पुस्तक वेल्हाळ (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

Header

पु पुस्तकाचा आणि पुण्याचा माझ्या मते एकच. मराठी पुस्तकांची जास्तीत जास्त प्रकाशने पुण्यात आहेत.
पुण्याचा आणि पुस्तकांचा प्रथम परिचय करून दिला एका पुस्तक वेल्हाळाने. तसे तर वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचून काढायची हौस फार. शालेय पर्वात आसपासच्या सगळ्या लायब्रऱ्या घासून पुसून वाचलेल्या. अगदी चांदोबापासून ते सुशि, बाबा कदम पर्यंत. कॉलेजात गेल्यावर जरा दर्जेदार वाचनाची ओढ निर्माण झाली. पु.ल., गोनीदा, ना.सं. इनामदार, बाबा पुरंदरे यांनी वाचनविश्व व्यापले. मग काही दिवस कुसुम अभ्यंकर, योगिनी जोगळेकर, आशा बगे, इंद्रायणी सावकार, सुधा मूर्ती यांचा प्रभाव होता. नंतर जी.ए., जयवंत दळवी, व.पु., रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ यांच्या साहित्यिक शैलीची गोडी लागली.
१९९१ साली नुकती नोकरी लागलेली आणि पुण्यात बदली झाली. चारी बाजूंनी उंच उंच कपाटांनी वेढलेल्या केबिनीत माझं एक टेबल आणि शेजारी एक टेबल. पहिल्या दिवशी बघितलं तेव्हा ते आणि त्यामागची खुर्ची रिकामीच होती. मागे नेमप्लेट तेवढी चमकत होती. ‘मोहन वेल्हाळ’. शेजारी कसा काय मिळतो याची उत्सुकता तर होतीच. पण दिवसभर ते रिकामंच राहिलं. आणि उत्सुकता अधांतरी.
दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा त्या टेबलावर एक बॅग होती. खुर्ची रिकामी. काही वेळाने एक उंच निंच धष्टपुष्ट ‘इसम’ डुलत डुलत आला आणि त्या खुर्चीत धपकन बसला. वय पंचावन्नच्या आसपास. सावळा वर्ण, डोक्यावर करडे तुरळक केस, मिरची भजी छाप नाक, साधासा चौकड्याचा शर्ट, ग्रे पँट आणि उग्र चेहेरा.
पण या सगळ्यापेक्षा लक्षात राहिले ते बारीक काळेभोर डोळे आणि त्यातली भेद्क नजर. आरपार वेध घेणारी. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून श्रीयुत वेल्हाळ कामात दंग झाले. काही वेळाने त्यांच्या हातातले काम संपले. मग त्यांनी माझी चौकशी केली. नाव, गाव, आधी कुठे होता वगैरे. हळूहळू ओळख झाली.
रोज दुपारी जेवणाची सुट्टी झाली की हा इसम शेजारच्या कपाटाचे कुलूप काढून त्यात डोके घाली आणि बरोबर आणलेल्या बॅगेत त्यातल्या सामानाची काढ घाल करी. जरा वेळाने पुन्हा नीट बंदोबस्तात कुलूप घालून ठेवी.
एकदा मी न राहवून काहीसे चेष्टेने विचारले, ‘का हो वेल्हाळसाहेब, कसला खजिना ठेवलाय तुमच्या कपाटात ? बघू तरी जरा !’
‘आज नाही, सोमवारी दाखवेन तुम्हाला.’ वेल्हाळ इतके गंभीरपणे बोलले की माझ्या चेहेऱ्यावरचे हास्य पळून गेले.
दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यावर ते मला म्हणाले, ‘वेळ कसा घालवता इथे संध्याकाळचा ?’
‘काही नाही, हो. कंटाळा येतो. एखादी लायब्ररी आहे का इथे ? पुस्तके तरी वाचीन म्हणते.’
वेल्हाळानी एक दोन मिनिटे माझ्याकडे शोधक नजरेने पाहिले आणि उठले. कपाटाचे कुलूप काढले आणि मागे वळून म्हणाले, ‘घ्या !’
मी उत्सुकतेने आत डोकावले, तर काय ! कोरी करकरीत पुस्तके हारीने मांडून ठेवलेली. कपाटात खरोखरच खजिना मिळाला की !
मी थक्क होऊन विचारले, ‘कुणाची ही पुस्तकं ?’
‘माझीच की ! तुम्हाला हवं तर रोज एक घेऊन जा वाचायला.’ वेल्हाळ शांतपणे म्हणाले.
मला हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला. उत्साहाने मी पुस्तके चाळू लागले. चांगल्या दिग्गज साहित्यिकांची पुस्तकं. जरा खालीवर करून मी जयवंत दळवींचं ‘निवडक ठणठणपाळ’ निवडलं.
वेल्हाळांच्या चेहेऱ्यावर दांडगी उत्सुकता. ‘कुठलं घेतलंत , बघू ?’
आणि ठणठणपाळ पाहून चेहेरा इतका प्रसन्न झाला , की बोलून सांगवत नाही.
‘हेच का घेतलं ?’
‘आवडतं मला दळवींचं लेखन !’
वेल्हाळ हसले. ‘वाचा आणि मग तुम्हाला सांगतो दळवींचे किस्से एकसे एक.’
‘म्हणजे ?’ मला काही कळेना.
‘आज संध्याकाळी दळवींच्या साठी मासळी घेऊन जाणार आहे त्यांच्या घरी !’ डोळे मिचकावून ते बोलले.
‘त्यांच्या एका पुस्तकाचं पुनर्मुद्रण करतोय.’
‘तुम्ही?’ मी आ वासला.
‘मग ? माझा हाच खरा व्यवसाय. नोकरी हा उपजीविकेचा उपद्व्याप !’
म्हंजे हे वेल्हाळ खरोखरीचे पुस्तक वेल्हाळ होते तर !
आम्हा दोघांची ‘समानशीले...’ न्यायाने लगेच गट्टी झाली.
मग काय, सहा एक महिन्यात मी वेल्हाळांच्या खजिन्याचा फडशा पाडला. त्यांचा संग्रह हा उत्तम साहित्यकृतींचा खजिना होता. लेखनाचे साहित्यमूल्य कसे जाणावे हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. दळवींची बरीच पुस्तके त्यांनी मुद्रितशोधन केली होती. इतरही अनेक लेखकांच्या पुस्तकांना वेधक रंगरूप दिले होते. हस्तलिखिताचे काँप्युटरप्रतीमध्ये रुपांतर करतानाच मुद्रितशोधन करायचे. हे संपादनाचे काम किती किचकट होते ते मला त्यांच्याकडचे एक हस्तलिखित पाहिल्यावर समजले. शुद्धलेखनाच्या चुका, विस्कळीत मांडणी, लॉजिकल विसंगती या सगळ्याचा सूक्ष्म अभ्यास करून सुधारणा कराव्या लागत. दळवींसारख्या उच्च दर्जाच्या लेखनात फारच कमी मुद्रितशोधन करावे लागे. पण इतर बरेचसे काम डोकेदुखी आणि कटकटीचे असे. पण वेल्हाळ ते हौसेने करीत आणि इतके नीटस करीत की मूळ हस्तलिखित आणि मुद्रित पुस्तक यात कमालीचा कायापालट झालेला असे.

