बाप्पा यायला उणापुरा एक महिना राहिलाय मंडळी. बाप्पा आल्यावर जे उत्साहाचं वातावरण असतं, त्याची भूल सगळ्यांनाच पडते. गणपतीच्या आगमनाने सगळीकडे आनंद, मांगल्य, उत्साह भरून ओसंडून वाहतो. अगदी 'नभात भरला, दिशांत फिरला, जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे...' असं उत्साहाचं वातावरण भारून राहिलेलं असतं! पाहुणाच असा गोजिरवाणा असतो!
हळूहळू मिपावरसुद्धा गणपती उत्सवाचा माहौल रंग भरायला लागेल. आपली गणेश लेखमालिका तयार होतेच आहे, सांस्कृतिक, वैचारिक, मनोरंजक इत्यादी प्रकारचे लेख वाचायचे आहेतच, कवितांचा आनंद घ्यायचा आहे, पण तोवर जरा एक छोटासा खेळ खेळू या का मंडळी?
मिपावर उत्तम लिहिणारे, लेखनाला प्रतिसाद घेणारे एक से एक मिपाकर आहेत. त्यातल्या काही मिपाकरांच्या कला साहित्याने ह्या वर्षीची गणेश लेखमाला सजणार आहे. तुम्ही वाचायला उत्सुक असणारच.
पण काय हो,
वाट बघणार का नुसतंच?
काम करा त्यापेक्षा भारी!
घ्या नाव आपल्या बाप्पाचं,
अन् सोडवा ही कोडी सारी!
आम्ही घेऊन आलोय लेखमालिकेतील लेख-कवितांची पहिली झलक. बघा बरं, कोणी लिहिलंय ते तुम्हाला ओळखता येतंय का!
१.
प्रगतीसाठी माणसाच्या जीवनोद्दिष्टांनाच व आत्मसंयमनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले पाहिजे, असे आग्रहाने प्रतिपादन केले. केवळ आणि केवळ विवेकाच्या साहाय्यानेच माणूस स्वत:चे, स्वत:च्या आचारांचे नियंत्रण करू शकतो. आचरणातील चूक ही मुळात बौद्घिक आकलनातील चूक असते, असे त्याने निक्षून सांगितले.त्याची ज्ञानदानाची पद्धतसुद्धा मजेदार होती. प्रश्न विचारत विचारत तो पुढे जाई व त्या प्रश्नांची उत्तरे लोकांना द्यायला तो भाग पाडत असे. त्याने या प्रश्नांची सहा प्रकारांत विभागणी केली होती. वैचारिक स्पष्टता येण्यासाठीचे प्रश्न, माहितीची खातरी करून घेण्यासाठीचे प्रश्न, मुद्दा पडताळून पाहण्याचे प्रश्न, वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहण्याचे प्रश्न, निर्णय तपासून पाहण्याचे प्रश्न आणि शेवटी प्रश्नामुळे पडणार प्रश्न. अशा प्रश्नांमुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्याचा राग येत असे. परंतु नंतर त्यांना त्याचा फायदाही दिसून येई.
२.
या सर्वांमध्ये मात्र पालीचा बराचसा शैक्षणिक वेळ गेलेला होता व तिला परत आजारी करण्यासाठी शाळेत पाठवण्यास तिच्या वडिलांचा विरोध कायम होता. या विरोधासमोर आजारी पालीस नमते घ्यावे लागले आणि म्हणूनच तिला तिच्या ९व्या वर्गाच्या शिक्षणावरच समाधान मानावे लागले. आज तिच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटल्याने तिची दोन धाकटी भावंडे पुणे व नागपूर येथे आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. आणि म्हणूनच पालीच्या वडिलांनी तिला आरोग्य सेविकेचे काम करण्यास अजिबात विरोध केला नाही, उलट तिला पूर्ण सहकार्य करण्यास संमती दर्शवली.घरच्यांच्या सहकार्याने व स्वजिद्दीमुळे सुरुवातीला पाली २०१०पासून पेनगुंडासहित एकूण ८ गावांमध्ये (पेनगुंडा, कुचेर, परायनार, महाकापाडी, गोंगवाडा, नेलगुंडा, घोटपाडी, बोडांगे) ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे व गरोदर मातेचे वजन करणे, बी.पी. घेणे व त्यांना रुग्णालयीन प्रसूतीकरिता प्रवृत्त करणे ही कामे नियमितपणे करत होती
३.
गेल्या वर्षभरात मा. अथर्व याच्या माध्यमातून आपण आमच्याकडे पाठवलेल्या प्रदीर्घ प्रकल्पयादीकडे पाहता आपल्या मनात आमची एक अत्यंत चुकीची प्रतिमा अस्तित्वात आहे, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.मा. मॅडम, मी रसायनशास्त्र विषयात पदवीधर असून एका खाजगी व्यवस्थापनात रसायनशास्त्राशी दूरान्वयानेही संबंध नसलेले काम करतो. आपल्याला जे येत नाही ते करण्याचे कौशल्य उपजीविकेपुरते मी कमावले आहे. परंतु मी शिल्पकार, चित्रकार, लोहार, कुंभार, शिंपी, ज्ञानकोशकार, बल्लवाचार्य या सर्वांची कौशल्ये एकाच वेळी या देही बाळगून असावे अशी अपेक्षा मजकडून करणे योग्य नाही, हे मी नम्रपणे नोंदवू इच्छितो.
