नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरातील रुखवत

एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवराची पोथी बर्‍याच वर्षांपूर्वी एका मुलीच्या हातात पाहिली होती. तिला विचारले की ही पोथी तुला कशी वाटली? तर ती म्हणाली की "ही पोथी वाचल्यामुळे लवकर लग्न जमते असं म्हणतात." हे ऐकून मग मी बरीच वर्षे त्या पुस्तकाच्या वाटेला गेले नाही. मला वाटले की काहीतरी लिहिले असेल. पण एकीकडे एकनाथ असे काहीतरी अमूक केल्याने ढमूक होईल वगैरे लिहितील असे वाटत नव्हतेच. नंतर कुठेतरी त्यातल्या जेवणावळीतल्या पदार्थांबद्दल ऐकले. मग धीर करून पुस्तक आणले आणि वाचले. ती झपाटल्यासारखी वाचतच गेले.

शके १४९३ (इ.स.१५७१) रामनवमीच्या दिवशी रुक्मिणी स्वयंवर आख्यान हा ग्रंथ सिद्ध झाला. एकनाथांची रसाळ वाणी आणि प्रसंग कृष्ण रुक्मिणी विवाहाचा. त्याकाळचे सगळे वैभव तिथे उभे ठाकले होते. सुरुवातीला भीमकाचा कृष्णाला रुक्मिणी देण्याचा निर्णय नंतर रुक्मीने त्याला विरोध करणे त्यानंतर रुक्मिणीची तगमग आणि मग तिने कृष्णाला तळमळून पाठवलेली सुरेख पत्रिका. रुक्मिणीच्या पत्रिकेचा रसाळ सुरेख भावानुवाद नाथांनी केला आहे. नंतर कृष्णाने वायुवेगाने कौंडिण्यपुराला जाणे, तिथले रोमहर्षक रुक्मिणीहरण, युद्ध आणि नंतर कृष्ण रुक्मिणीचा विवाह सोहळा या सगळ्याचे अतिशय मनोज्ञ वर्णन नाथांनी केले आहे.

अनेक ठिकाणी या सगळ्याचे अध्यात्मपर विवेचनही आहे. मात्र मी आता त्याचा अर्थ लावत नाहीये, मात्र कोणाचेही त्या काळचा म्हणजे सोळाव्या शतकातला वैभवशाली विवाह सोहळा कसा असेल याचे कुतुहल मात्र रुक्मिणी स्वयंवर वाचल्यावर नक्की शमेल!

लग्नसमारंभाच्या वर्णात सुरुवातीलाच सगळे देव वर्‍हाडी म्हणून कसे गडबडीने आले त्याचे गंमतीदार वर्णन यात आहे. त्यानंतर सीमांतपूजन वगैरे. आणि त्यानंतर रुखवताचे जेवण! काय सांगू त्याचे वर्णन!

साक्षात त्रिगुणाची अडणी मांडून त्यावर ताट ठेवली आहेत आणि नऊजणी (नवविधा भक्ति) वाढत आहेत. भाज्यांचे किती प्रकार होते?

एकें पचली गोडपणें । एकें सप्रेम सलवणें । एकें नुसतीं अलवणें । बरवेपणें मिरविती ॥ ५ ॥
एके सबाह्य आंबटें । एकें अर्धकाची तुरटें । एके बहुबीजें कडवटें । एकं तिखटें तोंडाळें ॥ ६ ॥
एकें हिरवीं करकरितें । एकें परिपक्वें निश्चितें । एके जारसे कचकचित्तें । एकं स्नेहदेठिंहूनी सुटलीं ॥ ७ ॥
वाळल्या आनुतापकाचरिया । वैराग्यतळणें अरुवारिया ॥ राजसा वाढिला कोशिंबिरिया । नाना कुसरी राइतीं

खणलेल्या, खुडलेल्या, तोडलेल्या, सोललेल्या, त्रिगुणांनी परिपूर्ण भाज्या. त्याला फोडण्या घातल्या आहेत. एक भाजी गोड, एक मीठ घातलेली खारट, एक नुसतीच अळणी, एक आंबट, एक तुरट, एक कडवट, एक तिखट, एक करकरीत हिरवी (कच्ची), एक पिकलेली (पक्व), एक जरा कचकच लागणारी, एक देठासहित. अशा षड्रसांच्या भाज्या. वाळवलेल्या काचर्‍या, तळणीत हळुवार तळल्या आहेत. नाना तर्‍हेच्या कोशिंबिरी आणि रायती वाढली आहेत.

