सांस्कृतिक भारताचा धाकटा भाऊ : इंडोनेशिया
body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
सांस्कृतिक भारताचा धाकटा भाऊ : इंडोनेशिया

आशिया खंडात बऱ्याच देशांमधून समान सांस्कृतिक धागे जुळले जातात. मग ती उजबेकिस्तानमधून उत्तर भारतात पोहोचलेली तंदूर भट्टी असो, किंवा दक्षिण भारतातून व्यापारमार्गे दक्षिण आशियाई देशांमध्ये पोहोचलेली द्रविडीयन संस्कृती असो. पूर्व आशियाई देशांमध्ये झालेला बौद्ध धर्माचा प्रसार तर या सामायिक संस्कृतीचं उत्तम उदाहरण. आजच्या या लेखाचा आशयही असाच काहीसा.
१७,०००पेक्षा जास्त बेटांचा समूह असलेला इंडोनेशिया जगातील सर्वात मोठा 'बेटं असलेला देश' तर आहेच, तसंच त्याला सर्व मध्य-पूर्व आशियाई देशांचा छोटा भाऊ म्हणणं वावगं ठरणार नाही. विविध देशांमधील संस्कृतींचा एक एक हिस्सा इंडोनेशियाने आत्मसात केला आहे.
ख्रिस्तपूर्व काळापासून ते अगदी १६व्या शतकापर्यंत हिंदू आणि बौद्ध राजांचं इथे वास्तव्य होतं. १३व्या शतकाच्या आसपास मुस्लीम व्यापारी सुमात्रा बेटांपर्यंत आले आणि त्यांनीही आपल्या संस्कृतीची छाप या भागात सोडली. १६व्या शतकानंतर सुरुवातीला पोर्तुगीज आणि त्यांच्या पाठोपाठ डच आणि इंग्रजसुद्धा इथे पोहोचले आणि जावा बेटांवर स्थिरावले. या सगळ्या घडामोडींनंतर आज इंडोनेशियाचा मुख्य धर्म इस्लाम आहे. हिंदू आणि बौद्धबहुल मंदिरांनी व्यापलेलं हे आज मुस्लीम राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. इंडोनेशियामधील सगळ्यांत प्रसिद्ध बेट बाली इथे मात्र हिंदूंची संख्या जास्त आहे.
बालीच्या न्गुरा राय एअरपोर्टवर उतरल्याबरोबर तुमचं स्वागत होत तिथल्या प्रसिद्ध पताकांनी, विशिष्ट बांधकाम कौशल्यांनी आणि जागोजागी ठेवलेल्या मूर्त्या आणि पुतळ्यांनी. समुद्रावरील बेट असूनही इथे हवा तितकीशी दमट नाही. उलट स्वच्छ आणि तुमचा प्रवासाचा ताण दूर करून ताजंतवानं करून टाकेल अशी आहे. एअरपोर्ट आणि देनपसार या मुख्य भागांपासून थोडं दूर गेल्यावर बालीचा खरा आस्वाद घेता येतो. कुटा, उबुद, बेसाकी, तबाना वगैरे छोटी-मोठी गावं आणि त्यांना जोडणारे छोटे आटोपशीर रस्ते. त्यावर सगळ्यात जास्त धावतात दुचाकी स्कूटर्स. इथे पर्यटक आणि स्थानिक दोघेही वाहतुकीचे नियम पाळणारे. हॉर्नचा गोंगाट तर नाहीच. छोटे रस्ते असूनही यांचं फार काही अडत नाही. यांना कुठेही जायची घाई नसते. एकंदरीतच निवांत कारभार, कोकण-गोव्याप्रमाणेच. कदाचित समुद्रच अशी जादू करत असेल त्यांच्यावर. फार छान वाटतं अशा जागी.


