[शतशब्दकथा स्पर्धा] दोष कुणाचा?

घरात आज आनंदीआनंद होता. बर्‍याच प्रयत्नांनंतर कुलदीपकाला परदेशी जायची संधी मिळाली होती. जाण्याच्या तयारीबरोबरच रोजच्यारोज मेजवान्या झडत होत्या. नुकत्याच लग्न करून आलेल्या सूनबाईचा हा पायगुण असल्याचं काही नातेवाईक बोलत होते.

सूनबाईही सगळ्यांच्या आनंदात सहभागी होती. नुकतीच होऊ घातलेली तिच्या नोकरीतली पदोन्नती सोडून ती कायमची परदेशी जायला विनसायास तयार झाली होती. संधी काय, तिथेही मिळेल- नि सगळ्यांच्या सुखातच आपलं सुख आहे असा समंजस विचार केला होता तिनं.

पाहुण्यांसाठी सरबताचे पेले घ्यायला म्हणून ती स्वैंपाकघरात आली नि तिथलं संभाषण ऐकून जागीच खिळली.
सासूबाई कोणाशीतरी बोलत होत्या.

'बघ ना, घरात आल्याआल्या नवर्‍याला आमच्यापासून तोडलान. इथे काही कमी होतं का? आजकालच्या मुलींना महत्वांकांक्षाच फार हो.'

---------------------------------------------------------------------------------