काही एवढ्या तिखट की नाकातोंडातून धूर निघेल!

एकें वाळोनि कोरडीं । तोंडीं घालिता कुडकुडी । त्यांची अनारिसी गोडी । बहु परवडी स्वादाची ॥ ११० ॥
वळवटाची नवलपरी । एकें पोपळें अभ्यंतरीं । एकें वर्तुळें साजिरीं । सुमनाकारीं पैं एक ॥ ११ ॥
परवडी दावी यादवराया । सूक्ष्म सेवेच्या शेवया । मोडों नेदि सगळिया । अतिसोज्वळिया सतारा ॥ १२ ॥
शेवया वळिल्या अतिकुसरी । असार केवळ सांडिलें दूरी । घोळिल्या क्षीरसाखरीं । चवी जेवणारीं जाणिजे ॥ १३ ॥

एक प्रकार इतका कडक की तोंडात घातला की कुडकुड करतो. त्यासोबत् अनारसे आहेत. वळवट, गव्हले (शेवयांसारखा एक प्रकार) आहेत. त्या नाना परीच्या. आतून पोकळ, गोल, फुलासारख्या आकाराच्या, शिवाय लांब बारीक शेवया आहेत. त्या न मोडता केल्या आहेत. आणि दूध साखर घालून चविष्ट बनवल्या आहेत.

अत्यंत लाडें वळिले लाडु । विवेकतिळवियाचे जोडु । सुरस रसें रसाळ गोडू । चवीनिवाडु हरि जाणे ॥ १४ ॥
पापड भाजिले वैराग्यआगीं । तेणें ते फुगले सर्वांगी । म्हणोनिया ठेविले मागिले भागीं । नखें सवेगीं पीठ होती ॥ १५ ॥
उकलतां नुकलती । आंतल्या आंत गुंडाळती । तापल्या तेलें तळिजेती । कुडी आइती कुरवडिया ॥ १६ ॥
भीमकी प्रिय व्हावी श्रीपती । सांडया न करीच शुद्धमती । जाणे वृद्धाचाररीती । परम प्रीति बोहरांची ॥ १७ ॥

अगदी लाडाने, नाजूक हाताने वळलेले तिळाचे लाडू आहेत! पापड भाजले आहेत. ते छान फुलले आहेत. तळलेल्या कुरड्या आहेत.


त्रिगुण त्रिकुटीं पचलीं पाहीं । भोकरें खारलीं ठायींच्या ठायीं । कृष्णरंगे रंगलीं पाहीं । आलें ठायीं ठेविलें ॥ १८ ॥
पुर्ण परिपूर्ण पुरिया ॥ सबाह्य गोड गुळवरिया । क्षीरसागरींच्या क्षीरधारिया । इडुरिया सुकुमारा ॥ १९ ॥
सफेद फेणिया पदरोपदरीं । शुद्ध शर्कारा भरली भरी । अमृतफळें ठेविली वरी । अभेद घारी वाढिल्या ॥ १२० ॥

