
कोकण ही माझी जन्मभूमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात माझं बालपण गेलं. नंतरचं शिक्षण पुण्यात, काही काळ होस्टेलवर आणि मग लग्नानंतर आता पुण्यात स्थायिक झाले. ह्या आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप वेगवेगळ्या स्वभावाचे, पार्श्वभूमी असलेले लोक भेटले. त्यांपैकी विशेषकरून स्त्रिया माझ्या कायमच्या लक्षात राहिल्या. अगदी चारचौघींसारख्या असलेल्या ह्या बायका त्यांच्या स्वभावातील एखाद्या विशेष चांगल्या पैलूमुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या त्यांच्या धडाडीमुळे आजही माझ्या मनात घर करून आहेत. 'जागतिक महिला दिनाचं' औचित्य साधून त्यांना हा 'मानाचा मुजरा'!!
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आमच्या गावात सपाटी जवळजवळ नाहीच. कुठेही जायचं असेल तरी दहा पायऱ्या चढायला किंवा उतरायला लागतात. तालुक्याचं ठिकाण असलेल्या गावात त्या वेळीही बऱ्याच सोई होत्या. आजूबाजूच्या गावातल्या लोकांसाठी तर ही मोठी बाजारपेठ होती. आसपासच्या गावातले लोक कधी बाजारासाठी, कधी स्वतःकडचा भाजी-पाला, फळं-फुलं विकण्यासाठी सकाळच्या पहिल्या एस.टी.ने येत आणि जाताना वाणसामान वगैरे घेऊन जात. शिमग्यानंतर आमच्याकडे सुभद्रा येत असे. आमच्या गावातल्याच एका लांबच्या वाडीत सुभद्राचं घर. बेताचीच उंची, तुकतुकीत कृष्णवर्ण, काळ्याभोर केसांचा व्यवस्थित चापून-चोपून घातलेला आंबाडा, त्यात किमान एक तरी फूल, स्वच्छ गुडघ्यापर्यंत येणारी नऊवारी, साडीला मॅचिंग ब्लाऊज, कपाळावर रुपयाएवढं मोठ्ठ कुंकू आणि डोक्यावर हा भलामोठा हारा. साकट भाजीला फणस, पन्ह्यासाठी कैऱ्या, खोबरी आंबे, पडीचे आंबे, साखरबिटक्या, जांभळं, करवंदं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सुरंगीच्या वेण्या असा माल तिच्या हाऱ्यात असे. बाजाराचा रस्ता आमच्या घरावरून जात असल्याने जाताना, "गो वैनी" अशी रस्त्यावरूनच हाक मारून ती सरळ फाटक उघडून येत असे. आल्यावर "वैनीनू... " म्हणून ती अस्सल कोकणीत सुरू व्हायची. बोलण्यात तिला भेटलेली चांगले लोक आणि त्यांचे अनुभव हाच विषय असायचा. मात्र बोलताना ती जे वाक्प्रचार आणि म्हणी लीलया वापरायची, ते ऐकताना आम्ही अवाक व्हायचो. कधीही शाळेची पायरी न चढलेल्या सुभद्राच्या जिभेवर अक्षरशः सरस्वती विहरत असायची. बरं नुसत्या म्हणी वगैरे नाही, तर अध्यात्मातले दाखले, वेगवेगळ्या देवदेवतांच्या कथा हे सगळं त्यांत अतिशय सुरेखपणे गुंफलेलं असायचं. लांबून चालत येते म्हणून आई तिला चहा द्यायची. त्यावर "माझी बाय म्हणजे अन्नपूर्णा जणू", असं बोलून आणखी एक पुराणकथा सांगायची. खरं तर आम्ही तिच्याकडून कधीतरीच काही विकत घेत असू, पण तिला त्याचं काहीच वाटायचं नाही. जणू काही मनातलं बोलून मोकळं होण्यासाठीच ती आमच्याकडे येऊन जायची. तिच्या त्या बोलण्यात इतकी सकारात्मकता असायची! अजूनही सुभद्रा आहे. फक्त वयोमानानुसार इतक्या लांब चालत बाजारात येत नाही.
