खरे तर मथळ्याचे नाव "काँग्रेस ची हार का ? भाजपाची वा एन डी ए ची जीत का?" असे असावयास हवे पण मुळात लोकांनी भाजपाला वा एन डी ए ला मते न देता मोदीना दिली आहेत .एका प्रकारे अध्यक्षीय लोकशाही आणण्यासाठी भारतीय जनतेने हे पाऊल उचलले आहे का ? असे वाटावे. संसदीय लोकशाहीचे पावित्र्य प्रथम डागाळले ते १९६९ साली ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी आपल्याच पक्षाने पुरस्कृत केलेला नीलम संजीव रेड्डी हा राष्ट्रपती पदाचा उमेदवार पाडल्यापासून .पुढे अनेक वेळा " शेकुलारीझम " असा गोंडस नादान शब्द घेऊन जातीचे , धर्माचे , व्होट बँकांचे , तुष्टीकरणाचे अनेक खेळ संसदीय लोकशाहीत खेळले गेले . खासदार खरेदी साठी नोटांची बंडले वगैरे प्रकार झाले. संसद बंद पाडून गोधळ निर्माण करून देशावासियांना शरमेने मान खाली घालायला लावणारे आपले लोकप्रतिनिधी आपण पाहिले . " पुरी सिस्टम सडी हुई है ..." असे डायलॉग असणारे सिनेमा ही आले.
काँग्रेस ची स्थापना १८८५ साली झाली. ती काँग्रेस प्रथमी फुटली ही डॉ. केशव बळीराम हेडगेवार या काँग्रेसी माणसाने 'रा स्व संघ ' नावाचे संघटना स्थापन केल्याने .अनेक प्रकारची बदनामी , तुरुंगवास ,बंदी सहन करीत आजही हे संघटन आपल्या असे म्हणतात की ८३००० शाखांसह कार्यरत आहे. हिंदूंचे रक्षण हे त्यांचे ध्येय आहे असे ते सांगत असतात. भारतातील अनेक हिंदूंना आपला धर्म " खतरेमे" आहे असे वाटत नसल्याने संघास हिंदू लोकसंख्येच्या प्रमाणात आश्रय नाही ही वस्तुस्थिती आहे. आणीबाणी १९७५ साली जाहीर केल्यावर त्यावेळी अनेक संघीयांना विनाकारण तुरूंगात डाम्बले गेले हा इतिहास आहे.साधारण या वेळे पासून मूळ जनसंघ नावाचा अशक्त असलेला पक्ष वर्धिष्णू व्हायला सुरुवात झालेली दिसते .दोन अपवाद सोडता जसा या जनसंघाचा नवा अवतार भा ज पा वाढू लागला तसा तो सर्व सामावेशक होऊन काँगेस चा ह्रास व्हायला सुरुवात झाली
काँगेस नावाची एक संस्कृती आहे. "मुसलीम व दलितांचे तुष्टीकरण , हाय कमांडचा वरचष्मा, हिंदी पट्ट्याचे प्राबल्य , पक्ष सेवे पेंक्षा गांधी निष्ठेला प्राधान्य , उद्दाम पणा , अहंकार , शक्यतो युतीबिती ना करणे " ई या संस्कृती ची वैशिष्टये आहेत. भाजपा मध्ये ही हाय कमांड आहे पण त्यात अध्यक्ष बदल होता असल्याने दगडा पेक्षा वीट मऊ अशी ती हाय कमांड आहे .आता भाजपा ने ही दलित व ओ बी सी यांना भटजी व शेटजी यांच्या जोडीला घेतल्याने काँग्रेस चा बेस कमी झाला आहे. त्यात मुलायम यांनी मुसलमान , मायावती यांनी दलित काँग्रेसच्या बेस मधून पळवून नेल्याने कर्क रोगासह टी बी अशी काँग्रेस ची अवस्था होत गेली आहे. एकाच घराण्यावर नेतृत्व व निर्णय प्रक्रियेसाठी विसंबून राहिल्यामुळे पर्यायी नेतृत्व इथे निर्माणच होत नाही.
