महाराष्ट्र सत्तानाट्य २०१९, विश्लेषण

नोटः प्रत्यक्ष राजकारणावरील हा माझा अलिकडच्या काळातील पहिलाच लेख... मला वयक्तीक राजकिय मते आहेत. पण तीच मते बरोबरच आहेत असा माझा कुठलाही दावा नाही. एक सामान्य माणुस म्हणुन समोर जे दिसते आणि जे मनाला वाटते यावरुन हे लिखान आहे. त्यात मला देशातील ३ नेते सर्वात जास्त आवडतात आणि ते आहेत स्व. माननीय अटलबिहारी वाजपेयी, लोकनेते श्री. शरद पवार आणि हिंदू ह्रद्य सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे. तसेच, राजकीय विचार हे प्रत्येक माणसाचे असावेतच, या मताचा मी आहे. त्यात सर्व पक्षाचे समर्थन करणारे माझे अगदी जवळचे मित्र आहेत त्यामुळे हेच बरोबर आणि तेच चुकीचे असे माझे म्हणणे नाही. माझी मते काही चुकीची किंवा काही बरोबर असतीलही पण ती माझी आहेत त्यामुळे चुकभुल देणे घेणे. आणि संपुर्ण वाचल्यानंतर मत प्रदर्षण करणे आणि वयक्तीक हेवे दावे करु नये.
--

विश्लेशण करायचे झाल्यास, सुरुवाती पासुन शेवट पर्यंत काय झाले हे लिहायला आणि पुन्हा वाचायला जरा जास्त बोर वाटेल. त्या पेक्शा आपण घडलेल्या गोष्टी आणि त्याबद्दलचे राजकारण आणि विश्लेषण पाहु, घटनांचे क्रम मात्र मी उलटेसुलटे कसेही घेतो आहे, त्यामुळे सरळ वाचण्याचे बोरिंग काम टाळता येवू शकते असे वाटते.

१. महायुती तुटली:

महायुती तुटली याचा मागमुस जर काढायचा म्हंटला तर त्याची पाळेमुळे २०१४ पासुन पाहता येतात. मुळात २०१४ ची निवडणुक च युती ने एकत्र लढवलेली नव्हती. त्यातच, उद्धव ठाकरे यांचे, 'युतीत आम्ही २५ वर्ष सडलो' हे वाक्य सगळे काही बोलुन गेले. आणि खरी युती तिथेच तुटली.
तरीही २०१४ ते २०१९ सेना आणि भाजपा ने एकत्र सरकार दिले असे आपण म्हणु. पण माझ्या मते, २०१४ ला भाजपा च्या १२२ जागा निवडुन आल्या होत्या, आणि भाजपाला बिनशर्त बाहेरुन पाठिंबा देवून शरद पवारांनी एका अर्थी शिवसेनेला सांगितले होते, की आता नाईलाज आहे, त्यामुळे गप तुम्ही दोघे एकत्र येवुन सरकार चालवा आणि शिवसेना पक्षात होऊ पाहणारी फुट थांबवा. मला तरी हेच वाटते. जर भाजपा बरोबर सेना गेली नसती आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेवून भाजपा आपली नैतिकता अबाधित ठेवू शकत नसल्यास, त्यांनी शिवसेनेला उभे खिंडार पाडलेच असते असे मला वाटते..शिवसेनेत फुट अश्या संधर्भातील बातम्या तथाकथीत सूत्रांनी तेंव्हाही दिल्या होत्याच.
त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात मात्र शिवसेनेच्या या नाईलाजाचा फायदा भाजपाने घेतला आणि शिवसेनेची सरकार मध्ये असुन ही जी फरफट दिसली ती नक्कीच एक मित्रपक्ष या नात्याने चांगली नव्हती. हे उद्धव ठाकरे यांना कळत नव्हते का ? ते त्यांना नक्कीच माहीती होते, आणि त्यामुळे 'हीच ती वेळ' या टॅग लाईनचा खरा अर्थ आपणाला निवडुनक रिझल्ट नंतर लक्षात यायला लागतो.
२०१४ पासुन, कुठलाही निर्णय हा फक्त भाजपा ने घेतलेला निर्णय हे असेच दिसले गेले , शिवसेना बरोबर असली काय किंवा विरोधात उभी राहिली काय , जे झाले ते भाजपाचेच म्हणण्याने झाले हे समोर दिसत होतेच.
त्यामुळे आता २०१९ विधानसभा मध्ये १०५ विरुद्ध ५६ हे तथाकतीत जागांवरुन पद आणि जबाबदार्‍या वाटप शिवसेनेला मान्य नव्हतेच आणि नव्हे ते नसावेच. कारण याच फॉर्मुल्याने ते कधीच सत्तेत असुनही कुठल्याही निर्णयप्रक्रीयेवर कधीच दिसले नसते. भले सांखिक द्रुष्ट्या त्यांनी मुख्यमंत्री पद मागुच नये असे दिसत असले तरी २०१४ पासुनच्या राजकारणात झालेल्या फरफटीचाच तो बदला होता हे वेगळे सांगावे लागुच नये.
तरीही शिवसेने ने येथे जी क्लिप दाखवली ज्या पत्रकार परिषेदेत, खुद्द अमित शहांबरोबर, देवेंद्र फडणवीस सांगतायेत, की लोकसभेला आम्ही युती केली आणि विधानसभेबद्दल आम्ही पद आणि जबाबदार्‍यांचे समसामान वाटप करु हे जनते समोर होते. त्यामुळे राजकिय द्रुष्ट्या पद म्हणजे मुख्यमंत्री पद पण हे जसे भाजपाचे लक्षात आले नाही, परंतु उद्धव ठाकरेंना एक राजकारणी म्हणुन नक्कीच हे वाक्य मोठे करुन गेले.
जसे ५६ या संख्येंवरुन उद्धव यांनी मुख्यमंत्री पद मागणे चुकीचे वाटत असले तरी पद आणि जबाबदार्‍यांचे सम समान वाटप करु असे म्हणणारे फडणवीस ही चुकीचेच ठरतात.(कोणाला क्लिप हवी असेल तर लिंक पुन्हा देण्यात येइल)
आणि या सर्व गोष्टींचे परिणाम युती तुटण्यात झाले. यात कुठे ही काँग्रेस शी हातमिळावणीच करायची होती. शरद पवार यांनीच युती तोडली , आम्हीच कसे हिदुत्व वादी, शिवसेनेनी हिंदुत्व सोडले असल्या कुठल्या ही शंका घेणे मला रास्त वाटत नाही.
जे लोक भाजप + राष्ट्रवादी च्या वेळेस सत्ता पाहिजेच त्याशिवाय कामे करता येत नाही असे जे म्हणतात, तेच शिवसेनेने ही केले आहे . सत्तेतील मुख्यपात्र होऊन राजकारण करणे हेच कदाचीत त्यांचे ध्येय होते, आणि हीच ती वेळ होती.

२. शरद पवार आणि विशानसभा निवडणुकांचा प्रचार:

शरद पवार, या व्यक्ती बद्दल आपण शब्दात जितके लिहिल तेव्हडे थोडेच आहे, तरी या निवडणुकी पुरते मी बोलतो.
खरे तर राज्यात विरोधी पक्षच उरला नाही, समोर पहिलवानच नाही अशी वल्गना भाजपा आणि श्री देवेंद्र फडणवीस करत राहिले आणि या भट्टीत शरद पवारांसारखे सोने पुन्हा जास्तच चमकू लागले हे आता निवडणुकानंतरही कळालेच असेल.
खरे तर शरद पवार अलिकडच्या काळात, लोककार्‍यातुन नाही पण सक्रिय राजकारणातुन थोडे अलिप्त झालेत काय असे वाटत असतानाच, लोकसभेला खुद्द अमित शहा यांनी बारामतीत येवुन, 'शरद पवार को उखाड देंगे' हे वाक्य म्हंटले आणि शरद पवार सारख्या मवाळ असणार्‍या राजकारण्याला डिवचले, त्याचे पडसात सातार्‍याजवळील निवडणुकीत शरद पवारांच्या भाषणात दिसले.. आणि 'काय उखडायचे ते उखडा ' या प्रत्युतरात त्यांना काय बोलायचे आहे ते कळाले.

