सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून सुचून जाते एखादी ओळ...
अपेक्षित असते साधीच ठिणगी, उठतो युगांचा लोळ...

मग भांबावून जातो आपणच अन् होतं कसंनुसं...
प्रश्न पडतो आपल्यालाच.. हे असलं सुचलं कसं??

पण एकदा सुचल्यावर हात नाही झटकता येत..
मुळात कविता आपला हात सहजासहजी नाही कोणाच्या हातात देत..

मग ह्या असल्या सुचण्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते..
आणि ही बया त्यावर फार विचित्र गोष्टींचं दानही मागते..

कधी चंद्र, कधी रात्र... आणि अश्रू तर ठरलेलेच..
साधं सरळ काहीच नाही... सार्‍यांच्या पोटी मुलखाचे पेच..

ध्यानीमनी काहीही नसताना होऊन बसतो आयुष्यभराचा घोळ...!
जेव्हा अगदीच सहज सुचलं म्हणून सुचून जाते एखादी ओळ...

- वटवट (चेतन दीक्षित)