क्रांतिकारी जगपालट घडवून आणणाऱ्या व्यापारी कंपन्या
माणूस भटकी जीवनावस्था सोडून एका जागी राहू लागला, शेती करू लागला. शेतीतून मिळवलेल्या अन्नाची साठवण केल्याने रोजची पोटासाठीची वणवण थांबली. मोकळा वेळ आणि साठवलेल्या अन्नामुळे सौदा करण्यासाठी आलेली ताकद कशी वापरावी याबाबत मानवाच्या सुपीक मेंदूने विचार सुरू केला नसेल तरच नवल. किंवा तसा विचार अगोदर केला म्हणून अन्नाची शेती आणि साठवण करण्याची गरज त्याला पडली असेल. कारण प्राचीन मानवांत प्रथम शेती आणि त्यामुळे एका जागेवर वस्ती असाच क्रम दर ठिकाणी होता असे दिसत नाही. काही ठिकाणी भटकत असताना योग्य ऋतूत थांबून शेती आणि परत भटकंती असाही क्रम दिसतो. तर काही ठिकाणी एका जागेवर वस्ती आणि आजूबाजूच्या काही किलोमीटरच्या वनस्पती-प्राण्यांनी समृद्ध जागेवरून रोजचे खाणे आणणे असाही दिनक्रम असल्याचे दिसते. थोडक्यात, भटके जीवन ते भूभागाला जोडलेली स्थिर संस्कृती असा मानवाने केलेला प्रवास आहे एकाच दिशेने होता असे दिसत नाही. त्यांत अनेक फाटे आणि उलटसुलट होत गेलेली आहे. दर वेळेला असलेल्या परिस्थितीत जी जीवनपद्धती मानवाला जास्त फलदायी वाटली तिचा तो स्वीकार करत गेला.
पण एकदा शेती हे मोठे जीवनसाधन झाले वर्षाच्या केवळ काही महिन्यांच्या श्रमाने साठवलेल्या अन्नाच्या संचयाची ताकद मानव आपल्या बुद्धिचातुर्याने सर्व वर्षभर वापरून जास्तीत जास्त फायदा कसा कमावता येईल याचा विचार करू लागला. अन्नाच्या बदल्यात इतरांच्या कला, बुद्धी, श्रम आणि वस्तूंवर काही काळासाठी अथवा कायमचा हक्क मिळवता येतो हे त्याच्या ध्यानात आले. अन्नाचे वर्षानुवर्षे उत्पन्न घेण्यासाठी आपल्या सुपीक जमिनीवर आपला हक्क कायम करणे, तिचे रक्षण आणि तिच्यापासून सतत उत्तम उत्पन्न घेणे यासाठी कराव्या लागणार्या प्रत्येक कामात प्रवीण असलेल्या माणसांची गरज निर्माण झाली... किंबहुना अशी जमीन, अशी विचारप्रणाली आणि असे प्रावीण्य जिथे निर्माण झाले तेथेच मानवी संस्कृती रुजली, विकसित झाली आणि जमिनीला चिकटून स्थिर झाली. अश्या तर्हेने अजमावणी आणि चुका (trial and error) करत मानव गावे-शहरे-राज्ये-साम्राज्ये उभारू लागला.
अन्नाच्या वस्तूविनिमयाने (barter) स्थानिक व्यापाराला सुरुवात झाली असली तरी ती पद्धत फार ताणता येणार नाही... विशेषतः मोठ्या अंतरावरचा व्यापार करायचा असल्यास... हे चतुर मानवाच्या लवकरच ध्यानात आले असणार. मग त्याने अन्नाव्यतिरिक्त इतर गोष्टींत किंमत / मोल / मूल्य शोधणे सुरू केले असणार... किंवा मोलाच्या वाटणार्या वस्तू व्यापारात मोल मोजण्यासाठी वापरायला सुरुवात केली. त्या वस्तू घेऊन काही किलोमीटर पासून सुरुवात करून हळूहळू काही हजार किलोमीटर ओलांडून जायला, अगदी जगाला अर्ध/पूर्ण प्रदक्षिणा घालायला, मानवाने कामी केले नाही. प्रसंगी असंख्य चलाख्या केल्य, लढाया केल्या, नीतिमत्ता गुंडाळून ठेवली, पण आपला कार्यभाग साध्य केला.
या सगळ्या देवाणाघेवाणीच्या प्रवासाला थोडक्यात व्यापार (commerce) असे म्हणता येईल. मानवाचा बर्यापैकी माहीत असलेला इतिहास सांगतो की या व्यापारानेच मानवी जगात वेगाने बदल होत गेलेले आहेत. जसजसे मानवी जग पुढे जात आहे तसतसा त्याच्यावरचा व्यापाराचा प्रभाव अधिकाधिक प्रमाणात वाढत गेला आहे आणि तो तसाच वाढत जाणार आहे हेही तितकेच खरे.
सुरुवातीचा व्यापार एखाद्या चलाख एकांड्या शिलेदाराने सुरू केला असला तरी जसजशी त्याची व्याप्ती वाढू लागली तशी त्याचे व्यवस्थापन करण्याची गरज पडू लागली... आणि मग ते व्यवस्थापन वाढत वाढत जी संघटना निर्माण झाली तिला आपण सर्वसाधारणपणे कंपनी म्हणतो. कंपन्यांची व्याप्तीही वाढत वाढत काही कंपन्या इतक्या मोठ्या झाल्या की त्यांची उलाढाल अनेक देशांच्या वार्षिक सकल उत्पन्नापेक्षा (GDP) जास्त झालेली आहे. गेल्या काही शतकांत अश्या काही कंपन्यांचा प्रभाव केवळ त्यांच्या भागधारकांचे भवितव्य उजळण्यापुरता मर्यादित न राहता त्यांनी जगाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात प्रचंड उलथापालथ घडवून संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
गेल्या काही शतकातील अश्या काही कंपन्यांची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत...