गच्च हिरवाईने सजलेला हा संपूर्ण प्रदेश. आपण श्रीलंकेला पाचूचं बेट म्हणून ओळखतो, पण इंडोनेशियासुद्धा त्याबाबतीत मागे नव्हे. जुनी जंगलं, जुने वृक्ष या देशात फार मोठ्या प्रमाणात आहेत. बाली बेटावर त्यामुळेच खूपशा ठिकाणी लाकडाचे काम पाहायला मिळतं. इथली मंदिरं, घरं, दरवाजे, छप्पर वगैरे ठिकाणी लाकूड भरपूर प्रमाणात वापरलं जातंच, त्याचबरोबर लाकडापासून बनवलेल्या असंख्य गोष्टीसुद्धा इथल्या बाजारांत दिसून येतात. उबूदला असलेला बाजार हा लाकडी गोष्टींसाठी प्रसिद्ध. अगदी बांगड्या, कानातलं आदी आभूषणांपासून, चमचे-वाट्या-बाउल वगैरे, किंवा वेगवेगळं शोभेचं साहित्य, मास्क, खेळणी, फर्निचर जे म्हणाल ते इथे मिळतं (आणि काही गोष्टी तर आपल्या कल्पनेच्या पलीकडल्या पण असतात, त्या कोणत्या हे तुम्हाला गेल्यावर सापडतीलच, त्यामुळे मी काही फार तपशिलाच्या भानगडीत नाही पडत).
बालीमधील प्रत्येक हिंदू घराच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती असतोच आणि घराच्या बाहेर, कुंपणाच्या आत एक छोटंसं मंदिर, ऐसपैस सोपा वगैरे. हे सगळंसुद्धा दगडात, लाकडात आणि भाताच्या लोंब्यांपासून बनवलेलं. फक्त घरातच नव्हे तर हॉटेल, मॉटेल आणि व्हिला सगळीकडे गणपतीची मूर्ती दिसून येते.
बालीमधील आणखी एक फार प्रसिद्ध गोष्ट म्हणजे तिथले व्हिला. मॉरिशस, गोवा वगैरे जागा अतिगर्दीच्या झाल्यावर गोऱ्या पर्यटकांनी बालीकडे मोर्चा वळवला. सुरुवातीला फक्त मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये असलेले व्हिला हळूहळू साऱ्या बालीभर पसरले. फार स्वस्तात, १ किंवा २ बेडरूम, किचन आणि स्विमिंग पूल आणि भाताच्या शेतांमधून बांधलेले हे व्हिला बालीची खासियत बनले. प्रत्येक व्हिलाचं आवार दगडी, बाजूने छोटा बगिचा वगैरे, लाकडात कोरीवकाम केलेले दरवाजे, उतरती लाकडी छपरं आणि प्रवेशद्वारावर गणपतीबाप्पा असं ढोबळ स्वरूप.
इंडोनेशियाबद्दल बोलताना तिथल्या मंदिरांचा विषय वगळला तर कसं बरं चालेल? इंडोनेशियामधील हिंदू आणि बौद्ध मंदिरांना कॅन्डी म्हणून आणि बालीमधील हिंदूंच्या मंदिरांना पुरा म्हणून ओळखलं जातं. बालीमध्ये विशेष उल्लेख करावी अशी मंदिरं म्हणजे पुरा बेसाकी, पुरा तानाह लॉट, पुरा उलु बेरातान (किंवा ब्रातां), पुरा उलुवाटू, पुरा तमन आयुन. सगळ्या मंदिरांमधून दगडावर अतिशय सुरेख कोरीवकाम केलेलं आढळतं.

तानाह लॉट हे समुद्रामध्ये बांधलेलं मंदिर. ओहोटीच्या वेळी चालत जाऊन येण्यायोग्य रस्ता भरतीच्या वेळी मात्र फेसाळणाऱ्या लाटांनी बंद होतो. हे मंदिर समुद्र देवासाठीच बनवलं आहे. आणि मंदिराच्या भोवताली रक्षण करणाऱ्या नागाच्या प्रतिमा कोरलेल्या आढळतात.

उलुवाटू हे मंदिर मात्र समुद्राच्या शेजारील उंच कड्यावर बांधलेलं आहे. हे मंदिर रुद्राचं - अर्थात शंकराचं असून, रोज संध्याकाळी इथे होणारं, रामायण किंवा महाभारतातील एखाद्या प्रसंगावर आधारित असलेलं केचक नृत्य आणि त्यानंतर होणारं अग्निनृत्य (fire dance) चुकवू नये असंच असतं.



ब्रॅटन किंवा ब्रातां तलावाच्या मधोमध असलेलं पुरा उलु दानू ब्रातां हे मंदिर शंकर आणि पार्वतीचं आहे. या तलावातून आजूबाजूच्या प्रदेशाला शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, त्यामुळे हे मंदिरही फार महत्त्वाचं मानलं जाते.

