वैदेही बाल्कनीत उभी होती. रिमझिम पावसात एकमेकांना बिलगत, मस्ती करत चाललेले अविनाश आणि नैना तिला दिसलेत. दहा वर्षांचा भूतकाळ तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा एकदा तिला आठवला.
अशाच एका पावसाळी सायंकाळी अविनाशसोबत भविष्याची स्वप्ने रंगवत असताना अचानकपणे त्याने तिला त्याचे विचार ऐकवलेत. "मूल नको" हे विचार तिच्या सुखी संसाराच्या कल्पनेत अजिबातच बसणारे नव्हते. दोन वर्षांपासूनचं त्यांचं नातं तिने तडकाफडकी संपवलं. पुढे नैनाने अविनाशला त्याच्या विचारांसह स्वीकारलं.
सतीशशी लग्न करुन वैदेहीने संसार थाटला आणि दोन मुलांना जन्म दिला. मात्र त्यानंतर सतीशचा तिच्यातला रस संपल्याने त्याने तिला घटस्फोट दिला.
स्वतःला सावरत वैदेही बाल्कनीतून परतली. .. तसंही रेडिओवरचं 'खाली हाथ शाम आयी है..' आता संपतच होतं.