या लेखातील सर्व चित्रे जालावरून साभार घेतलेली आहेत. येथे दिलेली कंपन्यांची चिन्हे ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे. तसेच ही सर्व माहिती जालावरून संकलित केली आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
१. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी (The British East India Company)

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह
या कंपनीने जगावर सर्वात जास्त क्रांतिकारी बदल घडवून आणले यात कोणालाच संशय नाही.
इंग्लंडच्या राणी एलिझाबेथने सनदीने लंडनच्या १२५ व्यापार्यांनी £ ७२,००० भांडवल उभारून सर टॉमस स्मिथ याच्या गव्हर्नरशीपखाली "The Company of merchants of London trading into The East Indies" स्थापन केली. या राजसनदीमध्ये (Royal Charter) कंपनीचे आणि तिच्या भागधारकांचे दायित्व (liability) मर्यादित ठेवलेले होते. अश्या तर्हेने ही जगातली पहिली मर्यादित दायित्व असलेली कंपनी (Limited Liability Corporation; LLC) स्थापन झाली.
इ स १७०० पर्यंत संपूर्ण जगाच्या व्यापारात संपूर्ण युरोपचा हिस्सा केवळ २६% होता तर भारत व चीन या दोन देशांचा मिळून ४७% होता. या कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने या दोन आशियाई देशांत शिरकाव केला. आपला पसारा वाढवत तिने पुढे भारतात ब्रिटिश राज्य स्थापनेला सुरुवात केली व चीनबरोबरचे अफूचे युद्ध जिंकून हळू हळू तेथेही वर्चस्व स्थापन केले. इ स १८७० पर्यंत भारत-चीनचा जागतिक व्यापारातला हिस्सा २९% टक्क्यांपर्यंत घसरला होता आणि युरोपचा ४२% पर्यंत वाढला होता. या आर्थिक बदलात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा सिंहाचा वाटा होता. हे करताना कंपनीला इतर युरोपियन देशांतील इस्ट इंडिया कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली होती.
इंग्लंडमध्ये आयात केलेल्या भारतीय कापडाचा इंग्लिश विणकरांच्या व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याने त्यांनी लंडनमधल्या इस्ट इंडिया हाउसवर हल्ला केला. सुरुवातीला कंपनीने भारतीय कापड तात्पुरते युरोपच्या इतर देशांकडे वळवले. परंतू भारतीय कापडाची प्रत अधिक असल्याने त्याची इंग्लंडमधील मागणी वाढतच राहिली आणि सर्व अठराव्या शतकभरापर्यंत वाढतच राहिली. त्यामुळे स्थानिक विणकरांचे आंदोलन अधिक काळ प्रभावी राहिले नाही.
सुरुवातीला ब्रिटिश सरकारकडे कंपनीचे समभाग नसल्याने त्याचे या कंपनीच्या भारतातील हालचालींवर तडक नियंत्रण नव्हते. त्यामुळे कंपनीने स्वत:ची खाजगी सेना उभारून भारतातील मोठ्या भूभागावर सत्ता स्थापन केली. १७५७ च्या प्लासीच्या लढाईत बंगालमधिल नबाब सिराज उद्दौलाचा पराभव केल्यावर या कंपनीचे भारतातील राज्य खर्या अर्थाने सुरू झाले. यानंतर कंपनीने भारतिय उपखंडात आपले पाय पसरत पसरत पूर्ण उपखंडावर प्रभाव प्रस्थापित केला.
भारतीय उपखंडातून मिळणार्या अनिर्बंध आर्थिक फायद्यामुळे कंपनीचा प्रभाव इंग्लंडमध्येही वाढला होता. या काळापर्यंत इस्ट इंडिया कंपनी व्यापारी आणि आर्थिकदृष्ट्या खूपच बलवान झाली होती. ती आपल्या वसाहती स्वतः चालवत होती आणि प्रसंगी खुद्द इंग्लिश संसदेबरोबर स्पर्धा करून आपल्या बाजूचे कायदे करवून घेत होती. (त्यापैकी चहाच्या कायद्याबद्दल थोड्या विस्ताराने याच लेखात पुढे येईल). यामुळे अर्थातच इंग्लंडमध्ये कंपनीविरोधी वातावरण तयार होत होते. त्यात कंपनीच्या कार्किर्दीतील १७७० मध्ये पडलेल्या बंगालच्या दुष्काळातील नियोजनाचा अभाव आणि असंख्य छोटेमोठे स्थानिक संघर्ष हाताळण्यात दाखवलेली अनास्था अश्या अनेक घटनांमुळे कंपनीची आणि पर्यायाने ब्रिटिश सरकारची इंग्लंडमध्ये आणि युरोपात नाचक्की होत होती. कंपनीविरुद्धचा १८५७ चा उठाव तर उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरला. या सगळ्यांचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारला भारतीय उपखंडासारखी सोन्याचे अंडे देणारी मोठी वसाहत खाजगी कंपनीच्या हाती ठेवणे धोक्याचे वाटू लागले.