बालीमधील सगळ्याच मंदिरांच्या मुख्य भागात पुजाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसतो. स्थानिक लोकांनासुद्धा पूजा करायची असल्यास सोवळ्यात प्रवेश असतो. मंदिराच्या बाकी आवारात पर्यटकांनासुद्धा संपूर्ण पाय झाकले जातील अशा पोशाखात प्रवेश असतो. पुरुषांसाठी लुंगी, स्त्रियांसाठी पूर्ण स्कर्ट. पर्यटकांनी शॉर्ट्स घातल्या असतील तर मंदिराबाहेर सॅराँग ठेवलेले असतात, ते नेसूनच प्रवेश घेता येतो.
बालीबाहेरील मंदिरं - ज्यांना मुख्यतः कॅन्डी संबोधलं जातं, तिथे सध्या हिंदू धर्माचे लोक नसल्याने इथे रोजची पूजा होत नाही, त्यामुळे इथे कपड्यांचं बंधन नसतं. बालीबाहेरील मंदिरांत सगळ्यांत महत्त्वाच्या अशा दोन मंदिरांचा उल्लेख गरजेचाच आहे. दोन्ही मंदिरं जावा बेटावरील योग्याकार्ता / योग्यकर्ता / जोगजकार्ता किंवा जोगजिया म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या भागात आहेत. दोन्ही मंदिरं UNESCO World Heritage Site या यादीत समाविष्ट केली आहेत. पहिलं बौद्ध मंदिर बोरोबुदूर (Borobudur) आणि दुसरं हिंदू मंदिर प्रम्बानन (Prambanan).
माऊंट मेरपी या जिवंत ज्वालामुखीच्या पायथ्याशी योग्याकार्ता आहे. अशाच एका ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर गाडलं गेलेलं बोरोबुदूर इंग्रजांनी १८व्या शतकात शोधून काढलं. मंदिराची रचना काहीशी अशी आहे - लहान होत जाणारे सहा चौकोनी टप्पे एकावर एक असून त्याच्यावर तीन गोलाकार टप्पे आहेत. चौकोनी टप्प्यांवर गौतम बुद्धांचे विविध क्षण कोरलेले असून प्रत्येक टप्प्यावर चालत फिरून पाहू शकू एवढी मोठी मोकळी जागा आहे. वरील तीन गोलाकार टप्यांवर एकूण ७२ स्तूप असून प्रत्येक स्तूपाच्या आत बुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आहे. काही स्तूप आणि त्यातील मूर्त्या कालांतराने नष्ट झाल्या असल्या, तरी उरलेल्या अवशेषांवरून एकंदरीतच मंदिराची रचना लक्षात येते. सर्वांत मध्यभागी मुख्य मोठा स्तूप आहे. आकाशातून पाहिलं असता मंदिराची रचना मंडलाकार दिसून येते. तीन टप्प्यांवर असलेले हे स्तूप प्रत्यक्षात पाहताना फारच सुंदर भासतात. इथून दिसणारा आजूबाजूचा परिसर डोळ्याचं पारणं फेडणाराच आहे.