खारात घातलेली भोकरें आहेत. गोल पुर्‍या आहेत, गुरोळ्या (तांदूळ, रवा आणि साखर मिसळून केलेल्या पुर्‍या) आहेत. क्षीरधारी दुधळ्या (नाचणीच्या सत्वाच्या मुलायम वड्या) आहेत. आणि नाजूक इडल्या पण आहेत! पांढर्‍या शुभ्र फेण्या आहेत. मात्र या आता आपण करतो त्या तांदुळाच्या फेण्या वाटत नाहीत, तर फेणोर्‍या हा कोंकणी पदार्थ वाटतो आहे. कारण पांढर्‍या शुभ्र, पदर सुटलेल्या आणि साखर घातलेल्या हे वर्णन त्याला व्यवस्थित लागू पडते. अमृतफळे म्हणजे एकतर मोरावळा असेल किंवा नावाने याच्या जवळ जाणारा एक पदार्थ अमृत रस्सा (चक्का, खवा, धणे, कांदा लसूण यांच्या रश्श्यात कोफ्ते सोडलेले) रुचिरामधे आहे तो असू शकेल. घार्‍या (गोड पुर्‍या) ही आहेत.

नुसधी गोडियेची घडली । तैसी खांडवी वाढिली । गगनगर्भीची काढिली । घडी मांडिली मांडियाची ॥ १२१ ॥
स्नेहदेठींहुनि सुटलीं । अत्यंत परिपाकें उतटलीं । वनिताहातींहून निष्टलीं । फळें घातिलीं शिखरिणी ॥ २२ ॥/em>

खांडवी आहे, मांडे आहेत, फळे घातलेली शिखरिणी आहे. शिखरिणी म्हणजे श्रीखंड असा उल्लेख सापडतो, पण ही शिकरण ही असू शकेल.

अत्यंत सूक्षं आणियाळें । तांदुळा वेळिलें सोज्वळें । सोहंभावाचें ओगराळें । भावबळें भरियेलें ॥ २३ ॥
खालीं न पडतां शीत । न माखतां वृत्तीचा हात । ओगराळां भरिला भात । न फुटत वाढिला ॥ २४ ॥
अन्नावरिष्ठ वरान्न । विवेकें कोंडा काढिला कांडोन । अवघ्यावरी वाढिले जण । वरी वरान्न स्वादिष्ट ॥ २५ ॥

ओगराळे भरून बारीक तांदुळाच्या भाताची मूद वाढली आहे.


लेह्य पेय चोष्य खाद्य । भक्ष्यभोज्य जी प्रसिद्ध । षड्रसांचे हे स्वाद । केले विविध उपचार ॥ २६ ॥
जिव्हा चाटून जें घेइजे । लेह्य त्या नांव म्हणिजे । घटघटोनि प्राशन कीजे । पेय बोलिजे तयासी ॥ २७ ॥
रस चोखून घेइजे । बाकस थुंकोनि सांडिजे । चोष्य त्या नाव बोलिजे । खूण जाणिजे रसाची॥ २८ ॥
अग्नि उदक लवणेंविण । जें खावया योग्य जाण। खाद्य म्हणती विचक्षण । केलें लक्षण सूपशास्त्रीं ॥ २९ ॥
क्षीरभात या नांव अन्न । भोज्य यातें म्हणती जाण । रोटी पोळी आणी पक्वान्न । भक्ष्य जाण यां नांव ॥ १३० ॥

जेवणातले षड्र्स कोणते आणि त्यांना खाण्याच्या प्रकारावरून कशी नावे दिली आहेत ते लिहून ठेवले आहे.

यानंतर कृष्णरुक्मिणी विवाह प्रसंग, रुक्मिणी कशी सौंदर्याची खाण दिसत होती, काय ल्यायली होती त्याचे सुरेख वर्णन, दागिने आणि कपडे यांचे वर्णन

नेसली क्षीरोदक पाटोळा| त्यावरी रत्नांची मेखळा||सुनीळ कांचोळी वेल्हाळा|लेईली माळा मोतिलग||

यानंतर तेलवणाचे वर्णन आहे त्यात पुन्हा तर्‍हेतर्‍हेच्या लाडूंचे वर्णन आहे.

कसलेकसले लाडू होते?