पुढे २०१४ च्या विधानसभेचा संपुर्ण महा आघाडीचा निवडणुक प्रचारच त्यांनी आपल्या अखत्यारीत घेतला, आणि सोबतीला मात्र अजित पवार , राहुल गांधी यांना त्यांनी घेतले नाही. राहुल गांधींना या प्रचारात जाणिव पुर्वक न आणाण्याचे काम बहुतेक शरद पवार यांनीच केले आहे असे माझे मत. कारण भाजपा, हा वयक्तीत हल्ला करुन या नेत्यांविरोधात रान उठवून मते मागील आणि जे साध्य करायचे आहे ते साध्य होणार नाही, ह्याची चुनुक नक्कीच त्यांनी आधी ओळखली असणार.
त्यातच त्यांना भाषणात साथ मिळाली राष्ट्रवादीचा स्वच्छ असलेला आणि नैतिक मुल्य जपणारा नेता, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची.

खरे तर शरद पवारांचे या निवडणुक प्रचाराचे रुप पाहिले तर , कायम जुनी जाणती, म्हतारी कोतारी माणसे त्यांना साहेब म्हणुन त्यांच्या बाजुनी उभी रहायची. पण यावेळेस प्रथमच मी असे पाहिले की तरुणांचे जथ्थेच जथ्थे शरद पवार यांच्या मागे उभे होते. ठिकठिकाणी जावून केलेल्या भाषणात तरुणांचा जो जल्लोष दिसत होता, तो स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या सभे इतका नसला तरी तसाच जल्लोष शरद पवार यांच्या बरोबर होताना दिसत होता. आणि यातुनच शरद पवार काय चीज आहे हे पुन्हा महाराष्ट्र पाहत होता.

१९७८ साली एक छोटीशी केस त्यांच्या नावावर होती, त्या नंतर आजतायग कीतीही , कसले ही आरोप झाले तरी त्यांच्या नावावर एक ही केस नाही, त्यामुळे २००२ च्या दंग्यातुन स्पष्ट सुटका झालेले मोदी पाहिले तरी केसच न दाखल झालेले पवार पाहिले की कोणी लीगली त्यांना काहीच बोलू शकत नव्हते, त्यामुळे तातपुरते, संबंध नसताना त्यांच्या मागे ईडी ची पिडा लावून आपण निवडणुक वेगळ्याबाजुला न्हेवू हा डाव ही शरद पवार यांनी लिलया पेलला.. आणि भाजपाचा मुखवटा फाडायला त्यांनी जणु तेथुन सुरुवात केली...

त्यातच, भाजपा ने , राष्ट्रवादीला उभी भेग पाडत त्यांचे कित्येक आमदार, आणि त्यांच्याबरोबर हजारो नगरसेवक आपल्या पक्षात घेवून राष्ट्रवादी संपली असीच भावना ठेवली आणि तेथेच भाजपाच्या नैतिकतेची कसोटी चालु झाली. उलट अजित पवार वगळता, भ्रष्टाचाराबाबत आरोप ठेवलेलेले सगळे नेते भाजपात गेले, आणि एक नवीनच फळी राष्ट्रवादीने निवडुन आणली हे राष्ट्रवादीच्या विजयाचे द्योतक माणले पाहिजेच.
त्याच बरोबर कॉन्ग्रेस चे ही ४४ आमदार निवडुन आणायला राष्ट्रवादीची मदत झालीच हे कॉन्ग्रेस ही नाकारु शकत नाही.
वंचित ची साथ जर महाआघाडीला असती तर चित्र अजुन थोडे वेगळे असते असे मला वयक्तीक वाटते. मतांच्या टक्केवारी, आमदारांचे आकडे हे संख्येवरुन चित्र जरी दिसत असले तरी लोकांची माणसिकता ही वेगळी होती हे कोणीच नाकारु शकणार नाही हे ही तितकेच खरे.

