गुजरात सहल २०२१_भाग ७-अडलज वाव व अहमदाबाद

आधीचा भाग येथे वाचा
गुजरात सहल २०२१_भाग ६-जुनागड

सहलीचा नववा दिवस.
अहमदाबादला रात्री उशिरा पोहचून झोपेपर्यंत खूप उशीर झाला होता तरीही नाश्ता आटोपून नऊ वाजता सर्वजण अडालज वावला जाण्यासाठी गाडीत येऊन बसले होते. हॉटेलपासून अंतर अर्ध्या पाऊण तासाचेच (२०किमी) होते . दहाच्या आतच अडालजला पोहचलो.
अडालज गावातील ही पायऱ्यांची विहीर अडालज वाव किंवा रुडाबाईनी वाव नावाने ओळखली जाते. राणा वीर सिंग याने या विहिरीचे काम सुरु केले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी राणी रुडाबाईने ही विहीर सन १४९८-९९ सालात बांधली होती. विहीर बांधण्यामागचा उद्देश प्रजेकरिता व यात्रेकरूंना पाण्याची सोय व्हावी, घटकाभर आराम करता यावा हा होता. स्थानिक लोकांसाठी या जागेचे आध्यत्मिक महत्वही होते.

सुरुवातीलाच दिसणारा फलक व मंदिर

विहिरीच्या पश्चिम बाजूस आवारात प्रवेश करण्याच्या ठिकाणी तिकीट खिडकी असून माणशी रु.२५/- आकारल्या जातात.

विहीर उतरायला सुरुवात करतांना

विहिरीची बांधकाम रचना उत्तर - दक्षिण असून दक्षिण बाजूकडून पायऱ्या उतरण्यास सुरुवात होते. विहीर पाचमजली असून दक्षिणेकडील बाजूने तीन दिशांनी प्रवेश करता येतो. काही पायऱ्या उतरल्यावर हे सर्व रस्ते पहिल्या मजल्यावर एका चौरस मोकळ्या जागेत एकत्र येतात. येथे छताकडील अष्टकोनी मोकळ्या जागेतून उजेड पडतो. इतर भाग झाकलेला असल्या कारणाने दुपारच्या वेळेसच विहिरीत ऊन पडू शकते ज्यामुळे विहिरीच्या आतले तापमान बाहेरच्यापेक्षा कमी राहते.

पहिल्या मजल्यावरील या लँडिंगच्या चार कोपऱ्यांमध्ये छोट्या खोल्या असून अतिशय सुंदर नक्षीकाम केलेल्या खिडकी-सज्जे व दरवाजे दिसतात.

उजेड, ऊन येण्यासाठी छताची अष्टकोनी मोकळी जागा व बाजूचे कोरीव नक्षीकाम

येथून उत्तरेकडे पायऱ्या उतरत जातात. एक एक मजला खाली उतरत जात असताना अतिशय कलात्मक असे विहिरीचे खांब व तुळया आपल्या नजरेस पडतात.

बाजूच्या भिंतींवरही अनेक भौमितिक ,फुले, प्राणी व मानवी शिल्प दिसतात

वेगवेळ्या मजल्यांवरून दिसणारी विहीर

सर्वात तळाचा मजला. येथे पाण्याचे कुंड आहे. ज्यामधून वाटसरूंना पिण्यासाठी पाणी घेता येत असे.

येथून वरच्या मजल्यांचे अतिशय छान दर्शन होते. याच्यापुढे अगदी शेवटी उत्तर बाजूस विहीर आहे पण सध्या तिकडे जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे.

पाण्याचे कुंड व तेथून दिसणारे वरचे पाचही मजले.

कुठलेही सिमेंट न वापरता एकात एक दगड अडकवून केलेली बांधकाम रचना

विहिरीचे छत. विहीर व पाण्याचे कुंड असलेल्या जागी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

थेट पाण्याच्या कुंडाकडे जाण्यासाठी विहिरीच्या दोन्ही बाजूस असलेले चक्राकार जिने

छताच्या जाळीतून घेतलेला विहिरीचा फोटो

बाहेर एक फलक आहे त्यावरील माहितीनुसार व लोक कथेनुसारसुलतान मोहम्मद बेगडा बरोबरच्या लढाईत राजा वीरसिंग यांचे निधन झाले. मोहमद बेगडाने राणी रुडाबाईच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. बेगडाने विहीर पूर्ण करण्यास मदत करावी या अटीवर राणीने लग्नास होकार दिला. बेगडाने विहीर पूर्ण करण्यास सहकार्य केले. यामुळेच विहिरीच्या बांधकामाच्या शैलीत हिंदू, जैन यांच्याबरोबरच इस्लामिक शैलीचाही प्रभाव दिसतो. विहीरचे काम पूर्ण झाले परंतु बेगडा राणीशी लग्न करू शकला नाही कारण त्यापूर्वीच राणीने विहिरीत उडी मारून जीव दिला.
( अवांतर:बेगडाचे मूळ नाव मोहम्मद शाह. असे म्हणतात याने चम्पानेरचा पावागढ व गिरनारचा जुनागड हे दोन गड जिंकल्याने त्याला 'बेगडा' (बे-गडा ) ही उपाधी मिळाली)

दुसऱ्या एका कथेनुसार विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर बेगडाने कारागिरांना प्रश्न विचारला 'असेच बांधकाम तुम्ही पुन्हा करू शकाल का? उत्तर होकारार्थी आल्यावर असे निर्माण परत होऊ नये याकरिता सर्व कारागिरांची हत्या करण्यात आली.

