निवडणूक प्रचार थांबला बुवा एकदाचा....
कोणी ३७०-३७० बोंबलल तर कोणी पावसात भिजलं, कोणी नकला करून दाखवल्या तर कोणी शकला लढवून दाखवल्या. तस neutral राहून बघितलं तर सर्व पक्षांनी बौद्धिक दिवाळखोरीच दाखवलीय. चला या सर्व पक्षांनी दाखवलेल्या प्रगल्भ विचारसरणीची लख्तर काढू.
१) शिवसेना
मराठी लोकांच्या हितासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने कधी "लुंगी हटाव, पुंगी बजाव" तर कधी "मुंबई गुजरातींच्या हाती जाऊ देणार नाही" या घोषणांचा विसर पाडून चक्क गुजराती आणि तेलगू भाषेत बोर्ड लावून मतांसाठी अमराठी मतदारांपुढे लोटांगण घातल.
घराणेशाही-घराणेशाही बोंबलून गांधी-नेहरू घराण्याला दूषणे देणार्या शिवसेनेला आता आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवायचं कारण ते ठाकरे आहेत म्हणून नाही तर त्यांचा प्रशासकीय आणि राजनैतिक अनुभव दांडगा आहे म्हणून (खु-खु-खु-खु).
१५ रुपयांचा शिव वडापाव झाला आता १० रुपयात थाळी.... कर्म आमचं.
२) भाजपा
शेती, जल संवर्धन, ग्रामीण विकास आणि नागरी सुविधा या क्षेत्रात अमूलाग्र काम करूनही भाजपा महाराष्ट्रात ३७०, काश्मीर, पाकिस्तान हेच बोंबलत सुटलीय. महाराष्ट्राचा याच्याशी संबंध काय असा कुतर्क जरी करता येत नसला तरी ही विधानसभेची निवडणूक आहे. परराष्ट्र धोरण वैगरे वैगरे साठी मोदीना ४८ पैकी ४१ खासदार निवडून दिले होते की. महाराष्ट्राच्या प्रश्नांच काय?
फडणवीसांनी आपल्या कामाचा पाढा का बर नाही वाचून दाखवला? काँग्रेस आणि राष्ट्रवादी कसे वाईट आहेत ते आम्हाला माहित आहे म्हणूनच ते सत्तेबाहेर आणि तुम्ही सत्तेत आहात.
स्मार्ट सिटीच काय झालं? शेतकरी आत्महत्येची नेमकी आकडेवारी काय? ५ वर्षात आत्महत्या कमी झाल्या का? शेतमालाला रास्त हमीभाव मिळाला का? Make in Maharashtra च यश कितपत? महाराष्ट्रात ५ वर्षात किती startup चालू झाले आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले?
हे सगळं सोडून नको तेच बोंबलत बसलेयत... उगाच non-players ना नवीन संजीवनी मिळवून दिलीय.
३) मनसे
फेसबुक आणि सोशल मीडियावर बघून असं वाटते की मनसे यंदा कमीत कमी ३०० सीट जिंकेल (खुखु-खुखु).
काही वर्षांपूर्वी पर्यंत सत्ता मागणारा हा पक्ष आता दुर्री मागतोय. २०१४ ला भाजप, २०१९ लोकसभेला भ्रष्टवादीला मत द्या अस धाय मोकलून सांगणारा हा पक्ष आता मात्र स्वतः:साठी मत मागतोय.
१०४ जागांवर लढून सत्ता मिळत नसते हे साहेबांच्या लक्षात आलाय हेही नसे थोडके. ते आता सक्षम विरोधी पक्ष बनू पाहत आहेत. राज ठाकरे सारखा सक्षम माणूस विरोधी पक्षात असणे हे लोकशाहीसाठी चांगलं लक्षण आहे त्यासाठी ५ वर्ष पक्षबांधणी, पक्षसंघटन या गोष्टींवर भयंकर मेहनत करावी लागते त्याची तयारी अथवा चिकाटी पक्ष नेतृत्वात दिसत नाही.