त्यावर उपाय म्हणून प्रथम ब्रिटिश सरकारने एक कायदा करून कंपनीचे भारतातले राजकीय हक्क ब्रिटिश सरकारच्या आधिपत्याखाली आणले पण व्यापारी हक्क अबाधित ठेवले. त्यानंतर आलेल्या अनेक कायद्यांनी हळू हळू कंपनीचे राजकीय वर्चस्व संपूर्ण संपवले. सरतेशेवटी १८५८ च्या इंडिया अॅक्ट अन्वये ब्रिटिश सरकारने सत्ता स्वतःच्या हाती घेतली आणि भारतात "ब्रिटिश राज" सुरू झाले.
ब्रिटिश सरकारने १८७३ मध्ये "इस्ट इंडिया कंपनी खालसा कायदा (EAST INDIA COMPANY STOCK REDEMPTION ACT)" पास करून त्या अन्वये व्यवहारात आधीच खालसा झालेली ही कंपनी पूर्णपणे बंद केली आणि तिचे सैन्य ब्रिटिश भारतीय सेनेत विलीन केले. मात्र या वेळेपर्यंत कंपनीने ब्रिटिशांचे राज्य भारतीय उपखंडात स्थापन करण्याची आणि आशियात दबदबा स्थापन करण्याची कामगिरी बजावली होती... आणि आशियातील वसाहतवाद पक्का केला होता.
ब्रिटिश इंडिया साम्राज्य
कंपनीचे चहापुराण
१८२० च्या दशकापर्यंत चहा केवळ चीनमध्येच पिकविला जात असे. चिनी लोकांनी आपल्या चहाच्या एकाधिकाराचे शेकडो वर्षे मोठ्या खबरदारीने रक्षण केले होते. चहाच्या व्यापाराशी संबंधित घडामोडींचे कंपनीच्या व्यवहारांवर आणि भवितव्यावर दुरगामी परिणाम झाले. त्यापैकी तीन प्रसंग थोडक्यात पाहणे रोचक ठरावे.
कंपनीने केलेली चहाची चोरी
चहाच्या शेतीचे गुपीत कंपनीने कसे चोरले याबद्दल दोन प्रवाद आहेत. एका कहाणीप्रमाणे कंपनीने रॉबर्ट फॉर्चुन नावाच्या वनस्पतिशास्त्रज्ञाला कामावर घेतले. तो दूरवरच्या प्रांतातला चिनी नागरिक असल्याचे ढोंग घेऊन एका चिनी दुभाषाबरोबर चीनमध्ये गेला. परतताना त्याने चहाची उत्तमोत्तम २०,००० रोपे बरोबर आणली. ती वापरून दार्जिलिंगाला जगातल्या सर्वोत्तम चहा उत्पादक क्षेत्रांपैकी एक बनवले गेले. दुसर्या गोष्टीप्रमाणे कंपनीच्या इंडियन मेडिकल सर्विसमध्ये काम करणार्या डॉ कँपबेल नावाच्या सिविल सर्जनची १८३९ मध्ये नेपाळमधिल काठमांडूहून दार्जिलिंग येथे बदली झाली. तेथे त्याने चीनमधून चोरलेले बियाणे वापरून वापरून प्रायोगीक तत्वावर चहाची (Camellia Sinensis) लागवड केली आणि ती यशस्वी झाली. १८५० पर्यंत दार्जिलिंगमध्ये चहाचे व्यापारी तत्वावर उत्पन्न सुरू झाले होते. आजही दार्जिलिंगच्या चहाच्या मळ्यांमुळे भारत जागतिक स्तरावरचा एक मुख्य चहा उत्पादक देश आहे.
अफू युद्धे
युरोपातील धनिकांमध्ये चहाला खूप मागणी होती आणि ते त्यासाठी मोठी किंमत मोजायला तयार होते. चहाच्या वस्तूविनिमयाच्या व्यापारात इंग्लंडमधील चांदी कमी होऊ लागली म्हणून कंपनी भारतात पिकणार्या अफूचा उपयोग चीनमधील चहा विकत घेणास करू लागली. चिनी लोकांत पसरणार्या अफूच्या भयानक व्यसनामुळे चीनच्या सम्राटाने या प्रकारच्या व्यापाराला विरोध केला. तरीही त्यातून होणार्या मोठ्या फायद्यामुळे कंपनीने आपला अवैध धंदा चालूच ठेवला. त्यामुळे चीन व कंपनीमध्ये जी दोन युद्धे (१८३९-१८४२ आणि १८५६-१८६०) झाली ती अफूयुद्धे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याकाळात चिनी साम्राज्यात आणि राजदरबारात माजलेल्या बेदिलीमुळे या दोन्ही युद्धात कंपनीचा विजय झाला आणि झालेल्या तहांअन्वये कंपनीला सबळ शिरकाव मिळाला, चिनमध्ये अफूचा व्यापार करण्यास व चिनच्या भूमीवर वखारी स्थापन करण्याची परवानगी मिळाली.
बोस्टनची चहा पार्टी
नावात 'इस्ट इंडिया' हे शब्द असले तरी या कंपनीच्या हस्तक्षेपाचा आवाका भारतीय उपखंड अथवा आशियापुरता मर्यादित राहिला नाही.
