नैसर्गिक शेती की रासायनिक शेती?

बटाट्या वड्या बरोबर चिंचेची चटणी हवी का लसूण चटणी?

किंवा

डोंबोली अधिक प्रदूषित की पुणे?

किंवा

महाराष्ट्र अधिक प्रगतीशील का बिहार?

ह्या इतकाच बहूचर्चित शेतकरी प्रश्र्न म्हणजे ----- नैसर्गिक शेती अधिक उत्तम की रासायनिक?

==========

मुंग्या नंतर शेती करणारा ह्या पृथ्वीवरील एकमेव जीव म्हणजे मानव.

साधारण पणे गेल्या २०० वर्षां पर्यंत रासायनिक खतांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा शेतीत शिरकाव न्हवता.भारतात पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत रासायनिक शेतीचा प्रभाव न्हवता.

पण १९५० नंतर हरित क्रांतीच्या प्रभावाने, अधिक उत्पादन हवे म्हणून, ह्या प्रकारच्या शेतीचा जाणून-बुजुन प्रसार करण्यात आला.

ह्या शेतीचे वाईट परीणाम पाहता, आता विचार फार विचार न करता, नैसर्गिक शेती कडे वळणे भाग आहे.

कोणे एके काळी मी स्वतः एका कीटकनाशक तयार करणार्‍या कंपनीत नौकरी करत होतो.तिथे एका फार बुद्धीमान असणार्‍या एका रसायन तज्ञाची ओळख झाली.त्याच्या माहिती आणि अनुभवानुसार कीटक ह्या प्रुथ्वीतलावरून कधीच नाहीसे होणार नाहीत.

कीटक मरण्या पुर्वी आपली अंडी जमिनीत पुरतात किंवा झाडा झुडपांवर ठेवतात.त्यामुळे कीटकांच्या पुढील जमातीवर आधीच्या कीटकनाशकाचा फार जास्त परीणाम होत नाही.

त्यामुळे दर काही वर्षांनी परत एकदा अधिक परीणाम कारक (म्हणजे अधिक विषारी) कीटकनाशक बनवणे भाग पडते.

आपण कितीही वेळा भाज्या किंवा तत्सम शेती आधारीत वस्तू धुतल्या तरी आपल्या शरीरात पण ही अपायकारक द्रव्ये शोषली जात असतातच.

जी गोष्ट खतांची, तीच कहाणी खतांची. खतांच्या अति वापराने जमीन हळू हळू पण कधीही लवकर भरू न शकणार्‍या नापीक आणि टणक जमीनीकडे वळू लागते.शिवाय ही खते पण अन्नधान्या स्वरुपात आपण सेवन करत असतोच.

ह्या रासायनिक शेतीचे वाढते वाईट परीणाम म्हणजे, आज आपल्या देशात, मधूमेहाच्या आणि किडनीच्या दोषाने हतबल झालेल्या वाढत्या रुग्णांची लक्षणिय संख्या.

भारतालाच नाही तर, जगाला देखील रासायनिक शेतीची अजिबात गरज नाही. पण लक्षांत घेतो कोण?

गेल्या काही वर्षांत शेतकर्‍यांशी ह्या विषयावर चर्चा करत असतांना जाणवलेले काही मुद्दे.

१. मी तर एकच लिटर कीटकनाशक वापरतो, माझ्या बाजूचा २ लिटर वापरतो.

२. मी जरी वापरणे बंद केले तरी, बाजूचे शेतकरी वापरणारच मग ते कीटक माझ्या शेतावर हल्ला बोल करणार. मग मीच का आधी नको वापरायला?

३. भाज्या आणि फळे धुवून घेतली की झाले.

४. मी करत असलेली भाड्याची आहे.मला जर उत्पनच नाही मिळाले तर मालकाला हकनाक पैसे द्यायला लागतील.

५. माझी मुले काही शेती करणार नाहीत, मग माझ्या जमीनीची वाट लागली तरी चालेल.

६. माझा मालक मला विचारत नाही, मग तुम्ही कोण मला सांगणारे?

७. तुम्ही स्वतः शेती करता का? मग तुम्हाला काय अधिकार?

-----------------

प्रश्र्न बरेच आहेत पण उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा. त्यात २ फार महत्वाची वाक्ये आहेत.

"माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे."

---------------------------

माझ्या पुरती तरी, ह्या प्रतिज्ञेला मी माझ्या शेती बाबतीत एक ध्येय वाक्य मानतो.माझ्या बांधवांना मी रासायनिक अन्न खाऊ घालणार नाही.

मला तर शेती करण्याचा स्वानुभव फक्त ४ महिन्यांचा. सुरुवातीला मला पण रासायनिक खते वापरा असा सल्ला बर्‍याच जणांनी दिला, पण मी माझ्या मताशी ठाम होतो. भले एकही रोप जगले नाही तरी चालेल, एकही मिरची नाही आली तरी चालेल पण मी रासायनिक शेती करणार नाही.

आज मी निदान घरच्या पुरती तरी मिरची घेवू शकलो आणि ते पण नैसर्गिक शेती करून. मग ज्यांना शेतीचा पिढी जात अनुभव आहे ते तर नक्कीच ही नैसर्गिक शेती करू शकतील.

हा लेख जरा निबंधात्मक झाला आहे, पण त्याला माझा नाईलाज आहे.