गर्दी जमवणे आणि मत मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेच खर.
४) राष्ट्रवादी
शाह-मोदी जोडीने या पक्ष उभा चिरलाय आणि साहेब आता महाराष्ट्रभर ठिगळ लावत फिरतायत. पावसात भिजल्यामुळे निवडणूक जिंकता येते असा समज काही लोकांचा झालेला दिसतोय.
इतकी वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर, केंद्रात-राज्यात मोठी मोठी पद भूषविलेल्या साहेबांवर पावसात भिजत-भिजत प्रचार करण्याची बिकट परिस्थिती का ओढावलीय याच चिंतन न करता याचा गाजावाजा करतायत. पराभव निश्चित आणि त्यानंतर चिंतन शिबीर भरवायला वेळही भरपूर असेल.
पक्षाचं नाव राष्ट्रवादी आणि ते मुंब्र्याचं जितुददीन प्रचाराला घेऊन आलय कन्हैय्या कुमारला.... हसायचं का रडायचं?
५) काँग्रेस
Non players बद्दल keyboard बडवण्यात काहीच अर्थ नाही.. पण त्या निरूपमची अवस्था बघून अगदी असूरी आनंद झाला मात्र.
६) AIMIM, वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र हे खर्या अर्थाने पुरोगामी राज्य आहे आणि येथे जातीच किंवा विशिष्ट धर्माचं राजकारण करणारा पक्ष कधीच निवडून येत नाही. सावरकरांची हिंदु महासभा काय किंवा बाबासाहेबांची SCF काय... लोकांना असं राजकारण मान्य नाही.
समाजातील पिचलेल्या, पिछाडलेल्यांचा उद्धार व्हायचा तर त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व व्हायला हव हे खर असल तरी ते अशा विषारी विरोधातून साध्य होणार नाही. सर्वसमावेशक राजकारण हा एकमेव पर्याय आहे.
पण बाबासाहेबांचे पाकिस्तान, फाळणी, अलगाववाद यावरील विचार न वाचलेल्या, न उमजलेल्या उन्माद कार्यकत्यांकडून जय भीम-जय मीम पलीकडे जाण्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल.
त्याशिवाय हे दोन्ही पक्ष तुर्तास भाजपला फायदेशीर आहेत हे सत्य आकडेवारी दाखवून देते आणि numbers never lie.
थोडक्यात काय तर महाराष्ट्र हे देशात सर्वात अग्रगण्य समजल जाणार राज्य.... ज्या राज्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं, ज्या राज्याने टिळक, आगरकर, सावरकर आणि आंबेडकर यांसारखी नररत्ने देशाला दिली त्या राज्याचा political discourse अतिशय निराशाजनक आहे. जात-धर्म, शिवाजी महाराज, सावरकर हे निवडणुकीचे मुद्दे असतील तर ही लोकशाही भंपक आहे असच म्हणावं लागेल. सत्ताधारी पक्षाने आपल्या कामाचा आलेख द्यावा आणि विरोधी पक्षाने आणि जनतेने त्याचे मूल्यमापन करून आपल मत ठरवाव असा आशावाद बाळगणे म्हणजे भर दिवसा डोळे उघडे ठेवून स्वप्न बघण्यासारखे आहे. आपल्यात आणि उत्तर प्रदेश, बिहार यांच्यातला फरक पुसट होतोय.
तरीही लोकशाही हे आपल्याला मिळालेले वरदान आहे.... तुम्हाला जे जस पटेल तस का होईना पण मतदान नक्की करा. भ्रष्टवादी आवडते तर त्यांना करा, पप्पु आवडतो तर त्याला करा पण जात-धर्म, खोटी आमिष यांना बळी पडू नका कारण लोकशाही टिकायला हवी आणि समृद्ध व्हायला हवी आणि ती जबाबदारी आपली आहे, नेत्यांची नाही.
सौरव जोशी
तळटीप: स्वतः परदेशात बसून, मतदान न करता अक्कल पाजळतोय असा युक्तीवाद करण्यास सक्त मनाई आहे - हुकुमावरून!