अठराव्या शतकाच्या मध्यानंतर या कंपनीला आर्थिक संकटातून जावे लागले. ब्रिटनमधल्या गोदामात ठेवलेल्या अनेक दशलक्ष टन चहाचे काय करायचे हा यक्षप्रश्नही समोर होताच. मग या कंपनीने ब्रिटिश संसदेवर दबाव आणून १७७३ साली "चहा कायदा (Tea Act)" मंजूर करून घेतला. या कायद्यान्वये कंपनीला ब्रिटनमधील चहा अमेरिकेत "ड्यूटी फ्री निर्यात" या स्वरूपात "डंप" करण्यास परवानगी आणि त्याचबरोबर ब्रिटिश सरकारला अमेरिकेत स्थानिक कर लावण्याची मुभा कायदेशीर केली गेली. यातील राजकारण असे की, कंपनीचा चहा विनाकर अमेरिकेत गेल्याने कंपनीचा आर्थिक फायदा व्हावा आणि ब्रिटनचा अमेरिकन वसाहतींत कर जमा करण्याचा हक्क कायम राहून तेथील ब्रिटिश अधिकार अधोरेखीत व्हावा. मात्र हे अमेरिकेतल्या तेरा वसाहतींच्या पुरेपूर ध्यानात येऊन त्यांनी या कायद्याचा व त्या अन्वये होणार्या चहावितरणाचा कडाडून विरोध केला. याची परिणती प्रसिद्ध "बोस्टन टी पार्टी" आणि नंतर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध पेटण्यात झाली. अश्या तर्हेने एकाप्रकारे कंपनीने आपल्या फायद्यासाठी ब्रिटिश साम्राज्याचेही नुकसान केले.
आपल्या कारवायांनी पूर्वेकडील भारत-चीन यांच्यापासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंत आर्थिक व राजकीय कायापालट घडवून आणणारी दुसरी कंपनी आजपर्यंत झाली नाही आणि भविष्यात होईल असे वाटत नाही.
त्यामुळे या यादीतला ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला क्रमांक नक्कीच अविरोध मानला जातो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आता यानंतर अजून काही कंपन्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. त्यांच्या क्रमवारीबद्दल निवडलेल्या निकषांप्रमाणे बदल असू शकेल. पण त्यांनी जगात क्रांतिकारी बदल घडवून आणल्याबद्दल दुमत असू नये.
२. ओटिस (Otis Elevator Company)

ओटिसचे चिन्ह
इ स २००८ साली मानवी इतिहासात प्रथमच जागतिक शहरी लोकसंख्येने जागतिक ग्रामीण लोकसंख्येला मागे टाकले.
मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये एकाच जागी मोठी लोकसंख्या नांदू शकणे ही आवश्यकता आणि / किंवा निष्पत्ती होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे शहरांच्या क्षेत्रफळाचा विस्तार वाढवूनच करणे शक्य होते. कारण सर्वसाधारण मानवाची मजले चढून जाण्याची शारीरिक क्षमता पाहता सातपेक्षा जास्त मजल्यांच्या इमारती अभावानेच बांधल्या जात असत. त्यामुळे कमी क्षेत्रफळामध्ये जास्तीत जास्त माणसांना राहण्याची / काम करण्याची व्यवस्था करण्यावर अनेक मर्यादा येत असत.
एलिशा ओटिसने १८५२ साली "सुरक्षित उद्वाहकाचा (safety elevator)" शोध लावला आणि १८५३ मध्ये ओटिस इलेव्हेटर कंपनीतर्फे त्याला व्यापारी तत्त्वावर उपलब्ध करून ही कमतरता प्रभावीपणे भरून काढली. यापूर्वीही उदवाहक होते पण त्यांचे दोर तुटल्यास होणार्या जीवघेण्या अपघाताची तलवार सतत टांगलेली असल्याने त्यांच्या सर्वसाधारण उपयोगात मोठी समस्या होती. "उद्वाहकाचे दोर तुटल्यास उद्वाहक जागेवरच थांबेल" अशी प्रणाली विकसित करून ओटिसने उद्वाहनातला सर्वात मोठा अडसर दूर केला आणि गगनचुंबी इमारतींचा जमाना सुरू झाला. त्यामुळे शहरांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाला आणि शहरीकरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झाली.
जगातल्या सर्व प्रकारच्या वाहक कंपन्यांमध्ये ओटिसचा क्रमांक पहिला आहे. एका अंदाजाप्रमाणे दर तीन दिवसामध्ये जगाच्या लोकसंख्येएवढी जनता ओटिसचे उद्वाहक, सरकते जिने आणि चालते रस्ते (elevators, escalators and moving walkways) यांचा उपयोग करते. अजून एका अंदाजाप्रमाणे ओटिसचे केवळ ऊद्वाहकच सर्व जगाच्या लोकसंख्येएवढी जनता नऊ दिवसात वाहून नेतात.
अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील फार्मिंग्टन येथे मुख्यालय असलेली ही कंपनी युनायटेड टेक्नॉलॉजीज नावाच्या कंपनीने १९७६ साली विकत घेतली. मात्र तिचा व्यवसाय त्याच ओटिस या प्रसिद्ध नावाने चालू आहे. अंदाजे ६१,००० कामगार असलेल्या या कंपनीचा २००७ चा वार्षिक महसूल १२ बिलियन डॉलरच्या घरात होता.
ओटिसने केलेल्या सुरुवातीनंतर अनेक कंपन्यांनी सुरक्षित उद्वाहकाचा व्यापार सुरू केला असला तरी विसाव्या आणि एकविसाव्या शतकांतल्या बदललेल्या आधुनिक शहरांच्या प्रसिद्ध आकाशरेखा (स्कायलाईन्स) आणि शहरी जीवनपद्धती ही ओटिस महाशयांच्या शोधाचीच किमया आहे.
