नमस्कार करत्ये हो सर्वांना. आज मराठी भाषा दिन आहे ना, आपल्या कुसुमाग्रजांचा १०४ वा जन्मदिवस. त्या निमित्तान बोलीभाषा सप्ताह साजरा करूया अशी सूचना येताच सगळे साहित्य संपादक खुशीन कामास लागले. सप्ताहाचा धागा विणला तेवां मिपाकरांस ही कल्पना इतकी आवडेल आणि त्यांस इतका उदंड प्रतिसाद मिळेल असें वाटले न्हवते हो! पण हौसेनी असं कायतरी सुरू केलंनी तर मिपाकर कुणाला ऐकायचे नैत.
मिपाकरांनी अगदी भरभरून लेख, कथा, कविता आपाअपल्या बोलीभाषांतल्या लिहिलेनी, मग दर दिवशी दोन दोन प्रकाशित करूया असा विचार साहित्य संपादक मंडळीनी केलंनी. पुढे तं काय, मिपाकर कुठचे ऐकायला! आपणहून जास्त जास्तच लेख पाठवलेनी. म्हटले बेस झालें. बघता बघता, झाडी, वर्हाडी, मावळी, मालवणी, कोल्लापुरी, बाणकोटी, चित्पावनी, पद्ये, घिसाडी, शेष वंशी क्षत्रिय भंडारी, नगरी, खान्देशी, पुणेरी शहरी, पुणेरी ग्रामीण इतक्या सगळ्या बोलीभाषातले लिखाण आम्हास घरबसल्या वाचायस मिळालेंं. त्यासाठी सर्व लेखक वाचक मिपाकरांस पुष्कळ धन्यवाद!
पैकी चित्पावनी, पद्ये, घिसाडी या बोली आहेत हेच बहुतकरून कोणास ठाऊक नसेल. त्यांची कुठे फार नोंदही नसेल. हा बोलीभाषा सप्ताह म्हंजे भाषांच्या अभ्यासकांना पर्वणीच म्हटली पायजे. इतक्या विविध बोली एकाच जागी वाचायस मिळणे म्हंजे अहो भाग्य! त्यातच कोंकणीची शिखवणी म्हंजे दुधात साखरच हो! हो, तो मधल्या आळीतला झंप्या जोशी मेला बोललाच, "कशास हवीत ही खुळं? दुसर्या बोली नाय शिखलो तर कोणाचें काय बिघडेल का?" त्यांस म्हटले, अण्णा पटवर्धनाकडे पूजा सांगायास तू हाप प्यांट घालून गेलास तर काय बिघडेल का? प्रतेक गोष्टीचे आपापले म्हत्व आपापल्या जागी अस्तेंच. द्रिष्ट लागू ने, म्हणून गालबोट लावलंन, दुसरं काय!
बोली भाषा वेगळाल्या अस्तात हे अगदी ल्हान होत्यें तेवांच कळ्ळं. आम्ही रत्नांग्रीकर. मधल्या आळीतले नसलो तरी वरच्या आळीतले. जाज्ज्वल्य का काय तें पुणेकरांस आम्ही शिखवलेले. पण माझी आजी, मावशी वगैरे मंडळी आमच्या चुका काढत हो! "काय तुम्ही रत्नांग्रीकर, बसायचं, करायचं असं लांऽब कशाला म्हणता? बसाच्चं, कराच्चं असं बोलावं." आम्ही कुठले ऐकायला? मग तुम्ही रायगड जिल्ह्यातली लोकं "खाच्चं, जाच्चं असं का बोलत नाईत?" म्हटले की पुढे कोण कसला उत्तर देतोय! असा प्रतेकाला आपल्या बोलीचा अभिमान असतोच ना! रत्नांग्रीत तिथल्या तिथे वेगळाल्या जातीच्या आणि दाल्दी, खारवी अशा कित्तेक बोली ऐकल्यायत. त्यांचा पुढे दुसर्या भाषा मुळापस्नं शिखताना उपेग झालाच झाला.
आता सगळ्या मिपाकरांना हात जोडून विनंती करत्ये, बोलीभाषा सप्ताह संपला, मराठी दिनही साजरा झाला, मात्र बोलीभाषांत लिहणे थांबवू नका. नकळे कधी कोणाला कसला अभ्यास करताना यातला एखादा लेख म्हत्त्वाचासा वाटेल. आपल्याच मुलाबाळांना, नातवंडांना बोलीभाषा म्ह़ंजे काय हे शिखावयस लागले तर हा सगळा अमूल्य ठेवा आहे. बोलीभाषा म्हणजे नुस्ती बोलाची कढी आणि बोलाचा भात अशातली गत होता नये, लिहायची भाषा जरी प्रमाणाभाषा मराठी असली तरी आपली संस्कृती जपायची आणि मुलाबाळापर्यंत न्हेयची असेल (हा हा, अजिबात बुडवायची नाय्ये. मी बघत्याय हां) तर बोलीभाषा जिवंत ठेवा. त्याकरता ती शक्य तितकी लिहून ठेवा, इतके सांगत्ये आणि माझे भाषण संपवत्ये. माझं मेलीचं भाषण शांतपणांनी ऐकून घेतलंत आणि सगळ्या लेखकांचंही पुष्कळ कवतिक केलंत त्याबद्दल तुम्हा सर्व वाचक, प्रतिसादकांना पुनश्च धन्यवाद म्हणत्यें. असाच कृपालोभ असूंदेत!