३. २३ नोव्हेंबर ला देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ :

खरे तर, शिवसेना आमच्या सोबत येत नाही असे म्हणुन आम्ही विरोधात बसू या भुमिकेशी ही प्रतारणा होती. त्यात अंगी असलेला अहंकार, आम्ही काहीही करु शकतो, कसे ही करुन सरकार बनवु शकतो, आमच्या पुढे कोणी किस झाड की पत्ती अश्या पद्धतीचा अहंकार असल्याने सद्वविवेक बुद्धी ने काम न करता, ज्या पक्षा वर विशेष करुन ज्या माणसावर सर्वात जास्त आरोप केले, त्यालाच हाताशी धरुन, राष्ट्रवादीला पुन्हा उभी भेद करुन राष्ट्रवादी बरोबर, नव्हे अजित पवार बरोबर पुन्हा सत्ता स्थापन करणे हे सर्वशी चुकीचेच होते.

अजित पवार का आले, यामागे कोण होते, हे जर तर, शंका कुशंका इथे बोलण्याचा फायदाच नाही. ज्या अजित पवार विरुद्ध , ज्या राष्ट्रवादी बद्दल देवेंद्र फडनवीस आणि भाजपा बेंबीच्या देठा पासुन ओरडत होती.. त्यांच्या बरोबर पुन्हा सत्ता स्थापण करताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नक्की काय दाखवत होती हेच कळाले नाही.
या मुळे पार्टी विथ डिफरंस, भ्रष्टाचार विरोधी भुमिका, सिंचन घोटाळ्याबद्दल केलेली २०१४ पासुनची वक्तव्य याचा कुठलाच ताळमेळ दिसत नव्हता. दिसत होती फक्त सत्तापिपासू व्रुत्ती

त्याही पुढे जावून, महाविकास आघाडीचे सरकार उद्या उद्धव ठाकरेंचे नाव घोषित करुन , सत्ता स्थापनेचा दावा दाखल करणार म्हंटल्यावर, आदल्या रात्रीत सारी सुत्रे हालवुन, राज्यपालांना जागे करुन पहाटेच राष्ट्रपती राजवट घालवून, भुरट्यासारखे सकाळीच शपथ विधी उरकून आपण कसे काहीही करु शकतो हे दाखविण्याची नीच वृत्ती सरळ सरळ दिसत होती..
ज्या पक्षाचे बहुसंख्य आमदार आणि नेते आपल्या बाजुने नाहीत, पण त्यांचे तथाकथीत गटनेते आणि कागदोपत्री तांत्रीक बाजू आपल्या बाजुने आहेत , आणि आपण येनकेन मार्गाने सत्ता स्थापण करु, आणि गटनेत्या विरुद्ध मतदान केल्याने राष्ट्रवादीचे आमदार अपात्र ठरवु आणि आपले बहुमत सिद्ध करु असले कपटी राजकारण सरळ सरळ दिसत होते. जे त्यांनी कर्नाटक, गोव्यात, मनिपुर ला केले तश्याच, किंवा त्याही पुढे जावून करण्याची ही व्रुत्ती होती यात कोणाचे दुमत नसावे.
पण या मर्गाने सत्ता हाती आलि असती काय किंवा नाही आली काय, नैतिकतेचे जे दिंडोरे बडवले जात होते, तो नैतिकतेचा ढोलच भाजपने स्वताच फोडला .
फडणवीस सरकारणे बुधवारी सायंकाळी पाच वाजे पर्यंत बहुमताचा कौल घ्यावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला आणि गुप्त मतदान ऐवजी प्रक्रीयेचे थेट प्रक्षेपण करावयास लावून , ऑपरेशन कमळ म्हणुन केल्या जाणार्‍या बाता गप्प करुन राजिनामा नाट्य रंगले गेले.