महत्त्वाच्या मोठ्या शहरांचे सौंदर्य, आर्थिक सामर्थ्य आणि दबदबा तेथे असलेल्या गगनचुंबी इमारतींच्या बळावरच निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षापर्यंत पूर्ण झालेल्या आणि १०० मीटरपेक्षा जास्त उंच असलेल्या इमारतींच्या संख्येप्रमाणे लावलेला जगातिल पहिल्या दहा शहरांचा क्रम खालीलप्रमाणे आहे (शहराच्या नावापुढे त्यातील इमारतींची संख्या आहे):
हाँग काँग...२,३५४
न्यू यॉर्क.....७९४
तोक्यो.......५५६
शांघाई.......४३०
दुबई........४०३
बँगकॉक......३५५
शिकागो......३४१
गाँगझू.......२९५
स्योल.......२८२
क्वाला लंपूर...२४४
ओटिस उद्वाहक जगातल्या अनेक नामवंत गगनचुंबी इमारतींमध्ये आहे. त्यातील काही महत्त्वाच्या इमारती खालीलप्रमाणे आहेत:
* आयफेल टॉवर, पॅरिस
* एंपायर स्टेट इमारत, न्यू यॉर्क
* जुन्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन्ही इमारती, न्यू यॉर्क
* टॉवर ऑफ टेरर (डिस्नेचा हॉलिवूड स्टुडिओ, डिस्ने कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर, तोक्यो डिस्ने-सी, वॉल्ट डिस्ने स्टुडिओ पार्क पॅरिस)
* पेत्रोनास जुळे मनोरे, कुआला लंपूर
* बुर्ज खलिफा, दुबई
* CN टॉवर, टोरोंटो
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
३. स्टॅंडर्ड ऑइल (Standard Oil)

स्टॅंडर्ड ऑइलचे चिन्ह
प्रसिद्ध उद्योगपती जॉन रॉकफेलर याने आपला भाऊ विल्यम रॉकफेलर आणि इतर काही समविचारी लोकांना बरोबर घेऊन १८७० साली या खनिज तेलाचा व्यापार करणार्या कंपनीची अमेरिकेतील ओहायो राज्यात स्थापना केली.
अनेक विवादास्पद डावपेच वापरून रॉकफेलरने १८७२ पर्यंत ओहायोमधील आणि त्यानंतर थोड्याच काळात
संपूर्ण उत्तरपूर्व अमेरिकेतील तेलाचा व्यापार ताब्यात घेतला. कंपनीने ऊर्ध्व-अधर एकात्मीकरण (upward and downward integration) करून तेल उत्पादन, तेल शुद्धीकरण आणि तेल वितरण या व्यापाराच्या संपूर्ण साखळीवर ताबा मिळवला. उत्पादनांच्या किमतीत भरमसाठ कपात करून कंपनीच्या स्पर्धकांचे दिवाळे काढणे अथवा त्यांना विकत घेणे अश्या प्रकारच्या अनेक अवैध कारवायांनी कंपनी जेवढ्या वेगाने ताकदवान झाली तेवढ्याच वेगाने ती विवादास्पद ठरली. तसेच स्टॅंडर्ड ऑइल कंपनीने तिच्या ताब्यातल्या कंपन्या/उपकंपन्यांचे ट्रस्ट स्थापन केले आणि तत्कालीन कायद्यात असलेल्या तृटींचा व पळवाटांचा पुरेपूर आर्थिक फायदा घेतला.
१८९० पर्यंत अमेरिकेतील ८८% शुद्धीकरण झालेल्या तेलाचा व्यापार या एकाच कंपनीच्या ताब्यात होता. तर १९०४ पर्यंत ही एकटी कंपनी अमेरिकेतले ९१% तेलाचे उत्पादन करत होती. या कंपनीच्या अमेरिकेबाहेरही उपकंपन्या होत्या, त्यांत चीन व अरबस्तानमधिल कंपन्या मुख्य होत्या.
व्यापारावर असलेल्या एवढा प्रबळ ताब्यामुळे या कंपनीचा अमेरिकन आणि जागतिक, जल व रेल्वे वाहतुकीवरही प्रचंड प्रभाव होता. कंपनीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी याचा पुरेपूर फायदा घेतला.
मात्र यामुळे ही कंपनी इतकी सामर्थ्यवान झाली की १९११ मध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने Sherman Antitrust Act अन्वये या कंपनीचे सुमारे ९० छोट्या-मोठ्या कंपन्यांत विभाजन केले गेले. स्टॅंडर्ड ऑइलच्या कारवायांमुळे दिवाळे वाजलेल्या एका कंपनीच्या मालकाच्या इडा तारबेल नावाच्या मुलीने लिहिलेल्या "The History of the Standard Oil Company" या पुस्तकाचा हा खटला सुरू होण्यास मोठी मदत झाली होती. या कंपनीचे काही तुकडेही स्वतःच्या बळावर महाकंपनी म्हणण्याच्या लायकीचे होते... उदा. एक्झॉन, मोबील, सोहिओ (अमोको), शेव्हरॉन, इ.
जेव्हा ही कंपनी फोडून तिच्या समभागधारकांना तिची मालमत्ता वाटून दिली गेली तेव्हा एकट्या जॉन रॉकफेलरच्या वाट्याला ४०० बिलियन पेक्षा जास्त अमेरिकन डॉलर (४० हजार कोटी अमेरिकन डॉलर अथवा आजच्या साधारण १ डॉ = ६० रु या विनिमयदराने २४ लाख कोटी रुपये) वाट्याला आले ! हा आजपर्यंतचा व्यक्तिगत मालामत्तेचा जागतिक विक्रम आहे. त्यापुढे आजच्या जगतातील पहिल्या तीन श्रीमंत व्यक्तींची मालमत्ता... कार्लोस स्लिम हेलू (८२.९ बिलियन), बिल गेट्स (८०.९ बिलियन) आणि वॉरन बफे (६७.३ बिलियन)... अगदी फिकी पडते !!!
