सहल गाणी!

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/…");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round ;
}

साधारण डिसेंबर सुरू झाला की शाळेचा शिपाई एका दिवसाच्या सहलीची नोटीस घेऊन येई. वर्गात नुसता दंगा होत असे. एकदाचा तो दिवस उजाडे. घरून पुरीभाजीचा डबा, रसना सरबत, फाइव्ह स्टार चॉकलेट असा खाऊ घेतला जाई. पाण्याची बाटली, लिमलेटच्या गोळ्या न विसरता घेतल्या जात. पहाटे सहा,साडेसहाच्या सुमाराला शाळेपाशी बस येणार असायची. बहुतेक सगळे जण वेळेआधीच ग्राउंडवर पोहोचलेले असायचे बाई हजेरी घ्यायचा पण कोणीतरी एखादा उशीर करायचाच. त्या काळी काही मोबाइल्स नव्हते आणि फोनही घरोघरी नसत. मग त्या उशिरा येणार्‍याची वाट पाहताना पिकनिकच्या वाटेवर त्याची /तिची काय आणि कशी वाट लावायची याचे बेत आखले जात असतानाच तो उशिरवाला प्राणी अवतीर्ण व्हायचा. सगळे बसमध्ये चढायचे. गणपती बाप्पा मोरया! च्या गजरात बस सुरू व्हायची. खिडकीतून बाहेर बघण्यापेक्षा बसच्या मधल्या जागेत एकत्र दंगा करण्यातच जास्त मजा वाटायची. दोन तट पाडून गाण्याच्या भेंड्या नाहीतर खास अशी पिकनिक साँग्ज यांनी बस दणाणून जायची.

SahalGani
पूर्वीच्या काळी मोटारगाड्यांमध्ये रेडिओ, टेपरेकॉर्डर एवढे विपुलतेने नसत. सीडी प्लेअरचा तर जन्मच झाला नव्हता. आधी मोटार गाड्याच सामान्य माणसाकडे विपुलतेने नसत. एवढेच काय व्हिडिओ कोचने जाणारी मंडळीही फार कमी असत. शाळा, कॉलेजच्या पिकनिकला, ट्रीपला जाताना बस अर्थात लाल डबाच असे नेहमी. अशा वेळी सहलीला जाताना अर्थातच भेंड्या खेळत आणि खास अशी पिकनिक साँग्ज गात दंगा करत सगळे सहलीचे ठिकाण येईपर्यंत घसे बसवून घेत असत. सहलीची ठिकाणेही तासादोनतासात पोहोचू अशी असत. त्या काळी ठाण्यातून ओवळ्याला, येऊरला, पोखरणच्या जंगलातही सहली निघत. त्यातीलच मुंबई दर्शन, कणकेश्वर, अलिबाग, किहिम बिच, गोराई बिच, नेहरू सायन्स सेंटर,आरे मिल्क कॉलनी, खिडकाळेश्वर ही काही वानगी दाखल ठिकाणे-
"गल्यान साखली सोन्याची ही पोरी कोनाची" ह्या गाण्याने बहुदा सुरूवात होत असे. मग लगेच कुणाला तरी सोनू आठवे आणि सुरू होई,

सोनु तुला सोन्याची माळ घे
सोन्यापरी लेडीज घड्याळ घे
टेरीकॉट्ची साडी घे गोल गोल
आतातरी माझ्याशी गोड बोल

सोनूला गोड बोलायला लावून गाडी लाल पागोट्याकडे वळे..

लाल लाल पागोटं गुलाबी शेला...
चिंट्यादादा गेला... जीव झाला यडा...

चिंट्यादादाला घालवून दिलं एकदाचं की दांड्यावरून नवरा यायचा..
या गो दांड्यावरनं नवरा कुणाचा येतो.. पार अगदी दारुगोळे उडवेपर्यंत वरात चालू रहायची. मुलं बसच्या मधल्या भागात नाचायला सुरूवात करायची. धमाल यायची.
नाचून ,गाऊन दमलं की मग मालाडच्या म्हातार्‍याची शेकोटी पेटायची. हा म्हातारा मालाड पासून सातार्‍यापर्यंत कोणताही असायचा पण शेकोटी मात्र पेटवायचा आणि शेकोटीला येताना सगळं वर्‍हाड घेऊन यायचा.