उलट, शिवसेना कॉन्ग्रेस बरोबर गेली या एका कारणाने, आपल्या विचारधारेची त्यांची मते पुढील निवडनुकीत ते आपल्याकडे वळवु शकले असते, पण ती संधी त्यांनी अजित पवार या व्यक्तीशी सलगी करुन घालवली आणि हा भाजपच्या नैतिकतेच्या ह्रासातील महाराष्ट्रातील एक ठळक गोष्ट ठरेल यात मला काही शंका वाटत नाही.

त्याही पुढे जावुन, आशिश शेलार सारखे नेते , ज्या पद्ध्तीने माध्यमांपुढे येवून, आमच्या कडे गटनेता असल्याने आम्हीच बहुमत सिद्ध करु अश्या पद्धतीची जी भाषा करत होती ती नक्कीच पुन्हा अरेरावी, अहंकाराचीच होती हे स्पष्ट दिसत होते.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताना ही शिवसेनेला लावलेली दुषणे नक्कीच त्यांच्या सारख्या उच्चविभुषित व्यक्तीला शोभणारे नाही, राजकारणात जे झाले ते झाले, पण पुन्हा सोडुन जाताना पुढील सरकारला शुभेच्छा देवुन त्यांनी निरोप घ्यायला हवा होता, पण अहंकाराचा फुटलेला ढोल भले भले पचवु शकत नाहीत हे खरे आहेच.

या सगळ्या प्रकारणात , आयटीसेल ने पसरवलेले , तथाकथित माणलेल्या चाणक्याचे चहा पितानाचे फोटो, त्यांचे समर्थन करणारे त्यांचे समर्थक यांची किव वाटत होती.. त्या दिवशी मी नेमके पुण्यापासुन बाहेर होतो, आणि मला हे घडलेले काही माहिती नव्हते. जेंव्हा मला पहिल्यांदा हे कळाले की भाजपा ने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शपथ घेतली हे ऐकुन मला धक्का बसला, आणि शरद पवार यांच्या बद्दल असलेला आदर एका क्षणात धुळीला मिळाला, नंतर कळाले हा पाठिंबा त्यांचा नाही.

पण मला प्रश्न पडतो, बिजेपी चे जे समर्थक आहेत हे मात्र तरीही या असल्या युतीबद्दल खुष होऊन, कशी जिरवली शिवसेनेची, (नव्हे ती भाजपाची पण भुमिका होती म्हणा) अश्या अविर्भावात वागत होती. आणि हे नक्कीच योग्य नाही. आपला ३० वर्षापासुन असलेला सहकार्‍याची कशी जीरवली, आपण कसे चाणक्य , आपण कसे काहीही करु शकतो असा भाव कधीही वाईटच.
रावण पण अश्याच अंहकाराने मेला.. आणि अहंकाराचे दहन हे होतेच होते. त्यातच जाता जाता ९ सिंचन फाईल्स ही बंद केल्या गेल्या हे विशेष.. असो.

४. शरद पवार आणि श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

माझे एक स्पष्ट मत आहे, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे हे महाराष्ट्रात फक्त दोनच व्यक्ती करु शकत होत्या, एक म्हणजे खुद्द स्व. बाळासाहेब ठाकरे आणि दूसरे म्हणजे श्री शरद पवार. आणि ही नक्कीच अतिशयोक्ती नाही. आणि भाजपा, मोदी, शहा हे कधीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकले नसते ही काळ्या दगडावरची रेघ आहे, आणि आता यावेळेस २.५ वर्षे ही मुख्यमंत्रीपद आपल्या हातुन देण्यास ते तयात नव्हते हे दिसून आलेच.

