"ए.. दगडं कशाला मारतो आहेस भाड्या.. एवढ्यात चढली काय?"
"मी नाही.. त्या झाडाच्या फांदीनं मला कानफटवलंय आत्ताच.."
"आँ? अरे मला वाटलं तुम्ही दोघांनी हाणलंय मला आत्ता.."
तेवढ्यात त्या काळोख्या रात्रीत, एक कानठळ्या बसवणारा आवाज घोंगावायला लागला.. अन् मग त्या तिघांची पाचावर धारण बसली.
रात्रभर फांद्यांच्या थपडा खात, टोकदार दगडांचा मार झेलत, थंडीनं कुडकुडत जागून काढल्यावर; स्वतःला सावरत कसेतरी ते गडावरनं उतरायला लागले.
"ख्या ख्या ख्या".. गडाच्या भिंती, झाडं, माती, गवत, दगडं, वारा सगळी त्या दारुड्यांना स्वत: दिलेल्या चोपावर जाम खूष होऊन खदखदा हसत होती..
"एखादं तरी मरतंय या वात्रटांकडून एक दिवस..", स्वतःशीच हसत तो गड पुन्हा महाराजांच्या आठवणीत गुंग झाला!