पडघम २०१४-भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)

यापूर्वीचे लेखन

भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, मावळ, पुणे,सांगली, सातारा, शिर्डी, शिरूर आणि सोलापूर या १२ लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

अहमदनगर: २००९ मध्ये अहमदनगरमधून भाजपचे दिलीप गांधी निवडून आले.त्यावेळी आमदार राजीव राजळे यांनी बंडखोरी केली आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांची मते फोडली त्याचा फायदा दिलीप गांधींना झाला. यावेळी राजीव राजळे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर भाजपकडून दिलीप गांधी आहेत. या मतदारसंघातून आघाडीच्या मतांमध्ये फूट पडली तर भाजपला संधी मिळते अन्यथा आघाडीला हरविणे कठिण आहे.यावेळी तशी फूट आघाडीच्या मतांमध्ये पाडायला कोणी तगडा उमेदवार नाही.तेव्हा अहमदनगरमधून राष्ट्रवादी नक्की.

बारामती: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे नक्की.

हातकणंगले: या मतदारसंघात महायुतीकडून स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी तर कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते कलाप्पा आवाडे आहेत.आवाडे रिंगणात आल्यामुळे राजू शेट्टींना निवडणुक २००९ इतकी सोपी नक्कीच जाणार नाही.तरी त्यांचा पराभव होईल असे वाटत नाही. तेव्हा हातकणंगलेमधून स्वाभिमानी पक्ष.

कोल्हापूर: या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक, शिवसेनेकडून सदाशिवराव मंडलीक यांचे चिरंजीव संजय मंडलीक तर शेकापकडून संपतराव पवार उभे आहेत.या मतदारसंघात शिवसेनेची ताकद स्वबळावर निवडून यायला पुरेशी नाही.आयात केलेला उमेदवार असला तर शिवसेना चांगली टक्कर देते अन्यथा २०% च्या आसपास मते शिवसेनेला मिळतात.यावेळी सदाशिवराव मंडलीक त्यांची ताकद मुलामागे लावणार हे नक्की. २००९ मध्ये सदाशिवराव मंडलीक अपक्ष म्हणून स्वबळावर निवडून गेले होते. त्यामुळे लढत अगदी चुरशीची होईल.त्यातून मतदारसंघात शेतकऱ्यांची स्वाभिमानी पक्षाची मते शिवसेनेलाच मिळतील.राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक सुध्दा तगडेच उमेदवार आहेत.तरीही शिवसेनेची कोल्हापूर शहरातील मते, सदाशिवराव मंडलीकांची साथ आणि स्वाभिमानी पक्ष या जोरावर संजय मंडलीक निवडून आले तरी आश्चर्य वाटू नये.तेव्हा कोल्हापूरमध्ये शिवसेना.

माढा:या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, त्यांच्याविरूध्द त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील तर महायुतीकडून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत उभे आहेत.सदाभाऊ खोतांना उमेदवारी देऊन महायुतीने या मतदारसंघात थोडी तरी लढत द्यायचा प्रयत्न केला आहे.तरीही मुख्य लढत मोहिते पाटील बंधूंमध्ये होईल असे वाटते. विजयसिंह मोहिते पाटील हे नक्कीच मोठे प्रस्थ आहे.त्यांच्या पराभव करणे तसे कठिणच आहे.तेव्हा माढामधून राष्ट्रवादी.

मावळ: या मतदारसंघातून शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले राहुल नार्वेकर राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून गजानन बाबर तर शेकापकडून लक्ष्मण जगताप निवडणुक लढवत आहेत. २००९ मध्ये शेकापचे शिवसेनेला समर्थन होते त्यामुळे शिवसेनेच्या गजानन बाबर यांना विजय मिळवता आला.हा मतदारसंघ अर्धा कोकणात (उरण, पनवेल आणि कर्जत) तर अर्धा पश्चिम महाराष्ट्रात (मावळ, चिंचवड आणि पिंपरी) आहे.शेकापने सोडलेली साथ शिवसेनेला महागात पडेल हे नक्की.यावेळी शेकाप कोकणातून शिवसेनेची मते फोडणार हे नक्की.यावेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादी बाजी मारणार असे दिसते.

पुणे: या मतदारसंघातून भाजपकडून अनील शिरोळे, कॉंग्रेसचे विश्वजीत कदम, मनसेकडून दिपक पायगुडे आणि आआपकडून सुभाष वारे निवडणुक लढवत आहेत.या मतदारसंघात अनील शिरोळेंचे काम आणि जनसंपर्क दोन्ही चांगले आहेत.तसेच कलमाडींच्या कृत्यांमुळे कॉंग्रेसला रोषाचा सामना करावा लागेल हे नक्की.तसेच विश्वजीत कदम हे बाहेरचे उमेदवार आहेत.२००९ मध्ये भाजपची मते मनसेने खाल्लीच.त्याचबरोबर बसपाकडून विख्यात बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी रिंगणात होते.त्यांनीही युतीच्या समर्थकवर्गातील काही मते नक्कीच घेतली.यावेळी ते रिंगणात नाहीत.मनसेची ताकद २००९ च्या तुलनेत कमी आहे हे नक्कीच. तेव्हा या मतदारसंघातून भाजपला विजय मिळवायला जड जाऊ नये.मतदारयादीतून नावे वगळली गेली ती नक्की किती आणि कुठली हे समजल्याशिवाय या प्रकाराचा निकालावर किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही.तेव्हा पुण्यातून भाजप

सांगली: या मतदारसंघातून कॉंग्रेसकडून वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील रिंगणात आहेत.त्यांच्याविरूध्द भाजपचे संजय पाटील आहेत.तरीही सांगलीत वसंतदादांच्या पुण्याईवर त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही पराभव करणे कठिणच आहे.तेव्हा सांगलीतून कॉंग्रेस.