शरद पवार ह्या माणसाचे व्यक्तिमत्वच असे आहे. तो मैत्रीला जागणारा माणुस आहे, बाळासाहबे आणि शरद पवार हे किती चांगले मित्र होते हे वेगळे सांगणे न लागे. राजकिय मतभेद आणि नात्यातील मैत्री हे शरद पवारां येव्हडे कोणीच निट संभाळु शकत नव्हते.
आणि जेंव्हा उद्धव ठाकरे २.५ वर्षांसाठी शिवसेनेसाठी मुख्यमंत्री पद भाजपाला मागत होते, तेंव्हाच मी माझ्या मित्रांना सांगितले होते की, उद्धव ठाकरे हे ५ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. आणि ते भाकित आज खरे झाले.

शरद पवारांनी उद्धव च्या पाठिमागे सर्व शक्ती मन लावून लावली, आणि याला कारण होते त्यांचे आणि बाळासाहेबांचे मैत्रीचे नाते. शरद पवारांवर खंजीर खुपसणारे, बेभरवाशी असे कितीही आरोप होत असले तरी वयक्तीक रित्या मला तरी ते कधीच मैत्रीच्या नात्याला तडे जावून देणारे वाटत नाहीत.
त्यामुळेच श्री नरेंद्र मोदी सुद्धा त्यांना आपले राजकीय गुरु मानतात, आणि राजकारण त्यांच्याकडुन शिकलेत असे बोलतात. देशातील असे कितीतरी वेगवेगळे नेते आहेत त्यांचे शरद पवार यांच्याबरोबर चांगले नाते आहे. ( अवांतर , १९७८ चे उदा. देवून शरद पवारांनी पाठित खंजीर खुपसला असे बोलले जाते. मी तेंव्हा जन्मलो पण नव्हतो त्यामुळे त्यावर बोलत नाही. पण काय माहीत , तेंव्हाही आणिबाणीच्या तडाक्यात, सुधाकर रावांची फरफटच चालु असेल म्हणुन शरद पवार यांनी यशवंत रावांच्या म्हणण्याने राकराकरण केले असेल, हा मुद्दा वेगळा आहे आपण पुलोद च्या वेळेस चे वेगळे बोलू)

स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया ताईंना पहिल्यांदा बिनविरोध राज्यसभेवर निवडुन आणले होते, आणि शरद पवारांनी त्याची परतफेड उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन केली हे नक्कीच. आणि यामुळे २३ तारखेला जे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानी फडणवीस मुख्यमंत्री झाले असे सकाळी कळाले, तेंव्हा मला ९९% वाटले होते , हे शक्य नाही. आणि १ % जर असे झाले असते तर शरद पवार या नावावरुन माझा पहिल्यांदा भरोसा उठला असता.. पण शरद पवार हे जनतेच्या मनातील पण ओळखतात, आणि कधी कुठल्या वेळी कुठली चाल खेळायची हे त्यांच्या व्यतिरीक्त कोणालाच जास्त कळत नाही. अगदी साम दाम दंड भेद वापरणारे अमित शहा पण त्यांच्यापुढे फिकेच.
त्यामुळे मला राष्ट्रवादीची २०१४ ची टॅग लाईन जास्त आवडते," मी प्रचंड आशावादी, हे भविष्य माझ्या हाती.. "

उलट ह्या निभावलेल्या मैत्री मुळे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दलचे मनातील स्थान आणखिनच घट्ट झाले. आज बाळासाहबे ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी सुद्धा हवे होते असे मला मनोमन वाटते.

