मराठी भाषा दिन २०१७: जागृत (बाणकोटी)

1

जागृत

तं झाला काय, सगलीकडना काय बायशा बातम्या येईत. आज ह्या गावातला पोर पलवून बाटवलीन, उद्या त्या गावातल्या ल्येकीबालीला उचलून न्हेलीन. सगल्या गावात निस्ता भय, कंदी काय व्हयल त्याजा पत्त्या नाय. येका येलं त्या घुआगरातनं का कायशी बातमी आली, का म्हनं समुंद्रावरना लोका येईत आनि रोज नंदर ठेवीत, यकांदी बरी दिसनारी पोर न्हेईत आनि लांब दर्यात फेकून देईत. वान्या-बामनाच्या पोरी दिसाय कशा आप्सरंसार्‍या!! सगल्या भितीन् गारटून गेलंल्या. येकदोगीनी होरंत उडी मारलंनी. तिकडनं आमचा गाव काय तसा लांब नाय हो, काय समाजलांव!! आमच्या गावच्या शिवंपाशी कंदीबी येयल हा संकट, म्हनून सगल्यांच्या पोटात मुरडं पडलीलं. बायाबापड्यांचं पायरव दिवस मावलायच्या आतच बंद झालीलं.

ह्याजा कायतरी बंदोबस्त करियालाच होवा. रात्ची जेवना झाली, सगली वायच आशी आंगन्यात लकाटल्याली. आमच्या घरात काय चाल्लाय आयकाय पायजे म्हनुन वायच डोलं मिटल्यासारं केलं नि चिप र्‍हायलो. मोटी सून म्हनं, "जल्ला काय ठेवलांय ह्या गावांत? बाबांला सांगाय होवा, गुंडाला सगला बाडबिस्तारा नि लांब जाव सगली कुटंतरी दुसर्‍या गावात". ल्येक म्हनं, "तां खरां गं वयनी, पन बाबांला कोन सांगयाचां. मना फुडं करशील तं मी शाप मागं फिरन. तुमांला वाटत आसंल तं तुमी सांगा". मायला, मोटी सून आन ल्येक लईच कमजोर निंगाल्या. धाकटी सून म्हनं, "ह्या आपला गाव हाय, आपन कसा पलून जायाचा? मना काय ह्या खरां नाय वाटत, तुमांला काय करियाचा तां करा. ह्या घर काय मी सोडियाची नाय."

आता आम्च्या घरामंदी ह्या चाललिला तसा परतेक घरी चाललीला असनार. ह्याचा काय करियाचा ता ईचार करीतच डोलं मिटलं नि आंगन्यातच निजलो. नागान् दर्शन दिलान, हा येवडा मोट्टा नाग. बगीत र्‍हायलो, मना वाटला आता चावताय का काय!! नरडं सुकलीलं, तोंडातना शबद नाय फुटं, पन मना काय आटवला आसंल? घरच्या देवाचा नाव घ्येतला. तसा तो नाग मानसासारा बोलं. म्हनं, "घर सोडूनशान चाललाईव? मंग मना कोनी बगियाचा?". वायच धीट होवन ईचारला, "कोन रं बाबा तू?" तं म्हनं, "तुमच्या ह्या जागंचा राखनदार हाय मी, सगला नीट होयल. पर ह्या घर सोडियाचा नाय." येवडा आयिकला न मला आली जाग!! सगला सपान व्हता. तेवड्यात कुपनापल्याडच्या भागीच्या कोंबड्यान बांग दिलान. फाटं पडलिला सपान हाय, खरांच तां. हितंच र्‍हायचा आनि संकट दारावं आल्याला!! निस्त्या इचारान पोटात कसा झाला नि लोटी घेवन पांदीकं ग्येलो. परत येताना भटाचा म्हातारा नंदरं पडला, नि मांज्या डोक्यात कायसा झाला.

