांबुन आम्हीसुद्धा पोटपूजा करुन घेतली
थोरले पादुका मंदिराजवळ येउन पालखीसाठी थांबलो, गंध बिंध लावुन सजलो.
हळुहळु लगबग वाढू लागली. मुंबईत लोकल प्लॅटफॉर्मवर येण्याआधी गर्दी बघुन जसा पोटात गोळा येतो तसे काहिसे वाटु लागले
स्वानंदात निमग्न वारकरी
वय्,जातपात कशाचाही विचार न करता केवळ विठ्ठ्लाच्या दर्शनाच्या ओढीने पडणारी पाउले
आणि दुरुन माउलींचा रथ दिसु लागला
दुरुन दिसणारा रथ बघता बघता जवळ येऊन ठेपला आणि पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. बैलजोडीच्या दोन्ही बाजुस भक्कम कार्यकर्त्यांची साखळी कोणाला मध्ये घुसु देत नव्हती.
लोकांची दर्शनाची गडबड तर कारभार्यांची रथ सुखरुप पुढे नेण्याची धांदल
शेवटी एकदा पादुकांना हात लागला आणि मी धन्य झालो. मनात एक वेगळीच समाधानाची भावना होती. आज प्रथमच मी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले होते. त्या समाधानात बाजुला सरलो आणि पुढची लढाई सुरु झाली, चपला बूट शोधण्याची. दर्शन घेताना पादत्राणे रस्त्याकडेला काढली होती ती गर्दीत दिसेनाशी झाली होती. महत्प्रयासाने बूट मिळाले आणि मी दुसर्यांदा धन्य झालो. अनवाणी घरी जायचे संकट टळले.
आता मुख्य काम झाले होते आणि आमचा वारीबरोबर पायी प्रवास सुरु झाला. मुख्य चौकात आल्यावर नजरेला पडले सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची उभारलेली स्टेजेस, ध्वनीक्षेपकावरुन दर मिनिटाला केल्या जाणार्या उबगवाण्या घोषणा आणि वारकर्यांना पाणी, केळी,राजगिरा लाडु असे काय काय वाटप करुन पुढे पुढे करण्याची केविलवाणी धडपड. सरावलेले वारकरी जे मिळेल ते घेउन पिशवीत टाकत होते, तर काहीजण काही न घेता पुढे सरकत होते. एकुणात घेणार्यांपेक्षा वाटणारेच जास्त बिच्चारे वाटत होते. स्टेजवर मिनरल वॉटरच्या बाटल्यांचे डोंगर कसे संपवायचे याची काळजी त्यांच्या चेहर्यावर दिसत होती. दुसरीकडे केळ्यंची साले, रिकाम्या प्लास्टिक बाटल्या ,ग्लास यांचे खच दिसु लागले. पण त्यांचे फोटो इथे टाकत नाही.
मात्र अनेक ठिकाणी घरगुती गट सुद्धा केळी,पाणी,चहा,लाडु वगैरे घेउन उभे राहिले होते. मुले,महिला कोणीही मागे नव्हते. ते बघुन मात्र फारच कौतुक वाटु लागले. ना कुठला बॅनर ना काही, फक्त माऊलींची सेवा एव्हढीच भावना होती त्यांची.
दोन तीन तास चालल्यावर आमची टिम विश्रांतवाडीचौकात पोचली. स्वागताला या मोठमोठ्या लक्षवेधक रांगोळ्या
जेवायची वेळ झाली होती त्यामुळे जोशी वडापाव वर ताव मारला
आता पावले उचलणे कठीण जात होते. कदाचित पोट भरल्याने असावे. पण कोणत्या ना कोणत्या दिंडीबरोबर भजने म्हणत चाल सुरु ठेवली. उन वाढले होते, मधेच काही थेंब पाउस पडला पण फार काही दिलासा मिळाला नाही. येरवडा,बॉम्बे सॅपर्स, संगमवाडी रस्ता असे करत करत साधारण २ च्या सुमारास आम्ही अखेर संचेतीला पोचलो.
या सावळ्याला नमस्कार केला आणि मनपाला येऊन वारी संपवली.