५. श्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राबाहेरच्या मुद्द्यांचा प्रचार

खरे तर, वयक्तिक विचाराल तर निवडनुक डिक्लेअर होण्या अगोदर मला श्री देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. देवेंद्र फडणवीस हे उच्च विभुषित आहेत. त्यांची प्रशासनावरील पकड ही चांगली आहे. कॉन्ग्रेस संपवल्यात जमा होती. आणि राष्ट्रवादीतील फक्त १७ आमदार सोडले तर बाकी सगळे आणि त्यांच्या बरोबर कित्येक नगरसेवक तसेच कॉन्ग्रेस चे आमदार ही भाजपा ने आपल्या गोटात सामिल केले होते.
परंतु त्यांच्या भाषणातुन , बोलण्यातून, मी..मी..मी, आम्ही, अहंकार हा जास्त दिसत होता हे भाजपा वाले पण मान्य करतीलच. त्यातच २०१४ साली 'कुठे न्हेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा' ही टॅगलाईन वापरुन लोकल मुद्द्यांवर लढवलेली निवडनुक, आणि आता स्वताच्या ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर लोकल कुठला ही मुद्दा न घेता लढवलेली हि २०१९ ची निवडनुक यात खुपच फरक जानवला. लोकल मुद्देच प्रचारात नसणे हे कशामुळे होते हे चिंतन त्यांना करावेच लागेल.
३७०, राम मंदिर, ट्रीपल तलाख बील, हे योग्यच पण त्याचा महाराष्ट्राशी डायरेक्ट काहीच संबंध नाही. निदान २०१४ च्या स्वताच्याच जाहिरातीला त्यांनी उत्तरे दिली असती तरी बहुमत हे भाजपा कडेच जास्त असते, याबाबत कोणाचेच दुमत नसावे.

मी येथे स्पष्ट सांगु ईच्छितो की, भाजपा समर्थक, भाजपा आयटी सेल हे जेव्हडे भाजपा ने ५ वर्षात केले असे म्हणतात, त्याच्या १० % जरी भाजपाने, श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात फक्त बोलले असते तरी त्यांचाच विजय होता. पण त्यामुळे कदाचीत ते गेल्या ५ वर्षात काहीच करु शकले नाहीत का? हा प्रश्न पण पुढे येतोच. भले समर्थक लिस्ट च्या लिस्ट दाखवतील, मग हेच भाजपाला का सांगता आले नाही ? हा चिंतनाचाच विषय आहे.

त्यामुळे , भाजपा समर्थकांना माझा डायरेक्ट प्रश्न आहे, तुम्ही जे भाजपा ने जे जे केले म्हणता ते ते , भाजपा स्वता का प्रचारात सांगू शकले नाहित याबद्दल त्यांना एकदा तरी जाब विचारा ..

६. तथाकथित कॉन्ग्रेस बरोबर हात मिळवनी करुन सेनेनी लाचारी पत्करली अशी दुषणे देणे

मला येथे स्पष्ट सांगायचे आहे, साम दाम दंड भेद करुन भाजपा ने कोणाशी ही कशी ही युती केली, त्यांनी कोणत्याही नेत्याला कॉन्ग्रेस आणि राष्ट्रवादीतुनही आयात केले की चाणक्य निती, भाजपा ने राष्ट्रवादी शी , नव्हे अजित पवार यांच्या शी हातमिळवणी केली की लाचारी नाही आणि शिवसेने ने कॉन्ग्रेस बरोबर हातमिळवणी केली की लाचारी ? आपण असे दुतोंडी कसे बोलु शकतो ..
गोवा, मनिपुर, कर्णाटक तसेच बिहार आणि काश्मिर मध्ये भाजपा ने काय काय केले आहे हे सगळे जाणुन आहेतच ते पुन्हा येथे लिहित बसुन वेळ वाया घालवत नाही, पण आपण केले तर चाणक्य निती आणि दूसर्‍यांनी केले तर लाचारी, ही असली सवय भाजपा ने अजुन तरी सोडावी असे मला वाटते.

विरोधात राहुन ही बर्‍याच गोष्टींवर अंकुश ठेवुन , पुन्हा पुढील निवडनुकीत आपण पुन्हा सत्तेवर कसे येवू हे भाजपा ने पाहिले पाहिजे, ना की शिवसेना कशी लाचार मग आम्ही कसे भारी हे असले आता सोडले पाहिजे ...