आमच्या घरापासून तीन घरं सोडून सगळी लेल्यांची घरं आहेत. त्यांच्यातल्या सर्वांत थोरल्या आजींना 'मोठ्या मामी' म्हणून ओळखलं जायचं. दिसायला अतिशय सुंदर, गोरा केतकी वर्ण, ब्राह्मणी पद्धतीचं नऊवारी लुगडं, आंबाडा आणि मोठ्ठं कुंकू अशा ह्या मोठ्या मामी त्या वेळच्या मॅट्रिक होत्या. घरी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाती पाठवायचं नाही ही कोकणातली पद्धत. पण आसपासच्या वाडीत कोणीही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालं की मामी निरोप पाठवून त्यांना घरी बोलावून घ्यायच्या आणि चहा, गोडाचा शिरा आणि दहा रुपये बक्षीस देऊन त्या मुलांचं कौतुक करायच्या. त्यांच्या ह्या कौतुकाच्या थापेमुळे कितीतरी मुलांना पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असेल.
माझ्या एक मामी आहेत. उत्तम शिवणकाम करतात. त्यांना सख्खं असं कोणीच नाही. काही कारणामुळे मूलबाळ होऊ शकलं नाही आणि जो एक सावत्र भाऊ होता तोही वारला. घरचं एकत्र कुटुंब. सगळे जण वडिलोपार्जित व्यवसायात होते. आणीबाणीनंतर एका रात्रीत व्यवसाय बुडाला. शिक्षण नसल्याने घरातील सगळे पुरुष घरी बसले. त्या वेळी आपल्या शिवणकामाच्या जोरावर मामींनी घर सावरलं आणि जिद्दीने पुतण्यांना शिकवलं. घराच्या ओसरीत बालवाडी सुरू केली. त्यासाठी जिल्हा पातळीवरचा पुरस्कारही त्यांना मिळाला. पण पैशाची चणचण काही कमी होत नव्हती. मला आठवतंय, पुण्याजवळ राहत असलेल्या मामींना आम्ही जेव्हा लोकलने भेटायला जायचो, तेव्हा गेल्यागेल्या आई त्यांना पैसे घालून पाकीट द्यायची. मग त्या आम्हाला घेऊन बाजारात जायच्या आणि मला फ्रॉकचं कापड, माझ्या भावाला आवडतात म्हणून बटाटेवड्यांचं सामान असं घेऊन यायच्या. घरी येऊन जेवण झाल्यावर मला फ्रॉक शिवून द्यायच्या. इतकी वर्षं पाहतेय, पण कधीही स्वतःच्या नशिबाला बोल लावत रडगाणं गायलेलं मी त्यांना पाहिलेलं नाही, नेहमी आनंदी आणि हसतमुख. आता सगळे पुतणे शिकून स्थिरस्थावर झालेत. आता बाहेरचं शिवणकाम आणि बालवाडी सगळं बंद झालंय. पण आजही नात्यातल्या कोणाकडे बाळंतपण, लग्न वगैरे असेल तर मामी धडपडत मदतीला म्हणून येतात. जे पुढ्यात वाढून ठेवलंय ते स्वीकारून पुढे जात राहण्याची, नेहमी आनंदी आणि हसतमुख राहण्याची, परिस्थितीवर मात करण्यासाठी कष्ट करण्याची, माणसं धरून ठेवण्याची त्यांची वृत्ती मला खूप ऊर्जा देऊन जाते.
आमच्या कोणाहीकडे काहीही कार्य असलं की स्वयंपाकघराचे सगळे अधिकार माझ्या 'माई मावशी'कडे आपोआपच जायचे. खरं तर माझी ही मावशी आईची सख्खी मोठी बहीण, दोघींच्या वयात जवळजवळ १५ वर्षांचं अंतर. मावशी जुन्या काळची SNDTतली द्विपदवीधर. एकाच वेळी नोकरीबरोबर स्वतःच्या सासू-सासऱ्यांना, वडिलांना, मामांना - सगळ्यांची वयं ८०च्या पुढची - कॉलेजात शिकणाऱ्या दोन मुली आणि पाहुणे अशा सर्वांना मावशी सांभाळायची. प्रत्येकाचं पथ्यपाणी, आवडीनिवडी सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं जायचं. उन्हाळ्यात सकाळी मार्केटयार्डला जाऊन आमरसासाठी पायरीच्या करंड्या लूनावरून घेऊन यायची. मी माझ्या एकाही आजीला पाहिलेलं नाही, त्यामुळे आजीची माया कशी असते याचा मला अनुभव नाही. मला माझ्या माई मावशीतच माझी आजी दिसते. डॉक्टरांनी आशा सोडलेली असताना दोनदा मावशी वरचं दार ठोठावून आली ते केवळ तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरच! अपघातानंतर अधू पडलेल्या शरीराच्या एका बाजूवर आणि गेलेल्या स्मरणशक्तीवर यशस्वीपणे मात करून मावशी ५८ वर्षांपर्यंत नोकरी करून रीतसर सेवानिवृत्त झाली. आजही मी घरी भेटायला गेले की आवर्जून माझ्या आवडीचे पदार्थ करून ठेवलेले असतात. धडाडी, आत्मविश्वास, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा स्वभाव आणि नि:स्वार्थी प्रेम करणं हे मावशीचे स्वाभाविक गुण मला आकर्षित करतात.