या मंदिरापासून अवघ्या ६-७ किलोमीटरवर प्रम्बानन मंदिर आहे. इंडोनेशियामधील सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आणि दक्षिण-पूर्व आशियातील अंगकोर वॅटनंतरचं सगळ्यात मोठं मंदिर अशी याची ख्याती. विविध मंदिरांचा समूह असलेलं प्रम्बानन मंदिर आणि परिसर ३० किलोमीटर इतक्या विस्तीर्ण आवारात पसरलेला आहे. १६व्या शतकात झालेल्या प्रचंड भूकंपांमुळे मंदिर जवळजवळ जमीनदोस्त झालं होतं ते १९व्या शतकापर्यंत. १९१८मध्ये डचांनी मंदिराचे अवशेष एकत्र करून पुन:उभारणीला सुरुवात केली आणि १९५३मध्ये मंदिर परत बांधून झालं. अजूनही मंदिराचे सगळे अवशेष नसल्याने ते पूर्णतः बांधलं गेलेलं नाही. काही अवशेष शोधण्याचं काम अजूनही सुरू असून काही अवशेष जुन्या उत्खननकारांनी परस्पर विकूनही टाकले, असं म्हटलं जातं.
प्रम्बाननच्या आवारात पूर्वी २४० मंदिरं होती. त्यातली मुख्य ८ मंदिरं आज बऱ्यापैकी पूर्ववत केली असली, तरी लहान २२४ मंदिरांपैकी फक्त दोनच पुन्हा उभारली जाऊ शकली आहेत. मध्यभागी शंकर, दोन्ही बाजूस ब्रह्मा आणि विष्णू अशी तीन मुख्य मंदिरं, त्यांसमोर त्यांची वाहनं नंदी, हंस आणि गरुड यांची मंदिरं आहेत. ब्रह्माच्या मंदिराशेजारी सरस्वतीचं मंदिर असून विष्णूशेजारी लक्ष्मीचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर ४७ मीटर उंच आणि ३४ मीटर रुंद असून हे येथील सर्वांत मोठं मंदिर आहे. शंकराच्या मुख्य मंदिरात मध्यभागी शंकराची मूर्ती असून त्याच्याभोवती पिंड आणि नाग आहेत. याव्यतिरिक्त याच मंदिरात दुर्गा, गणपती आणि अगस्ती ऋषी यांचीसुद्धा मंदिरे आहेत. सर्व मंदिरांच्या भिंतीवरून रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराचं विस्तीर्ण आवार पाहताना भारतापासून इतक्या दूर आपल्या संस्कृतीची इतकी तंतोतंत भेट होईल याची कल्पनाच केली नव्हती. एक-दोन ठिकाणी रामायणातील नक्की कोणता प्रसंग मूर्तिबद्ध केला आहे ते आम्ही ओळखलं, पण हे काम प्रचेतस उर्फ सागर यासारख्या जाणकारांचं. त्याने पाहावं आणि सोपं करून आपल्याला सांगावं असंच वाटतं अशा वास्तू पाहिल्यावर. नाहीतर आम्ही तिथे नुसती मंदिराची भव्यता, कोरीव काम वगैरेच पाहूनच खूश होतो.




बालीला जाणार असला तर योग्याकार्ता चुकवू नये असं ठिकाण आहे. बालीवरून अवघ्या तासाभराच्या विमान प्रवासावर आहे योग्याकार्ता. एअरपोर्टवरून इथल्या मुख्य ठिकाणी जायला टॅक्सी असतात. बोरोबुदूर आणि प्रम्बाननव्यतिरिक्त पाहण्यासारखा आहे इथला जिवंत ज्वालामुखी मेरपी. एका ठरावीक अंतरापर्यंत जाण्याची सोय असून परिसरात कॅफे आणि म्युझिअम वगैरेही आहेत. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे इथे आम्हाला फिरवणाऱ्या टॅक्सी चालकाचं नाव कृष्णा होतं, पण तो मुस्लीम होता! इंडोनेशियाच्या भूमीत अशी सरमिसळ हमखास सापडते.