शरद पवार यांच्या मध्यस्थीने, कॉन्ग्रेस आणि शिवसेना एकत्र येत आहेत, कॉन्ग्रेस आधी बाहेरुन पाठिंबा देणार होती, परंतु त्यांना सत्तेत सामावुन घेवुन , बाहेरील पाठिंबा मध्येच कधीही काढु शकणारी कॉन्ग्रेसची नितीच त्यांनी येथे फोल केली. त्यामुळे सरकार मध्येच न कोसळण्यासाठी कॉन्ग्रेस ला मंत्रीपदे देवून त्यांना सरकार मध्ये घ्यावे लागले, नाहीतर जर योग्य जागा असत्या, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच सरकार आपल्याला येथे दिसले असते हे वेगळे सांगणे न लागावे..

७. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि महाराष्ट्राची आजची स्तिथी.

भाजपा ने ५ वर्षात काय केले आणि कॉन्ग्रेस ने त्या अगोदरच्या १५ वर्षात काय केले हे या लेखाचे मुद्देच नाहियेत.
तरीही महराष्ट्राची स्तिथी यावर अवती भोवती बघुन थोडक्यात बोलायचे झाले तर, शेतकरी , रस्ते, रोजगार, यांचे खरेच हाल झालेले दिसतील.
खड्ड्यांचे प्रमाण जागोजागी खुप आहे, तसेच महाराष्ट्रावर २०१४ पर्यंत जे २.५ लाख करोड असलेले कर्ज फक्त ५ वर्षात डबल म्हणजे ५ लाख करोड च्या जवळ गेले आहे.
५ वर्षांचे महाराष्ट्राचे उत्पन्न आणि हे वरचे २.५ लाख करोड चे कर्ज असे मिळुन कोठे कोठे, काय काय कामे केली गेली याची निट शहानिशा लोकांपुढे का येत नाही असे मला नेहमी वाटते.. आम्ही ५ वर्षात इतके पैसे होते आणि इतकी अशी अशी कामे केली आणि त्याला इतके इतके पैसे लागले.. हे सरळ सरळ हिशोब जनते पुढे का ठेवला जात नाही हे मला कळत नाही, आणि हे बंधनकारक असावे असे मला वाटते.

आता, ५ लाख करोडाचे कर्ज घेवून , पुन्हा सुधारणा करण्याचे इंद्रधनुष्य श्री उद्धव ठाकरे हे कसे पेलावतात हे मला पहायला आवडेल आणि या साठी त्यांना मनापासुन शुभेच्छा .

आणि मला वाटते मोदी जसे मला १० वर्ष द्या बदल करावयास असे म्हणताना दिसले, तसे उद्धव यांनी म्हणु नये असे मला वयक्तीक वाटते. जे काय दाखवायचे आहे ते योग्य पद्धतीने त्यांनी ५ वर्षात कामातुन दाखवुन द्यावे.

कॉमन मिनिमम प्रॉग्रॅम बद्दल मला आताच काही जास्त माहिती नसले, तरी कॉन्ग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी बर्याचश्या मुद्यामध्ये सैलता दखवली असली तरी राष्ट्रीय मुद्दे आणि राजकिय राजकारण हे दोन्ही वेगवेगळे ते ठेवतील या बाबत मला कोणतीही शंका नाही..

तरी शिवसेना आणि कॉन्ग्रेस एकत्र आली म्हणुन 'हिंदुत्व खतरे मे है' असे भाजपा ने आणि त्यांच्या समर्थकांनी म्हणु नये. सारे भारतीय एक आहेत आणि एकच मानले पाहिजेत.
कदाचीत भाजपा तरीही जास्तच हिंदुत्व हिंदुत्व , आणि लाचारी लाचारी म्हणत राहिला तर शिवसेने ने जास्त नादी न लागता एकच सांगावे

"हिदुत्व उन्ही का खतरे मे है, जिनका भगवान मोदी है !
फक्त, हिंदु ह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्धा लोकनेते श्री शरद पवार "

असो थांबतो...

---------------- गणेश जगताप