अवघे ४१ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कंपनीने केवळ जागतिक तेल व्यवसायातच बदल घडवले असे नाही तर अमेरिकेच्या आणि जगाच्या अनेक देशांच्या अर्थ व कंपन्यांच्या संबंधातील कायद्यात मूलभूत बदल घडवून आणून जागतिक अर्थकारणाला आणि व्यापाराला नवीन दिशा दिली.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
४. AT&T

AT&T चे चिन्ह
अलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ साली टेलिफोनचा शोध लावला आणि संदेशवहनात क्रांती घडवली हे आपण शालेय पुस्तकांतून शिकलो. पण त्यानंतरच्या बराचश्या इतिहासाबद्दल जाणीवपूर्वक शोध घेतल्याशिवाय आपण अनभिज्ञ राहतो. आपले संशोधन व्यवहारात आणण्यासाठी बेलने "बेल टेलिफोन कंपनी" ची स्थापना केली. मात्र थोड्याच काळात तिला "अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी"ने विकत घेतले... "मूळची AT&T कंपनी आस्तित्वात आली"आली.
धातूच्या तारा वापरून केले जाणार्या संदेशवहनाने सुरुवात होऊन या शास्त्राने आता मायक्रोवेव्ह, संगणक आणि उपग्रह वापरून ध्वनी, अक्षरे आणि चित्रे जगाच्या कानाकोपर्यातच नव्हे तर अवकाश, अवकाशयान व परग्रहांवरही पाठविण्याची मजल गाठली आहे. केवळ एकशे चाळीस वर्षांच्या कालखंडात झालेल्या या शास्त्राच्या प्रगतीने मानवाच्या राहणीत, आर्थिक प्रगतीत आणि एकंदरीत जागतिक राजकारणात क्रांतीकारी बदल घडले आहेत.
मूळ AT&T इतकी प्रबळ झाली होती की विसाव्या शतकांत जर कोणी फोन लावला तर बहुदा मूळ AT&T ची सेवा वापरूनच शक्य होते. शेवटी १९८४ मध्ये अमेरिकन सकारने या कंपनीची मक्तेदारी तोडण्यासाठी तिचे विभाजन केले. त्यातली सर्वात मोठा तुकडा मा बेल (मातृ बेल) आणि इतर कंपन्या बेबी बेल्स (व्हेरिझोन, बेलसाऊथ, साऊथवेस्टर्न बेल, इ) अश्या संबोधनाने ओळखल्या गेल्या. मूळ कंपनीच इतकी प्रचंड होती की बेबी बेल्स संबोधल्या गेलेल्यांपैकी काही कंपन्याही स्वतःच्या बळावर महाकंपन्या म्हणण्याच्या लायकीच्या होत्या.
सद्या AT&T या नावाने ओळखली जाणारी कंपनी मूळ कंपनीचा "साऊथवेस्टर्न बेल कॉर्पोरेशन" नावाचा भाग होती. हा भाग वेगळा झाल्यावर १९८५ मध्ये तिचे SBC Communications Inc या नावाने परत बारसे करण्यात आले. २००५ मध्ये या बेबीने मूळ पालक AT&T Corp ला खरेदी करून आपले नाव AT&T Inc असे परत बदलले. याचबरोबर या नवीन कंपनीकडे मूळ कंपनीच्या ब्रँड नाव (AT&T), प्रतिकचिन्ह व समभाग-बाजार-उलाढाल चिन्हाचे (stock-trading symbol) सर्व हक्क आले.
या नव्या AT&T चे मे २०१४ पर्यंतचे व्यापारी स्थान खालीलप्रमाणे होते:
(अ) उलाढाल, फायदा, गुंतवणूक आणि बाजारातील किमतीच्या मानाने जगातील २९ वी;
(आ) विना-तेल उद्योगजगतातील १६ वी;
(इ) एकूण सर्व उद्योगजगतातील २० क्रमांकाची; आणि
(ई) ११ कोटी ६६ लाख भ्रमणध्वनी ग्राहक असलेली संचार कंपनी
अलेक्झांडर ग्रॅहम बेलच्या मूळ AT&T ने सुरू केलेली संचारक्रांतीने अजूनही थांबायचे नाव घेतलेले नाही. ही क्रांती लोकांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की जर संचारतंत्रज्ञानात किंवा त्याच्या सर्वसाधारण जीवनातील वापरात दर सहा महिन्यांत काही नवल वाटेल असे घडले नाही तर लोकांना चुकल्याचुकल्यासारखे वाटेल !
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
५. जनरल इलेक्ट्रिक (General Electric; GE)

जनरल इलेक्ट्रिकचे चिन्ह
आतापर्यंत आपण मुख्यतः जगाच्या बाह्यरूपावर क्रांतीकारी प्रभाव पाडणार्या कंपन्या पाहिल्या. पण या गटातली जनरल इलेक्ट्रिक (सर्वसाधारण संक्षिप्त नाव, जीई) ही अशी कंपनी आहे की जिने सर्वसाधारण माणसाच्या घरापर्यंत... किंबहुना अगदी जेवणाच्या आणि झोपण्याच्या खोल्यांपर्यंत... शिरकाव केलेला आहे. म्हणूनच असेही म्हटले जाते की "तुमच्या बहुतेक सर्व (आधुनिक) घराचा शोध जीई ने लावलेला आहे (General Electric invented most of your home)".
