सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं.
चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा?
माहेरचे लोक ओरडतात म्हणून गेल्या महिन्यात दवाखान्यात दाखवलं.
हीमोग्लोबिन कमी + कसल्याशा पेशी खूप जास्त म्हणालेत. गोळ्या सुरु केल्या त्याचा साईड इफेक्ट म्हणून पोटाचा त्रास. मग सलाईन लावायचं ठरलं. ते सुरु होतंच तोवर मागच्या आठवड्यात ओटीपोटात जीवघेणी कळ आली.... टेस्ट केल्या.
आज रिपोर्ट आलेत. खूप हलकं वाटतंय.
शिकणार्या मुलाची तजवीज लागली की झालं.
.
.
.
.
.
ब्लड कॅन्सर आहे. अॅड्व्हान्स्ड स्टेजचा. आटपेल लवकरच.
------------&&&&--------------
सुरुवातीचे धक्क्यांचे, निराशेचे, त्राग्याचे आणि प्रारब्धाला दोष देण्याचे दिवस सरत नव्हते.
हॉस्पिटलला गेले आणि चित्रच पालटलं.
माणसाला स्वत:चं दु:ख दुसऱ्याच्या दु:खाशी तोलून पहायची सवय असते. माझ्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती असलेले लोक पाहिले आणि वाटलं आपण एकटे नाही, एवढंच नाही तर फारच सुदैवी आहोत. नेमकं काय झालंय हे ठाऊक आहे. चांगल्या हॉस्पिटलला आलो आहे. इथल्या अनेकांना सांगितलं जात नाही कारण सांगून समजत नाही आणि डॉक्टर म्हणालेत हा वाईटातला चांगला कॅन्सर आहे. योग्य उपचारांनी नक्की बरा होतो. प्रयत्न १००℅ करूया.
मोठ्या खर्चाची सोय व्हायलाही गरीबी कामी आली. कमी उत्पन्न असल्यानं सरकारकडं आणि वेगवेगळ्या संस्थांकडं मदत मागितली. मिळाली देखील.
आता होईल सुटका. कॅन्सरपासून.