शेवया, तीळ, चारोळ्या, खसखस, कमळबीज, फणसाच्या आठ्या, बोरांच्या बियाचा आतला भाग, यांचे लाडू, कडाकण्या, कानवले असे नाना तर्‍हेचे तेलवण शुद्धमतीने आणलेले.

साक्षात अष्टसिद्धी नाचत होत्या. विडे वाटले जात होते. असा अवघा आनंदीआनंद!

मग वरात, मधुपर्क, हळद, आंबा शिंपणे, धेंडा नाचवणे अशा खूप विधींचे वर्णन करत रुक्मिणी स्वयंवराख्यान संपूर्ण होते. हे सगळे विधी नाथांच्या काळात केले जात होते हे नक्की! यातल्या रुखवताच्या जेवणावळीतले पदार्थ आणि आणि इतर वर्णन वाचून सोळाव्या शतकातल्या संपन्न लोकांच्या लग्नातील विधी आणि जेवणाच्या मुख्य पदार्थांची नीट कल्पना येते. हे पुस्तक मुळातून जरूर वाचा. अगदी सरल सोपी भाषा आहे. बर्‍याच गोष्टींचा अर्थ संदर्भाने तरी लागतो. शेवट भागवतातील मूळ संस्कृत रुक्मिणी पत्रिका इथे देते आहे. हे जगातलं पहिलं प्रेमपत्र असावं!

श्रुत्वा गुणान् भुवनसुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैः हरतोऽङ्ग तापम् ।
रूपं दृशां दृशिमतां अखिलार्थलाभं त्वय्यच्युताविशति चित्तमपत्रपम् मे ॥१॥

का त्वा मुकुन्द महतीकुलशीलरूप विद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम् ।
धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोभिरामम् ॥२॥

तन्मे भवान् खलु वृतः पतिरङ्ग जायामात्मार्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि।
मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आरात् गोमायुवन्मृगपतेः बलिमम्बुजाक्ष ॥३॥

पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्र गुर्वर्चनादिभिरलं भगवान् परेशः
आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं गृह्णातु मे न दमघोषसुतादयोन्ये ॥४॥

श्वोभाविनि त्वमजितोद्वहने विदर्भान्गुप्तस्समेत्य पृतनापतिभिः परीतः।
निर्मथ्य चैद्यमगधेन्द्रबलं प्रसह्य मां राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम् ॥५॥

अन्तः पुरान्तरचरीमनिहत्यबन्धून् त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम्।
पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात् ॥६॥

यस्याङ्घ्रिपङ्कजरजः स्नपनं महान्तो वाञ्छन्त्युमापतिरिव आत्मतमोपहत्यै।
यर्ह्यम्बुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं जह्यामसून् व्रतकृशान् शतजन्मभिः स्यात् ॥७॥

थोडक्यात भावार्थः

हे भुवनसुंदरा, जेव्हापासून मी तुझे गुण ऐकले आहेत, तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे. आणि तुला समर्पित झाले आहे. तू माझे हरण करून घेऊन जा. तुझ्यासारख्या सिंहाचा भाग शिशुपालरूपी कोल्हा नेतो आहे असे कदापि होऊ नये.

साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इत्यादि धन घेऊन मी येईन. मी सतत तुझी पूजा करून काही पुण्यकृत्ये केली आहेत, आणि मनाने तुला वरले आहे. आता प्रत्यक्षात माझा स्वीकार कर.

अंबेच्या देवळात मी गौरीपूजेसाठी जाईन, तेव्हा तू माझे मंदिरातून हरण कर. आणि पराक्रमाने शिशुपालादिकांना हरवून राक्षसविधीने माझे पाणिग्रहण कर.

तू आला नाहीस तर मी समजेन की माझ्या साधनेत काही कमतरता राहिली असेल. तू मला या जन्मी लाभला नाहीस तर मी प्राणत्याग करीन, पण जन्मोजन्मी तुझी वाट पाहीन, आणि अंती तुझीच होईन!!

----श्रीकृष्णार्पणमस्तु-----