सातारा: या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उदयनराजेंचा पराभव करणे कठिणच आहे.तेव्हा साताऱ्यातून राष्ट्रवादी.

शिर्डी: या मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झालेले भाऊसाहेब वाकचौरे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.त्यांनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता आणि त्याचा दोष आठवलेंनी कॉंग्रेसला दिला होता. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सदाशिव लोखंडे आहेत.शिर्डीमधून यावेळी कॉंग्रेसला हरविणे कठिणच वाटते. तेव्हा शिर्डीमधून कॉंग्रेस.

शिरूर: या मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम रिंगणात आहेत.या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम आणि जनसंपर्क चांगला आहे.तसेच पुण्याचे भाग असलेल्या भोसरी आणि हडपसरमधून त्यांना ’मोदी लाटेमुळे’ नक्कीच फायदा मिळेल.जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी आणि शिरूरमधून त्यांना स्वत:च्या कामाचा नक्कीच फायदा होईल.त्यातून राष्ट्रवादीने खूप तगडा उमेदवार दिलेला नाही.त्यामुळे यावेळी शिरूरमधून आढळराव पाटील हॅट-ट्रीक करणार असे वाटते.तेव्हा शिरूरमधून शिवसेना.

सोलापूर: या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करता येणे कठिणच.तेव्हा सोलापूरमधून कॉंग्रेस.

तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात पुढील परिस्थिती असेल असे वाटते:

एकूण जागा: १२
आघाडी: ८
महायुती: ४

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी आणि नाशिक या सहा मतदारसंघांचा समावेश आहे.

नंदूरबार: या मतदारसंघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत तर भाजपकडून विजयकुमार गावितांची कन्या हिना गावीत उमेदवार आहेत.मला वाटते की माणिकराव गावीत यांचा पराभव करता येणे थोडे कठिणच आहे.तेव्हा नंदूरबारमधून कॉंग्रेस.

धुळे: धुळ्यात भाजपकडून सुभाष भामरे, कॉंग्रेसकडून अमरिष पटेल तर आआपकडून हारून अन्सारी उमेदवार आहेत.२००९ मध्ये अनील गोटे आणि निहाल अहमद यांनी चांगली मते घेतली.यावेळी निहाल अहमद रिंगणात नाहीत.मालेगावमधून आआप चांगली मते घेईल तरीही निहाल अहमद यांच्याइतकी मते घेईल असे वाटत नाही.तेव्हा धुळ्यात लढत चुरशीची होईल.पण देशातील वातावरण लक्षात घेता धुळ्यात भाजप असे वाटते.

जळगाव आणि रावेर: या मतदारसंघांमधून भाजप नक्कीच जिंकेल असे वाटते. जळगाव जिल्ह्यात भाजप बऱ्यापैकी बळकट आहे.यावेळी खूप फरक पडावा असे वाटत नाही.

दिंडोरी: या मतदारसंघातील आदिवासी भागांमधून कम्युनिस्ट पक्ष चांगली मते घेतो.त्यातून मतविभागणी होऊन भाजपला फायदा होईल असे वाटते. तेव्हा दिंडोरीमधून भाजप.

नाशिक: या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, शिवसेनेकडून हेमंत गोडसे, आआपकडून विजय पांढरे तर मनसेकडून प्रदीप पवार रिंगणात आहेत.यावेळी राष्ट्रवादीकडून भुजबळांसारखा तगडा उमेदवार आहे.तसेच मनसे मतविभागणी करायला आहेच.तेव्हा नाशिकमधून राष्ट्रवादी नक्की.

मला मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघनिहाय माहिती नाही.त्यामुळे एकूण अंदाज लिहित आहे.

मराठवाड्यात हिंगोली, नांदेड,परभणी,जालना, औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद आणि लातूर हे ८ मतदारसंघ आहेत. मला वाटते की नांदेड (अशोक चव्हाण) मधून कॉंग्रेस नक्की.बाकी ७ ठिकाणी महायुतीला जिंकायला हरकत नसावी.

विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम हे १० मतदारसंघ आहेत. यापैकी नागपूर मतदारसंघात लक्षवेधी निवडणुक आहे.भाजपकडून नितीन गडकरी, कॉंग्रेसकडून विलास मुत्तेमवार आणि आआपकडून अंजली दमानिया उमेदवार आहेत. इथून अंजली दमानिया गडकरीविरोधी मते फोडतील.या मतदारसंघातून भाजप एकदाच (१९९६) मध्ये यशस्वी झाला आहे आणि तोही बनवारीलाल पुरोहित या मुळच्या कॉंग्रेस नेत्याला उभे करून.यावेळी नितीन गडकरी रिंगणात आहेत.तसेच शहरी भागातील नरेन्द्र मोदी लाटेचा गडकरींना नक्कीच फायदा होईल.तेव्हा नागपूरमधून भाजप. भंडारा-गोंदियामधून राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांना जिंकायला हरकत नसावी.गडचिरोली-चिमूरमधूनही कॉंग्रेसला जिंकायला हरकत नसावी. चंद्रपूरमधून भाजपचे हंसराज अहिर यांना निवडून यायला हरकत नसावी. तेव्हा विदर्भातील १० पैकी ८ जागा महायुतीला तर २ जागा आघाडीला असे मानतो.

तेव्हा महाराष्ट्रात पुढीलप्रमाणे चित्र उभे राहिल असे वाटते.

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

    
 एकूण जागामहायुतीआघाडी मनसे
मुंबई+ठाणे१०६३१
कोकण२२००
पश्चिम महाराष्ट्र१२४८०
उत्तर महाराष्ट्र६४२०
मराठवाडा८७१०
विदर्भ१०८२०
एकूण४८३११६१