२०१४ साली केवळ ४४ जागा मिळाल्याने काँग्रेस अधिक हताश झाली.राहुल यांनी ४४ का झाल्या याचा शोध न घेता फक्त मोदी चुका काय करतात यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली . टेनिस च्य भाषेत सांगायचे झाले तर फक्त प्रतिस्पर्ध्याच्या चुकांचे गूण मिळवायचे पण बिनतोड सर्वीस कडे लक्ष द्यायचे नाही असा खेळ त्यांनी चालू ठेवला तब्बल ५ वर्षे . काँग्रेस पक्षाचे " पॅकेज " चे राजकारण मोदीनी ठोकरले. मते न मिळण्याचा धोका होता तरीही . राफेल चा राहूलाने खेळ चालू केला त्यात बोफोर्स मध्ये त्याच्या वडिलांची मि क्लीन ही प्रतिमा जशी धुळीस मिळाली तशी राफेल ही आपल्याला एक नामी संधी आहे असे त्यांना वाटले पण सर्वोच्च न्यायालयाने आडकाठी त्याच्या अटकळीत आणली. नोटबंदी मुळे नक्की फायदा काय झाला ते मोदीना देशाला स्पष्टपणे पट्विता आले नाही पण काँग्रेसचे पाठीराखे मनमोहन सिंग , अमर्त्य सेन व रघुराम राजन यांनी तरी त्याचे तोटे पटवून दिले का ? नुसते मोठा घोटाळा असे म्हणून ममो गप्प झाले. जी एस टी चा त्रास काही प्रमाणात व्यापाऱयांना झाला आहे पण तसे तो पूर्वी ऑक्ट्रॉय व व्हॅट मध्ये होत होताच . त्यामुळेच जी एस टी चा बार ही फुसका झाला. काही लोकांनी मोदींचे सरकार " हुकूमशाही व भीतीदायक असल्याचा गदारोळ माजविला . संडास , स्वच्छता भारत यांची टवाळी केली . अशाना जनधन , विमा, पेन्शन , आयकर सवलत, आयकर परताव्याची खात्री , ६००० रूपये शेतकर्याना , महिला बँक , बाळंतपणाची वाढती रजा , रेरा , टेलिकॉम रिफॉर्म , मेट्रो,रस्ते ई अनेक विषयाला स्पर्श करून मोदीनी " सैद्धांतिकांना चपराक मारली आहे. जरा स्वातंत्र्याचा संकोच झाला तरी चालेल पण संडास , घर व भाकरी द्या हे जनतेने ३५० जागा देऊन मोदीना आवाहन केलेले दिसते.
केरळ राज्यात मुसलीम ,हिंदू व ख्रिस्ती ३३ /३३ टक्के आहेत. म्हणजे ६६ टक्के जातीय धर्मीय बेस अवघड हे उमजून आसाम ,बंगाल,, अरुणाचल ई भागातील लोकांच्या कल्याणाच्या योजना आणून भाजपाचा विस्तार चालू असलेला दिसतो .या बेस पट्यात प्रामाणिकपणे योजना राबवाल्या गेल्या तर दिल्लीवर राज्य करता येते हे गणित अमित शहा व मोदी या तथाकथित दोन हुकूमशहांचे आहे .लोकांना जो पर्यंत विकास दिसेल , जो पर्यंत भाववाढ बेसूमार होणार नाही तो पर्यंत मोदी स्वराज , आडवाणी याचा मान राखतात की नाही यांच्याशी सामान्य माणसाला काही देणे घेणे नाही हे " घुसमट " वाल्या बुद्धीवंतांनी ( नावे इथे देत नाही ) लक्षात घेणे गरजेचे आहे. उत्तम संवाद , अभ्यासू पणा , विनोद, अभिनय , कामाचा उरक ई गुणामुळे मोदींच्या आत्मस्तुती या दोषांकडे लोक उदारपणे दुर्लक्ष करतात. मोकळेपणा व धूर्तपणा याचा उत्तम संगम त्यांच्यात आहे.म्हणून भा ज पा चा अश्वमेध घोडा कोणी रोखू शकत नाही .