विहिरीच्या वरील सहा कबर व आजूबाजूचा परिसर

येथून निघून आम्ही गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. या मंदिरासाठी प्रवेश विनामूल्य आहे. मंदिरात मोबाईल फोन, कॅमेरा नेण्यास सक्त मनाई आहे.
स्वामीनारायण पंथाचे हे मंदिर आद्य गुरु भगवान श्री स्वामी नारायण यांना समर्पित आहे.
मंदिर गुलाबी रंगाच्या वाळूकाश्म दगडापासून साकारण्यात आले आहे. मंदिराच्या तळमजल्यावर 'हरी मंडपम' हे पवित्र स्थान आहे. येथे स्वामीनारायण व त्यांचे शिष्य यांच्या प्रतिकृती स्थापित आहेत. पहिल्या मजल्यावर श्री स्वामी नारायण यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्रण आहे.
मंदिराचा परिसर २३ एकर परिसरात असून आकर्षक बगीचे, लाईट अँड साउंड शो, संध्याकाळचा संगीत कारंजे प्रदर्शन इ. गोष्टीही पाहण्यासारख्य आहेत. आम्ही मात्र मुख्य मंदिर व थोडासा आजूबाजूचा परिसर पाहून परत फिरलो. आठवण म्हणून
शंभर रुपये देऊन मंदिरातर्फे नेमलेल्या फोटोग्राफरकडून एक फोटो काढून घेतला. (या एकाच जागेहून मंदिराच्या दिशेने रोखलेल्या कॅमेरात आपला फोटो काढून मिळतो)

जेवणानंतर सायन्स सेंटर बघायची इच्छा होती पण रविवार असल्याने तिकिटासाठी खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या. काल रात्री उशिरा झोपून आज लवकर उठलो होतो तसेच कालचा गिरनार पर्वत चढाईचा थकवाही होता त्यामुळे आजचे पर्यटन स्थळ दर्शन थांबवून हॉटेलवर परत आलो.
थोडासा आराम करून राहिलेला वेळ शॉपिंगला जाऊन सत्कारणी लावण्याबाबत महिलांचे एकमत झाले. हॉटेलपासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरच बाजार असल्याचे कळले किंवा असेही म्हणता येईल की या सर्व गोष्टींचा विचार करूनच हॉटेल ठरविले होते. पायीच निघालो. आधी लागला लाल दरवाजा येथील बाजार. अहमदाबादमधील अगदी स्वस्त बाजारांपैकी एक. येथे लहान मुलांचे कपडे, बूट-चप्पल, इलेकट्रॉनिक वस्तू, आर्टिफिशियल ज्वेलरी, घरातील सजावटीच्या वस्तू इ.कमी किमतीत मिळू शकतात. घासाघीस करण्याचे कौशल्य हवे. आम्हाला काही चांगल्या कपड्यांची खरेदी करायची होती. शोध घेत पुढे निघालो. शेवटी पोहचलो एकदाचे इच्छित स्थळी. "रतन पोळ" बाजार. साडी, ड्रेस मटेरियल, शर्ट, पॅन्ट इत्यादींची शेकड्याने दुकाने येथे आहेत. कमी किमतीपासून अतिशय महागडे कपडेही येथे विक्रीस आहेत. किरकोळ तसेच ठोक विक्रीचीही दुकाने आहेत. येथे किमतीची घासाघीस नाही. मनासारखी खरेदी झाली. साडे आठ वाजले होते. बाजार बंद व्हायची वेळ झाली होती.
आजची खरेदी आटोपल्यावर खादाडीसाठी जायचे ठरले होते. येथील मानेक चौकातील खाऊ गल्ली खूप प्रसिद्ध असल्याचे ऐकले होते. कापड दुकानदाराला पत्ता विचारला तर त्याने सांगितले या गल्ल्लीतून बाहेर पडल्यावर रास्ता ओलांडला कि तुम्ही थेट खाऊ गल्लीतच असाल. मानेक चौक हा सकाळचा भाजी बाजार, दुपारी ज्वेलरी दुकाने व रात्री स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. रात्री दुकाने बंद झाली की गल्लीत खाद्य पदार्थांचे स्टॉल लागण्यास सुरुवात होते. जिलेबी, पावभाजी , चाट, डोसा, सॅन्डविच, आईस्क्रीम, कुल्फी अशा अनेक प्रकारांचे स्टॉल येथे लागतात.
खरेदीसाठी आमचा ग्रुप विखुरला होता. त्यांची वाट बघत आम्ही एक एक पदार्थ चाखायला सुरुवात केली.

पोटॅटो ट्विस्टर विथ पेरी पेरी अँड मेयॉनीज

सेवपूरी टोकरी चाट व दही शेव पुरी

चीझ पायनापल सॅन्डविच विथ आईस्क्रिम .

जामून शॉट/किवी शॉट/पेरू शॉट

विखुरलेला ग्रूप थोड्या वेळात आम्हाला येऊन मिळाला. त्यांच्याबरोबर डोसा, रबडी, कुल्फी झाली.

रात्रीचे अकरा वाजायला आले तरी खव्वयांची गर्दी ओसरत नव्हती .
गजबजलेली खाऊगल्ली

आमचं खाऊन झालं होतं . निघायचा निर्णय घेतला व रिक्षाने पाच-दहा मिनिटात हॉटेलवर पोहचलो.

क्रमश:

पुढचा व अंतिम भाग: मोढेरा सूर्य मंदिर व रानीकी वाव