आरपार घुसलेलं असं काही......

दहावीची सुट्टी लागलेली शाळेला. नुसतं हुंदडणं चालू होत. खरं तर मी आणि माझी एक मैत्रीणच काय त्या राहिलो होतो पुण्यात. बाकी सगळ्या गुल. कुणी गावाला, कुणी कुठे तर कुणी कुठे.

मग आम्ही दोघींनी ठरवलं, संध्याकाळ झाली की जायचंच फिरायला. मग हे लांब लांब कुठेही जायचो. ४ वाजता निघायचं आणि ७ वाजता परत यायचं. मस्तच. दररोज नवीन रस्ते घ्यायचे. शिवाय पुण्यात घरसुद्धा अशा सुरेख ठिकाणी की एकीकडून हनुमान टेकडी, (एफ. सी. ची टेकडी ), एकीकडून वेताळ टेकडी, एकीकडून चतु:श्रुंगी आणि राहिलेल्या बाजूने गावात जायला हमरस्ता. त्यामुळे फिरायला जायचं तरी कुठे हा प्रश्न कधीच पडला नाही. उंडारत असायचो दररोज. बरं मैत्रीणपण अगदी जीवाभावाची. त्यामुळे काहीही नॉन्सेन्स कितीही वेळ बोलू शकायचो. घरचे थकून जायचे ऐकून पण आमच्या गप्पा तेवढ्याच हिरीरीने चालू.

तर अशाच एका भर मी महिन्यातल्या संध्याकाळी (खरं तर दुपारी ) निघालो दोघी. छापा काटा केला आज कुठे जायचं म्हणून आणि काट्याच ऐकून निघालो वेताळ टेकडीकडे. आता सगळा रस्ता आमच्या दोघींचाच. भर दुपारी येतंय कोण मरायला टेकाडावर? आमच्यासारखं वेडं दुसरं कुणीच नाही. गप्पा हाणता हाणता पहिली टेकडी पार केली. मग तिथून डायरेक्ट चतु:श्रुंगीच्या टेकडीवरपण जाता येतं. तसं जायचं ठरलं. गेलो पुढे. भर दुपार. सगळीकडे इतका प्रखर उजेड, सगळ्या झाडांचे फराटे झालेले. सावली नामक प्रकारच नाही. नुसतं लखलखणारं सोनेरी ऊन. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत डोळे दिपून जातील इतका प्रखर प्रकाश. माहीत आहे? अशा भक्क सोनेरी प्रकाशाचंसुद्धा एक आगळं सौंदर्य असतं. वर्णन काय करणार? आपल्याकडे तेवढी प्रतिभा नसतेच कधी. नुसतं पाहायचं आणि साठवायचं मनात. जिकडे बघू तिकडे नुसतं सोनं. चमचमणारे गवताचे गुलाबी तुरे, पिवळं पडलेलं गवत, काड्या झालेली झाडं, खाली प्रचंड तापलेला काळा पहाड आणि हाश्श हुश्श करत चाललेल्या आम्ही. मग अर्ध्या तासाने दमून आम्ही एका दगडावर मारली बैठक आणि गप्पाष्टक चालू. किती वेळ गेला कोण जाणे.

जेव्हा बाजूने जाणारे एक आजोबा म्हणाले - मुलींनो, पाऊस येणारे अस वाटतंय. घरी जा बघू. आम्ही नाक उडवून हो म्हणालो आणि थांबलो तिथेच. आम्हीच हुशार ना. जरा वेळ गेला आणि अक्षरशः निमिषार्धात आभाळ काळं कुट्ट! आम्ही मोहितच झालो. अरे—आकाशाकडे पाहिलंच नाही किती वेळ. तो सोनेरी प्रकाश, तो सूर्य गेला कुठे? आकाशामधलं ते काळ्या ढगांचं इकडून तिकडे जोरात जाणं पहिल्यांदाच पाहत होतो. तेवढ्यात वादळाला सुरुवात झाली. जोरात चक्राकार वावटळी उठू लागल्या. आम्ही अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन हे सार पाहत होतो. डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून डोळे किलकिले करून. एका मिनिटात इतके जोरजोरात पावसाचे मोठ्ठाले थेंब पडायला लागले की बस. पाऊस तर आवडीचा. मग घरी कशाला जायचं? नव्हे, असलं काही आठवलंच नाही. गार्‍या गार्‍या भिंगार्‍या वगैरे लहान मुलांचे खेळ सुद्धा आम्ही दोघींनीच खेळले. तिथेच वर! कुण्णी कुण्णी नव्हतं.

