दिवाळीत फार फार प्रदूषण होतं.
पण वात पेटवून दोन्ही कान गच्च दाबत जीव खाऊन दूर पळणारं पोरगं.. वळून वळून पाहात राहतं..
धम्माड स्फोट होतो.. पण आपल्याला काही होत नाही.. या जाणिवेत खूप सुख असतं..
मनगटात बळाच्या मनगट्या चढतात.. पुढे कधीच न चढणार्या..
म्हणून असूदेत थोडे फटाके..!!
..
तेल तूप बेसन नेहमी महागच होत असतं.. स्वस्त नव्हे..
कितीही काहीही महाग झालं तरी फराळाचे डबे फळीवर चढतातच..
आणि गेल्यावर्षीचे दमट फटाके उन्हात वाळत पडतातच..
पण दिवाळीच्या तोंडावर महाग झालं म्हणून हेडलाईन्स तरी येतात..
अन मध्यमवर्गाचे हाल पुराव्याने शाबीत होतात.
म्हणून असू दे थोडी महागाई..!!
...
सगळा फराळ तेलातला..आरोग्याला बाधक म्हणतात..
पण शेजारच्या चकल्या हसतात तेव्हा बायाही हसतात..
विकट का होईना पण हसतात तर..
आईच्या शिकवणीचं आपलं मोहन मात्र कसं कडकडीत आणि बरोब्बर...
बाया सुखावतात..
म्हणून असू दे थोडा तळकट फराळ..!!
...
दिवाळीच्या संध्याकाळी
चाकरमानी मन सुट्ट्यांच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खंतावून तयार होतं..
"बेंदूर बेंदूर सणाचं लेंढूर".. ने सुरु झालेलं ते सगळं "दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी".. ने संपतं..
आंघोळ तर रोजच करतात लोक.. काहीतर दोनदोनदा..
पण दिवाळीच्या पहाटे पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो..
धुतल्या मनाला दिवाळीच्या दुपारी मनातल्या मनात बांधायला एक तरी किल्ला मिळतो..
म्हणून पुढच्या दिवाळीच्या ओढीसाठी..
असू दे थोडा सुट्ट्यांचा दुष्काळ..!!
- गवि