खरी करमणूक होती ती त्यांच्या तोंडून साहित्यिकांचे किस्से ऐकण्यात. नारायण धारप माझे फेवरिट लेखक. त्यांचा एक किस्सा वेल्हाळांनी एकदा सांगितला.
धारप यांचे जंगली महाराज रोडला जुन्या फर्निचरचे दुकान होते. वेल्हाळ एकदा तिथे गेले असताना त्यांनी धारपांना विचारले, ‘तुमच्या भयकथांमधली पात्रे आणि प्रसंग खरे असतात का ?’
त्यावर धारपांनी मोठे अजब उत्तर दिले, ‘माझ्यासाठी शंभर टक्के खरेच असतात !’
गोनीदांच्या समवेत वेल्हाळ पुष्कळ फिरलेले. गोनीदा खूप भ्रमंती करीत. इतका महान साहित्यिक भ्रमंती करताना केवळ एक पिशवी घेऊन फिरत असे आणि कुणीशी दिलेली भाकर हातावर घेऊन खात असे, हे मी वेल्हाळांकडून ऐकले. आणखीही बरेच किस्से साहित्यिक विश्वाचे त्यांनी ऐकवले ज्यामुळे पुस्तकामागचा साहित्यिक नावाचा माणूस कसा असतो याची मनोरंजक माहिती झाली.
त्या दोन वर्षातले पुण्यातले वास्तव्य वेल्हाळांच्या पुस्तकांनी आणि त्यांच्या रसवंतीवर राहणाऱ्या साहित्यिक विद्वत्तेने अत्यंत सुखद झाले. मराठी साहित्य वाचण्याचा एक चिकित्सक चष्मा ही त्यांनी मला दिलेली विलक्षण देणगी आहे.
आता वेल्हाळ नाहीत. आजही मी जेव्हा कधी लायब्ररीत जाते तेव्हा पुस्तक निवडताना वेल्हाळांचा चष्मा माझ्या डोळ्यावर असतो. या चष्म्याने अनेक उच्च साहित्यकृतींचा आनंद लुटवला !
...वेल्हाळसाहेब, जिथे कुठे असाल तिथे या देणगीसाठी सलाम !
Footer