तेवढ्यात विजांचा खेळ चालू झाला. भीषण आवाज, कडकडाट चालू झाला. धावत सुटलो असतो तरी अर्ध्या तासात घरात पोचलो असतो. पण सुचलंच नाही. खूप सुरेख काहीतरी समोर दिसत होतं. पण आसरा नव्हताच कुठे. विजांची जाम भीती वाटायला लागली. आई आठवली. पौर्णिमाने रडायला सुरुवात केली. आता मला घाबरायचा चान्सच नव्हता. मी सांगतेय तिला. आत्ता जाईल पाऊस. आपल्याला आवडतो ना? मग रडते काय? हे म्हणताना मी पण रडवेली. पाहता पाहता पावसाचा जोर भयाण वाढला. एका क्षणी इतका झाला की मी आणि पौर्णिमा – आम्हाला दोघींना जाणवत होत आपले हात गुंफलेले आहेत पण आपण बघूही शकत नाही आहोत एकमेकींना. इतकं तर कधीच घाबरलो नव्हतो. पाऊस कसला? सटासट चाबकाचे फटकारे बसत होते. चेहऱ्यावर इतके तडातड थेंब पडत होते की चेहरा दुखायला लागला. आडवा तिडवा पाऊस आम्हाला झोडपून काढत होता. काही दिसत नव्हतं. आता आपल्या अंगावर वीज पडली तर?????? बापरे! या पौर्णीलासुद्धा कधीही काहीही आठवत. मी किंचाळले- काही होत नाही. इतक्या पावसात वीज नाही पडत. तू काहीही बोलू नकोस गं. ती बिचारी गप बसली.

दहा मिनिटांचा खेळ. पण पार धुव्वा उडवला त्यानं आमचा. थोडा ओसरला तो. समोर पाहिलं तर काय? सगळं स्वच्छ, धुतलेलं, सुंदर. सगळी झाड त्यांच्या फांद्या आकाशाकडे उंचावून पाहत होती. ये रे अजून, बरस असाच. दे जीवन दान असं जणू म्हणत होती. दूर क्षितिजावर इंद्रधनू फुललेलं. आहा ........ भान हरपणे म्हणजे काय ते तिथे कळलं. आणि आपण किती क्षुद्र आहोत या महाशक्तीपुढे हे पण तेव्हाच कळलं. एकाच दिवशी अशी दोन सुरेख रूप त्या दिवशी अनुभवली. फक्त नतमस्तक झालो. हा शब्द माहीत नसताना.

काही न बोलता घसरणार नाही याची काळजी घेत घराकडे जायला वळलो. आता परत कंठ फुटला आम्हाला. कित्ती पाऊस होता ना गं? कसं आपण दोघीच होतो तरी घाबरलो नाही पासून खूप घाबरलो, आता घरी गेल्यावर काय होणार? आजीला, आईला भिजून घरी आलेलं चालत नाही. आता? वगैरे गहन विचारांमध्ये आलो घरापर्यंत. येतानाच ठरवून आलो की माझ्या घरी कसं वातावरण आहे ते पाहू आणि मग पौर्णीला सोडू तिच्या घरी.

आलो बुवा घराच्या अंगणात. पाहिलं तर माझी आई, पौर्णीची आई अंगणात. आता या ओरडणार या तयारीत होतो आम्ही... पाहिलं त्या दोघींकडे तर काय, दुसरा तेवढाच जोरदार पाऊस त्या दोघींच्या डोळ्यांत, तेवढाच सुंदर........
जोरात पळत जाऊन आधी आईच्या कुशीत शिरले. आणि अग आम्ही येणारच होतो तेवढ्यात खूप जोरात पाऊस सुरू झाला वगैरे सांगणार तेवढ्यात आईने तिची लाडाची टप्पल मारली, येडू, गप्प बैस आता. त्रास आहात तुम्ही मुली म्हणजे.. असं म्हणाली. आम्ही दोघींनी पाहिलं तर काय? दुसरा पाऊस सरसरत दोघींच्या गालावर उतरलेला.
अजून कळत नाही कुठला पाऊस जास्त आवडलेला?
-सविता००१