घरी आलो आंगोली हुरकल्या नि नातवाला बलिवला, म्हटला पलत जा नि भटाच्या आनि गुरवाच्या म्हातारबाला बलिव. नातू आला नि मांगं दोनय म्हातारं आलं. आमी तिगंव नाकाचा शेंबूड पुसत आसल्यापासना येकमेकांला वलकीत व्हतंव. आमच्या तिगात काय ठरला तं हिकडचा तिकडं समजत नसं. गुरवाला त्याच्या ठरलील्या तांब्यात वायच ताक दिला. नि मंग इचारला, "ह्या जा काय गावांत चाल्लाय त्याचा बंदोबस्त करियाचा हाय, पर मी सांगताय तां पटतांय तं बगा." तसा मी जा काय यवजलीला व्हता तां सांगतला. दोगंय म्हातारे राजी झाले. आता भय न्हवता, सगली वाट बगीत व्हतो, कंदी ही वश्शाडी येताईत नि आमी त्यांच्या पाटानीत फटके देतंव. येक मन म्हनं का आनि कोनाला ह्या सांगाय होवा. पर गावभर झाला तं काय राम नाय. तिगंव गप बसलो पर गावकर्‍यांला येक ताकीद दिली, असा कोनंव आलीला दिसला, त्याला सरल धरुन रामवरदायनीच्या देवलात घेवन येयाचा.

येक्या आवसंला शिवंपल्याडल्या गावात कंदाल झालिशी खबर आली. आता गावकर्‍यांला शेवटचा बलवून सांगतला, "सगली तयार हांव ना? जा कोन येयल त्याला देवलात आनियाचा. दोन-तीन मानसा असली तरी आपला सगला गांव हाय. घाबरायचा काम नाय!!" दुसर्‍याच राती सुताराचा सदू कायसा इपरित वाटला म्हनून जागा झालंला, तं त्याला कायसा फिरत आसलीला दिसला, पुनव जवल आलंली, तं चांदन्यात मानूस वलकू येय. हा काय गावातला मानूस नायसां दिसतां. असा म्हटल्यावं त्यानं कोयती घेऊन जी त्याज्या मांगं बोंब ठोकलान आनि चार लोका जागी झालंली. चुलीतला कोलीत, झाडू, काय हातात मिलंल ता घेवन ह्या मानसाला पकडलीन. सगला गाव जागा झालीला. खबर लागली तसा गुरवाचा नि भटाचा म्हातारा संगाती घेवन सगली देवलात गेलंव.

बगतलां तं हा काय वलकीचा दिसं नाय? तो सारका सांगं मना सोडा, मना सोडा. आमी आशी बरी सोडतंव!! सदून लगोलग मानंवं कोयती धरलान. तसा म्हनं, खबर काडाय पाटवलीला हाय मना. किती घरां हायत, किती नि कंदी जाग असते गावात असा सगला. नि सगली खबर काडून्शान मंग कुटल्या घरातनं कोनाला उचलून न्हेयाचा ता व्हनार. ह्ये आयकलं तसा यवजल्यापरमानं गुरव घुमाय लागला. चैती पुनवंला त्याज्यावं रामवरदायनीचा वारा येय. पर ह्या आज केलीला सगला नाटक!! ता केल्याबिगर लोकांचा धीर चेपलसा वाटत न्हवता. आलंला मानुस तो परधर्माचा!! त्यास काय नाय उमगं ह्या काय चाललीला हाय तां. भटाच्या म्हातार्‍यान जानवंजोड हातात घेतलान नि कायसा पुटपुटाय लागला. गुरवान गुलाल बुक्का ह्या मानसाच्या डोकीव लावलान नि भटान त्याला जानवंजोड घातलान. गुरव आन्नि मोट्यान घुमाय लागला. तसा मी म्हटला, "आरं लोकांना काय बाटवताइव? आज तुला बाटवलीला हाय आमच्या ह्या गावान. जा, नि तुज्या त्या म्होरक्यास खबर देस. पुन्ना का हिकडं आलांव तं तंगडीच तोडतंव. आता निस्ता बाटवलीला हाय, म्होरल्या येलं पाटानीला चांगलं त्येल लावन या. आमची लोका हितं बांबू घेवन्शानी तयारच हायत तुमान्ला सडकून काडाय. चल निंग!!"

तो गेला तसं गावकरी म्हनत देवी जागृत!! संकट दूर केलान!! मी, गुरव नि भटाचा म्हातारा नंदरंला नदर देवन गप बसलंव.

1