आणखी एक गोष्ट आठवली - बाली मध्ये फिरताना कधीही टॅक्सी घेतली की चेहरे बघून चालक पहिला प्रश्न हाच विचारतात, "Are you Indian?" होकारार्थी उत्तर दिल्याबरोबर सगळे फार आपुलकीने गप्पा मारू लागतात. जणू दूरदेशीवरून कोणी नातेवाईकच आला आहे. आम्हाला कधी कधी याच्यापुढील प्रश्नही विचारला गेला, "Are you Hindu?" आणि यालाही होकारार्थी उत्तर दिल्यावर एका चालकाने त्याच्या सगळ्या कुटुंबाची गोष्ट, त्याच्या मुलींच्या लग्नाचे प्लॅन वगैरे सगळंच कथन केलं. फार अप्रूप वाटतं जेव्हा भटकतांना इतकी छान माणसं भेटतात.
आपलं निसर्गाबद्दल बोलून झालं, विठोबा झाला, पण पोटोबाचं काय? समुद्रात वसलेली बेटं आणि पूर्व-आशियाई देशांचा असलेला प्रभाव यांमुळे मांसाहारी लोकांची इथे फार चंगळ असते. नासी (भात), आयम (चिकन), पदांग (बीफ), बेबेक (बदक), बाबी (पोर्क) आणि असंख्य प्रकारचे मासे यांचे वेगवेगळे पदार्थ इंडोनेशियात मिळतात. सताय म्हणजे स्टिकवर लावलेले, गोरेंग म्हणजे फ्राइड, सोप म्हणजे सूप. आणि मग यांपासून पदार्थांची नावे बनतात नासी गोरेंग, सताय आयम, बेबेक गोरेंग वगैरे. प्रत्येकाची चव निराळी आणि अप्रतिम. अर्थात हे आपल्या जिभेवरही अवलंबून आहे म्हणा. कारण पूर्व आशियाई देशांत जाऊन चव आवडली नाही म्हणून बटर चिकन आणि बिर्यानीवर तग धरणारे लोक माझ्या पाहण्यात आहेत. पण मला मात्र इथल्या स्थानिक पदार्थांची चव आवडली. विशेष उल्लेख करायचा झाला तर 'वाहाहा' या रेस्टोरंटचे पोर्क रिब्स. कधीकधी तिकडची चव आपल्या भारतीय चटकदार जिभेला गोडसर वाटू शकते, पण मग इथे जोडीला येतो सांबल. भरपूर लाल मिरच्या, भरपूर लसूण, लिंबू, मीठ आणि किंचित साखर घालून दगडी वरवंट्यावर वाटलेली चटणी. लाल मिरचीचा ठेचा म्हणा ना. पण प्रचंड झणझणीत. सांबल प्रत्येक पदार्थाला वेगळीच चव देतो.
शाकाहारी लोकांसाठी गाडो म्हणजे भाज्या, फ्रेश तोफू आणि भात याचं कॉम्बिनेशन. सोयाबीनचे पदार्थ, पावट्याचे दाणे, कच्चा फणस वगैरे भाज्यांमध्ये वापरलं जातं. आणि जोडीला सतत सांबल असतंच. इंडोनेशियामध्ये वेगवेगळी ताजी फळंसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात. गाड्यांवरून मिळणारी फळं नक्की चाखावी अशीच. आपल्याकडे सध्या सुपर मार्केटमधून मिळू लागलेलं ड्रॅगन फ्रूट मी पहिल्यांदा इथे हातगाडीवर खाल्लं. लालबुंद, रसरशीत आणि गोड. आपल्याकडे कोकणात मिळणारं हिरवट रंगाचं जाम फळ तिकडे लाल रंगात असतं आणि त्याला जावा फ्रूट म्हणतात. स्नेक फ्रूटसुद्धा पहिल्यांदा इथेच खाल्लं. रोज गाडीला, घराला, दुकानाला अशा फळांचा, फुलांचा नैवैद्य दाखवण्याची पद्धतही इथे आहे. सकाळी इथल्या रस्त्यांवरून चक्कर मारताना ठिकठिकाणी हे दिसून येतं.
पेयपानामध्ये इंडोनेशियाची लुवाक कॉफी तर जगप्रसिद्ध आहे. लुवाक नावाच्या मार्जारकुळातील प्राण्याने कॉफीची फळं खाल्ल्यावर कॉफीच्या बिया त्याच्या विष्ठेमार्गे बाहेर टाकल्या जातात. या बियांना नंतर स्वच्छ करून, भाजून त्याची पूड केली की बनते लुवाक कॉफी. डच जेव्हा इंडोनेशियामध्ये होते, तेव्हा इथे कॉफीचे मळे लावण्यास सुरुवात झाली. लुवाक कॉफीचा शोधही तेव्हाच लागला. पण सध्या जी कॉफी लुवाक नावाखाली विकली जाते, तिची सत्यता पडताळून पाहणं खूप कठीण आहे.
मद्यांमध्ये बिनटँग, बाली हाय वगैरे बिअर प्रसिद्ध आणि छान आहेत. या बिअर कोणत्याही दुकानात, रेस्टोरंटमध्ये मिळतात. त्याचबरोबर ब्रेम बाली म्हणजे भातापासून बनवलेली वाइन आणि अर्रक (Arrack) यासुद्धा पिण्यात प्रचलित आहेत, पण त्यासाठी त्याची ठिकाणं शोधावी लागतात, इतकंच.

बाली आणि योग्याकार्तामध्ये नावीन्यपूर्ण अशा अनेक गोष्टी आहेत. हिरव्यागार डोंगररांगा, धबाबा कोसळणारे धबधबे, दूरदूर पसरलेली भातशेती, सुंदर समुद्रकिनारे, चविष्ट खाणं आणि पिणंसुद्धा, आल्हाददायक हवा, सुंदर मंदिरम - वास्तू आणि तशीच छान पण मनाने साधी माणसं, आणि अजूनही डोंगर-दऱ्यांतून लपलेले माणिक-मोती-पाचू.
एकदा जाऊन मन न भरलेली मी, सगळ्या कँडी आणि पुरांमधून एकच मागणं मागते की इंडोनेशियाचं हे वैभव सतत असंच टिकून राहो.

.png)