श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ६ : माझा मी जन्मलो फिरुनी

२० जुलै २०११ - माझ्या मागच्या जन्मातील शेवटचा दिवस आणि कदाचित ४० दिवसांनंतर मी आयसीयूमधून बाहेर पडून पुनर्जन्म. हो, मी जे आता लिहीत आहे, तो मानला तर विज्ञान व अध्यात्म यांच्या संयोगाचा एक चमत्कारच आहे.

२० जुलै २०११ रोजी ऑफिसमध्ये काम करत असताना मी कोसळलो व १० मिनिटांत जवळच्या हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले. दोन तासांत निदान होऊन मला सांगितले गेले की दोन दिवसांपूर्वी सायलेंट हार्ट अटॅक येऊन माझे हृदय डॅमेज झाले आहे. रक्ताची मोठी गुठळी आत अडकली आहे. माझ्यावर उपचार करणारे सर्जन ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानंतर अक्षरशः चालत आले. मला बेशुद्ध करून ऑपरेशन करण्यात आले. तोपर्यंत पत्नी व मुलगा बंगळुरूहून अन बरीच मित्रमंडळी मुंबईतून हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.
मी पहिल्या धक्क्यातून वाचलो, पण माझा उजवा पाय थोडा अधू झाला होता. दोन दिवसांनी आमच्या मुलांनी (दोन्ही मुली तेव्हा अमेरिकेत होत्या) मला मुंबईतल्या एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि तेथेच मोठ्या दिव्यास सुरुवात झाली. मी पूर्ण शुद्धीत होतो. जवळच्या सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा व देवाचा धावा सुरू केला. पुढील घडामोडींवर तुमचा किती विश्वास बसेल माहीत नाही, मी क्रमशः जसे घडले व मला जसे आठवते तसे लिहीत आहे. माझा मृत्युंजयाचा जप सुरू असताना झोपेत मोठ्याने ओरडून मी जागा झालो. त्या वेळी असे दिसले की यमदूत जणू बाजूला होते, पण ते नंतर नमस्कार करून निघून गेले. त्यामुळे मी आता मृत्यूच्या विळख्यातून सुटलो याची खातरी झाली.

त्यानंतर आठ दिवसांनी कळले की माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. डॉक्टरांनी यातून रिकव्हर होण्याची आशा फारच कमी असल्याचे सांगून डायलिसिस देण्यास सुरुवात केली. आम्हा सर्वांच्या परीक्षेची वेळ होती. मीदेखील सर्व देवांची परीक्षा देण्याचे ठरविले. हनुमानास आवाहन करून संजीवनी आणण्यास सांगितले. डायलिसिस सुरू असताना सतत जप, प्रार्थना चालूच होत्या. १० सिटिंग्जनंतर रात्रीच थोडेसे युरीन पास झाले व किडनी रिकव्हर होऊन चमत्कार घडला. डॉक्टरदेखील आम्हा सर्वांच्या श्रद्धेपुढे नतमस्तक झाले.

आता थोडेसे हायसे वाटू लागले. पण अचानक एका रात्री हृदयाच्या ठोक्यांची गती वाढून मी अर्धवट बेशुद्धावस्थेत गेलो. नंतर मी ४ दिवस व्हेंटिलेटरवर होतो. मला एवढे आठवते की चौथ्या दिवशी सकाळी मला श्री स्वामी समर्थ माझ्या पलंगाजवळ किडे फोडून खाताना दिसले. मी जेव्हा त्यांना विचारले की “आपण काय करत आहात?” त्यावर ते मला म्हणाले की “तुझ्या शरीरातले किडे खात आहे व आता तू बरा होशील.” नंतर ते गुप्त झाले. त्या दिवसानंतर १० दिवसांत मी बरा झालो. एकूण ४० दिवसांनंतर मला हॉस्पिटलातून डिस्चार्ज मिळाला.
मला नंतर असे समजले की आमची अमेरिकेतली डॉक्टर मुलगी मुंबईला आली. तिने स्वामी समर्थांच्या मठात प्रार्थना करून तिच्या पतीच्या सल्ल्याने एक नवीन औषध सुचविले. (तिचा पती अमेरिकेत कार्डिऑलॉजिस्ट आहे). आता माझे ब्लड सेप्सिस बरे झाले. ‘मी तुझ्या शरीरातले किडे खात आहे’ याचा सर्वांना अर्थ कळला व ते अशक्यही शक्य करू शकतात याचा प्रत्यय आला. त्यानंतर दोन वर्षे सातत्याने औषधे, आयुर्वेदिक उपचार, व्यायाम, ध्यानधारणा या सर्वांच्या प्रयोगांनी व प्रयत्नांनी माझ्या प्रकृतीत विलक्षण सुधारणा झाली. देवाने मला निवृत्त करायचे ठरविले आहे असे मानून मी हृदयरोगाचा व भगवद्गीतेचा अभ्यास जोमाने सुरू केला. 'आनंदी हृदयाचा मंत्र' अशी व्याख्याने दिली व 'जीवनाचे बनविले एकच लक्ष – वाचवू या हृदये दशलक्ष' या नवीन अवतारकार्यास सुरुवात केली.

माझे विचार व अनुभव मी भाषण व प्रत्यक्ष संभाषण, यू ट्यूब, फेसबुक, व्हॉटस ऍप, ईमेल इत्यादी माध्यमांतून सातत्याने मांडत असतो. आजवर औरंगाबादेत व कोकणात आठ-दहा वेळा भाषण देण्याचा योग आला. मी मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांतून विषय मांडतो व आजवर उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव, अध्यात्म व विज्ञान यांचा संयोग यामुळे माझे म्हणणे सर्वांना साधारणपणे पटते असे मला वाटते. मिसळपाव.कॉमच्या माध्यमातून मला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल असा विश्वास आहे.
परमेश्वरी व श्री समर्थकृपेने मी भगवद्गीता इंग्लिशमधून व मराठीतून पद्यात लिहीत आहे. तसेच हनुमानचालिसाचे मराठी रूपांतर झाले आहे.
माझ्या जीवन अवतारकार्याचा आता आरंभ झाला आहे. असे वाटते की...

स्वामी समर्थ कृपेने मृत्यूस हरवुनी
अवतारकार्य करण्यास 'जन्मलो मी फिरुनी'.
जय श्री स्वामी समर्थ

किशन वसेकर, औरंगाबाद
ईमेल - omqualityguru@gmail.com;
यूट्यूब चॅनेल