दत्त दत्त.. दत्ताची गाय.. यायची. तर कधी बिलनची नागिन यायची
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवळ नको येऊ तुझे पापा बघतात.. हे गाणं गोव्याला ट्रीप जात असेल तर हमखास अगदी म्हटलं जायचंच..
आणि कुठे अक्षी बिच,किहिम बिच,अलिबाग, गोराई बिच..(हो, त्या काळी गोराई बिच हे शाळांच्या सहली नेण्याचं ठिकाण होतं.) अशी कुठे बिचबर सहल असली की मग हटकून
इन द मॉर्निंग,इन द मॉर्निंग, इन द मॉर्निंग बाय द सी... हे गाणं झालंच पाहिजे.

हीच माझी ,हीच माझी, हीच माझी सुशीला
मला एकट्याला सोडून ती गेली स्वर्गाला..
अशी त्या सुशीलाची आळवणीही व्हायची.

बसमध्ये कोणी संध्या नावाची मुलगी असेल तर
संध्याकाळी संध्याकाळी,
संध्या काळी का काळी?
हे गाणंही हमखास असायचं.

मालवण पाण्यामध्ये किल्ला,
शिवाजी आत कसा शिरला...

अशी शिवाजी महाराजां बरोबर मालवणच्या कुठल्याशा जलदुर्गावरची सफर घडवली जायची. पण ह्या सफरीचे वेळी महाराज अगदी सौंगडी झालेले असायचे, म्हणून मग त्यांचा असा एकेरी उल्लेख कुणाला खुपायचा नाही.
अशी सगळी गाणी चालू असताना
हिल हिल पोरी हिला व्हायचं आणि हिची चाल तुरुतुरू.. म्हटलं गेलं नाही तर फाऊल धरतील की काय? असं वाटावं इतकं ते गाणं मस्ट होतं.

मग यमुनेच्या तीरावरचे बुलबुल यायचे..
यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील बुलबुल असतील बुलबुल असतील वृक्षावरती हो
एक तरी दोन तरी तीन तरी असतील चार तरी बुलबुल हो.
चार तरी पाच तरी सहा तरी असतील सात तरी बुलबुल हो...

असे किती बुलबुल आणायचे तेवढे आणून त्यांना तीरावरून किती वेळ उडू द्यायचे नाही ह्याचे गणित करता करता कधी तरी बाई नाहीतर सरांचा आवाज येई.. चला आता आवरा, आपलं उतरायचं ठिकाण जवळं आलं.. हे उतरण्याचं ठिकाण म्हणजे कोणतं रिसॉर्ट नाहीतर अ‍ॅम्युझमेंट पार्क नसायचं. असं काही असतं हेच मुळात माहित नव्हतं. सहलीचं ठिकाण म्हणजे समुद्रकिनारा, येऊर सारख्या डोंगरावरचं जंगल नाहीतर लोहगड सारखा किल्ला असंच काहीतरी असायचं.. त्यामुळे मग नवीन उत्साहात सहलीच्या ठिकाणी उतरताना पुढचे खेळ, फिशपाँड यांची आखणी व्हायची. दिवसभर असं मनमुराद हुंदडून नवीन उत्साह आणि उर्जा घेऊन परत बस मध्ये चढताना मग भेंड्या खेळायला कोणीतरी सुचवायचं . पण थोड्या वेळाने मग दिवसभराचे शिणलेले शरीर आणि ताजेतवाने मन घेऊन एकेक जण पेंगायला लागायचा.

ह्या सहलगाण्यांतून आपल्यापैकी अनेकांच्या शाळा, कॉलेजच्या दिवसाच्या आठवणी ताज्या होतील.

गाणी संकलन- अनाहिता । मांडणी- स्वाती दिनेश । चित्र - किलमाऊस्की

https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png