प्रख्यात संशोधक टॉमस एडिसनने सहकार्यांच्या मदतीने १८८९ साली "एडिसन जनरल इलेक्ट्रिक कंपनी"ची स्थापना केली. एडिसनने या कंपनीचा उपयोग त्याच्या संशोधनांवर उभारलेल्या अनेक कंपन्या एका व्यापारी कंपनीत गोळा करण्यास केला. त्यातल्या मुख्य कंपन्या खालीलप्रमाणे होत्या (कंसांत कंपनीचे प्रमूख उत्पादन दिले आहे):
* Edison Lamp Company (विजेचे बल्ब)
* Edison Machine Works (डायनॅमो आणि इलेक्ट्रिक मोटर्स)
* Bergmann & Company (इलेक्ट्रिक लायटिंग फिक्सचर्स व डिव्हायसेस)
* Edison Electric Light Company (पेटंट हक्क आणि अर्थविषयक कामे)
* स्थापनेच्या वर्षीच जीईने Sprague Electric Railway & Motor Company ही कंपनीही विकत घेऊन तिचा आपल्यात विलय केला.
तीन वर्षांनी १८९२ एडिसनने "जनरल इलेक्ट्रिक कंपनी" आणि "टॉमसन-ह्युस्टन इलेक्ट्रिक कंपनी" यांचा विलय करून आजची General Electric (जीई) तयार केली. त्याच सुमारास जीईने अमेरिकन सीमा ओलांडून कॅनडात पाय पसरायला सुरुवात केली होती.
विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात जीईने अमेरिकन जीवन आणि घर आमूलाग्र बदलून टाकले. ते करताना कंपनीने सर्वप्रथम उपयोगात आणलेल्या मुख्य वस्तू खालीलप्रमाणे होत्या:
१९०५ : Toasters and Electric Cooking Ranges
१९१७ : Hermetically Sealed Home Refrigerators
१९३० : Electric Washing Machine
१९३५ : GE lamps lit the first nighttime baseball game
१९३८ : Fluorescent Lamp
१९४२ : First American Jet Engine
१९५४ : Dish Washer
१९५७ : Nuclear Power Plant
१९५८ : Can Opener
इतक्या सातत्याने इतकी जास्त नवनवीन संशोधने (innovations) सर्वसामान्य जीवनात उपयोगी करण्यात आजवरच्या इतिहासात इतर कोणती कंपनी यशस्वी झालेली नाही.
१८९६ साली जागतिक मान्यवर समभाग निर्देशांक Dow Jones Industrial Average याच्या मूळ १२ कंपन्यांच्या यादीत जीई चे नाव सामील केले गेले आणि ते नाव खंड न पडता आजतागायत कायम आहे !
आजही जीई जगातल्या अग्रगण्य कंपन्यांतली एक म्हणून ओळखली जाते. जीईच्या असंख्य उद्योगधंद्यांपैकी काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे आहेत / होती :
* विजेवर चालणारी सार्वजनिक आणि खाजगी जीवनात लागणारी उपकरणे
* पारंपरिक वीजनिर्मिती उपकरणे
* अपारंपरिक वीजनिर्मितीची उपकरणे
* आण्विक वीजनिर्मिती उपकरणे
* रेडिओ
* विमानांची इंजिने
* संगणक तंत्रज्ञान (उपकरणे आणि प्रणाली)
* अर्थसाहाय्य
* विमा
* रिटेल क्रेडिट कार्डस
* तेल आणि वायू
* प्लास्टिक्स
* केबल टीव्ही
* उच्च स्तरीय वैद्यकीय उपकरणे (सीटी स्कॅन, इ), इ.
म्हणजे केवळ सर्वसामान्य माणसाचे घर काबीज करून ही कंपनी थांबलेली नाही तर इतर अनेक क्षेत्रातही ती दबदबा राखून आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
६. फोर्ड मोटर कंपनी (Ford Motor Company; Ford)
............
फोर्डची चिन्हे : १९०३ सालचे आणि २००३ पासून पुढे
१८९६ साली हेन्री फोर्डने त्याच्या घरामागच्या कार्यशाळेत पहिली पेट्रोलवर चालणारी गाडी बनविली. त्यावेळी तो डेट्रॉईटमधल्या Edison Illuminating Company मध्ये अभियंत्याचे काम करत होता.
हेन्री फोर्ड हे चारचाकी उद्योगधंद्यात एक मानाचे स्थान असलेले व्यक्तिमत्व आहे. फोर्डने चारचाकी व्यवसायात उतरण्याचा पहिला प्रयत्न १९०१ मध्ये Henry Ford Company च्या रूपात केला. पण दुर्दैवाने त्याला ती कंपनी एकाच वर्षात म्हणजे १९०२ मध्ये विकावी लागली. मात्र त्याने कंपनीतले स्वतःच्या नावाचे हक्क त्याने स्वतःकडेच ठेवले आणि नवीन मालकांनी विकलेल्या कंपनीचे Cadillac Motor Company असे नामकरण केले.
१९०३ साली Ford Motor Company ची स्थापना करून त्याने व्यापारी जगतात उद्योजक म्हणून परत पाऊल टाकले. ही कंपनी त्याने काही गुंतवणूकदारांच्या मदतीने २८,००० डॉलर्सच्या भांडवलावर स्थापन केली. त्यापैकी जॉन आणि होरेस डॉज नावाच्या गुंतवणूकदारांनी नंतर त्यांचे नाव असलेली स्वतंत्र कंपनी काढली.