ऑनर्सला आम्हाला 'Real Algebra'चा पेपर होता. अतिशय 'व्हेग' असा हा विषय सुरुवातीला अगदीच डोक्यावरून गेला. पण फायनलपर्यंत इतका आत्मविश्वास आला होता की ह्याच पेपरात परीक्षेत ७८/१०० मार्क मिळाले. ह्याचं एकमेव कारण म्हणजे आम्हाला मिळालेलं मार्गदर्शन आणि आमच्या मार्गदर्शकाचं नाव होतं - डॉ. सौ. मंगला नारळीकर. अतिशय उत्साही, चटपटीत, निगर्वी आणि प्रचंड बुद्धिमान असं हे व्यक्तिमत्त्व. त्या वेळी आयुकामुळे डॉ. नारळीकर सरांचं नाव पुण्यात गाजत होतं. त्यामुळे मॅडमच्या पहिल्या भेटीत आमच्या मनावर दडपणच होतं. पण मॅडमच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ते दडपण कुठल्या कुठे पळून गेलं. जे गणित अडलं असेल त्याबद्दल आमची थॉट प्रोसेस त्या अगोदर विचारायच्या. साहजिकच प्रत्येकाचा विचार वेगळा असायचा. मग मॅडम प्रत्येकाच्या विचाराचा धागा पकडून तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारे ते गणित सोडवून दाखवायच्या. खरं तर हुशार आणि एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान असलेली व्यक्ती उत्तम प्रकारे शिकवू शकेलच असं नसतं. पण त्यांच्या बरोबर शिकलेली Convergenceची व्याख्या अजून तोंडपाठ आहे. एखादा विषय आनंद घेऊन कसा शिकायचा हे मला मॅडमनी शिकवलं.

गणिताशिवाय मॅडमच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरीही एक बाजू होती. त्या एक उत्तम गृहिणी होत्या आणि त्यात त्यांना काहीही कमीपणा वाटायचा नाही. अजूनही मॅडम तशाच आहेत. तशाच लाईट रंगाच्या कॉटनच्या साड्या नेसतात, कोठेही भेटल्यावर मनमोकळेपणाने गप्पा मारतात.
आजकाल मनःशांतीसाठी कोणत्या ना कोणत्या तरी बाबांचा अनुनय घेण्याची पद्धत आहे. मग त्यांच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे, किती सहवास आहे, हे सगळे प्रश्न त्यापुढे गौण ठरतात. पण ज्या व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा त्याग केला आहे ती व्यक्ती आपले सांसारिक प्रश्न सोडवायला कशी मदत करणार, हे कोडं काही मला उलगडत नाही. दैनंदिन जीवनात अशा अनेक अडचणी येतात की ज्यांना आपल्याला स्वतःलाच तोंड द्यावं लागतं. किंबहुना बऱ्याच वेळा आपण बाहेरच्या कोणाही जवळ त्यांची वाच्यताही करू शकत नाही. अशाच काही प्रसंगी किंवा जेव्हा एखाद्या दिवशी रोजच्या ताणतणावामुळे उदासवाणं वाटतं, तेव्हा ह्या सगळ्या नायिकांच्या आठवणी मनाला उभारी देतात आणि मरगळ कुठच्या कुठे पळून जाते. अशावेळी प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं तरी फोनवर बोलल्याने काम करायला उत्साह येतो. त्यांच्यातील सकारात्मकता, आनंदी वृत्ती, कष्टाळू वृत्ती, हाती घेतलेले काम पूर्णत्वाला नेण्याची आग्रही वृत्ती, न डगमगता आलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं धैर्य, निगर्वीपणा आणि दुर्दम्य आत्मविश्वास मला नव्या जोमाने काम करण्याची ऊर्मी देतात.
(डॉ. सौ. मंगला नारळीकर यांचे छायाचित्र http://cmscollege.ac.in येथून साभार)