१९०८ मध्ये "मॉडेल टी" नावाची गाडी बाजारात आणून फोर्डने त्याचे "मध्यमवर्गियांना परवडेल अशी कार बनवण्याचे" स्वप्न पुरे केले. हे मॉडेल इतके लोकप्रिय झाले की १९१८ पर्यंत अमेरिकेतील ५०% चारचाकी त्या एकाच मॉडेलच्या होत्या ! फोर्डच्या या प्रयोगापासून आजपर्यंत "सर्वसामान्य मणसाला परवडेल अशी गाडी बनविणे" हे चारचाकी उद्योगाचे एक प्राथमिक ध्येय राहिले आहे. त्याच वेळी लिंकन या ब्रँडनावाखाली फोर्ड कंपनी आलिशान गाड्याही बनवत होती.
सुरुवातीच्या काळात फोर्ड कंपनी डेट्रॉईट येथील आपल्या कारखान्यात दिवसाला काही मोजक्याच गाड्याच बनवू शकत होती. त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे कामगार दोन-तीनच्या गटाने एक गाडी बनविण्याचे काम करत असत. गाड्यांचे सुटे भाग करारबद्ध कंपन्यांकडून घेतले जात असत आणि दर मॉडेलचे भाग एकमेकापासून इतके वेगळे असत की ते इतर मॉडेलला वापरणे शक्य होत नसे. या सर्व समस्यांवर जे तोडगे फोर्डने शोधून काढले ते संघटनाक्षेत्रातले (organizational) क्रांतीकारी योगदान समजले जाते. फोर्डने अदलाबदलयोग्य भाग (interchangeable parts) वापरणे आणि जुळणी शृंखला (assembly line) ही तंत्रे सर्वप्रथम उपयोगात आणली. या तंत्रांमुळे उत्पादन खर्च कमी होतोच पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जलद उत्पादनही करता येते हे त्याने दाखवून दिले. ही उद्योगतंत्रे आणि कंपनीतच सुटे भाग बनवण्याचा निर्णय या दुहेरी युक्तीच्या बळावर फोर्डने आपल्या कंपनीचा विकास आश्चर्यकारक वेगाने केला... इतका की, १९१४ पर्यंत ही उद्योगतंत्रे "फोर्डीझम" या नावाने जगप्रसिद्ध झाली होती. फोर्डीझम गाड्या बनविण्यासाठीच नव्हे तर आतापर्यंत बहुतेक सर्व उद्योगधंद्यांनी मूलभूत आदर्श म्हणून अंगिकारला आहे.
मात्र गेली दोन दशके इतर चारचाकी उद्योगधंद्यांप्रमाणेच फोर्ड कंपनीला जरा जडच गेली आहेत. कंपनीचे अनेक निर्णय चुकीचे ठरले आहेत आणि त्यांना काही भाग / उपकंपन्या बंद कराव्या अथवा विकाव्या लागल्या आहेत. १९९९ साली विकत घेतलेली वॉल्व्हो ही स्वीडिश कंपनी २०१० साली घाट्यांत विकावी लागली. २००५ मध्ये या कंपनीच्या समभागांना बाजारात "जंक" म्हणजे रद्दी हा दर्जा दिला गेला होता ! आर्थिक आणीबाणीच्या काळात २००८ मध्ये तगून राहण्यासाठी कंपनीला अमेरिकन सरकारच्या कर्जाचा आधार घ्यावा लागला. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको व मध्यपूर्वेत १९३८ पासून आलिशान गाड्यांची विक्री करणारा मानाचा मर्क्युरी नावाचा ब्रँड २०११ साली बंद करावा लागला. या सगळ्यात भारतीय म्हणून अभिमानाची गोष्ट म्हणजे फोर्डच्या "जग्वार" आणि "लँड रोव्हर" या दोन जागतिक स्तरावर मानाच्या समजल्या जाणार्या ब्रिटिश उपकंपन्या टाटा मोटरने २००८ साली २.३ बिलियन डॉलर्सला विकत घेतल्या आणि केवळ तीनेक वर्षांच्या कालावधित परत ऊर्जितावस्थेत आणल्या आहेत.
आजही फोर्ड तिच्या व्यवसायातली अमेरिकेतली दोन क्रमांकाची आणि जगातली पाचव्या क्रमांकाची कंपनी आहे. जरी ही सार्वजनिक (public) कंपनी असली तरी फोर्ड तिचे ४० % समभाग फोर्ड कुटुंबीयांच्याच हाती आहेत.
एकंदरीत जमिनीवरच्या प्रवासाचे चारचाकी हे माध्यम मध्यमवर्गियांच्या आवाक्यात आणण्याबरोबरच फोर्ड मोटर कंपनीने इतर बर्याच उद्योगधंद्यांना काटकसरीनेही उत्तम व्यवसाय करायचे मूलभूत कानमंत्र दिले आणि जागतिक वस्तूनिर्माण (manufacturing) व्यवसायाच्या कामाच्या पद्धती आमूलाग्र बदलून टाकल्या.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
ही झाली जगात क्रांतिकारी बदल घडवून आणणार्या कंपन्यांची केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणे. विस्तारभयास्तव हा लेख इथेच थांबवणे योग्य होईल. जर वेळ मिळाला आणि वाचकांना रस वाटला तर इतर काही रंजक उदाहरणे नंतर लिहीण्याचा प्रयत्न केला जाईल.