तर मंडळी झाल काय की सहज फिरायला म्हणुन २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात आलो होतो. आता सहकुटुंब अस बाहेर फिरणं काही सोप्प नसत हो. त्यात मुलबाळं बरोबर. मग अस फिरताना बरोबर थोडी फळ ठेवणं साहजिकच आहे नाहे का? तर ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टला मी अशीच एका सुपर मार्केट मध्ये शिरले. कुठं काय, कुठं काय, घेत घेत, आपल नेहमीचं, "गरिबांच फळ" केळी उचलली. आता केळी घेताना आपण ती कायमच घडाने घेतो ना? निदान डझनावर तरी! तशीच आपली उचलली अन चालले कॅश काउंटरकडे . तिथल्या एका हेल्परने मला मध्येच हटकलं अन विचारल, " हे! बाइंग सो मेनी बनानाज? हॅव यु चेक्ड द प्राइस?" च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या. भारतिय दिसले म्हणुन काय अगदी केळी खरेदी करायचीपण लायकी नाही की काय? ऑ?
गेले तशीच ठुमकत कॅश काऊटरवर. तर कॅशियरला एऽऽव्हढी केळी बघुन घाम फुटला राव! म्हणतो, " डिअर, दिज बनानाज आर ट्वेल्व्ह डॉलर्स किलो! आर यु शुअर यु स्टिल वाँट टु बाय ?"
आता माझी अवस्था त्या गोष्टीतल्या गरिब ब्राम्हणासारखी झाली. एका ठगाने विचारलं," हे वासरु कुठे घेउन निघालाय?" दुसरा हटकतो, " कुत्रं का खांद्यावर घेतलय?" म्हंटल नक्की भानगड काय?
तर कळलं की ऑस्ट्रेलियाची सुपिक भुमी, म्हणजे ऑस्सी कोकण, पूरग्रस्त झाल्याने तिथेली सारी शेतं वाहुन गेली. अन केळ्याच्या बागा उध्वस्त झाल्याने, केळ्यांचे भाव आभाळाल भिडले आहेत.
म्हणजे हे गरिबांच फळ अगदी श्रीमंतांचेही डोळे पांढरे करायला निघालं होतं. " कालाय तस्मै नमः।"
सहजच मनात आलं, आपल्याकडे नव्या नवरी बरोबर शिदोरी म्हणुन बर्याचदा केळी पाठवली जातात. निदान गावाकडे तरी. बरं झाल पाश्च्यात्त देशात ही "शिदोरीची" भानगड नाही. नाहीतर काय द्यायच दरवेळी मुलगी निघाली तर; नाही का?
आता ही शेती पुन्हा भरभराटीला यायला जवळ जवळ दोन वर्षे गेली. अन तोवर आम्ही आमच बिर्हाड ऑस्ट्रेलियाला हलवलं होतं. मग नेहमी "केऽऽळी !" असं जरा कमी महत्त्व देउन उच्चारायचं फळ आता " कितीला आहे नेमकं?" असा भाव तपासून घेणे अंगवळणी पडलं.
त्यातूनच सुरु झाली, एव्हढं महागामोलाचं फळ टाकुन न देण्याची कसरत. केळ्यांच काय असतं, तर ती पिकली की काळी पडतात, अन साधारण मऊ होतात. असा काळपटपणा दिसला रे दिसला की बच्चे कंपणी नाक मुरडुन ती खायला तयार होत नाहीत. मग त्याचा शिरा करुन झाला. अहो पण एकावेळी चार माणसांच्या शिर्यात तुम्ही जास्तीत जास्त एक केळं मिसळु शकता! रव्यात केळ मिसळायच असत म्हंटल, केळ्यात रवा नाही. अशीच एकदा; साधारण काळी पडलेली केळी उचलुन टाकायला निघाले, पण माझ्यातली गृहीणी, अन कृषक कन्या, ( प्रत्येक भाताचा कण, शिजायला १५ मिनिटं लागत असतील पण तो शेतात चार महिने उभा असतो अस मी अगदी ठासुन सांगत असते मुलांना) काही; ती केळी तशी टाकायला तयार होइना. मग लढवल डोकं, अन केल्या त्याच्या पूर्या.
अगदी सोप्प्या! अजिबात गोड होत नाहीत, खुसखुशीत, अन चहाची लज्जत वाढवणार्या.
तर घ्या मंडळी घरातलेच चार जिन्नस घेउन करा पिकल्या केळ्यांच्या पूर्या!
चला साहित्य घ्या.
किती केळी आहेत काळपटलेली?
एका केळाला साधारण एक कप गव्हाचे पिठ म्हणजे कोरडी कणिक. मी दोन केळ्यांचे प्रमाण वापरलं आहे.
तर साहित्यः-
२ पिकुन काळपटलेली केळी
२ वाट्या कणिक.
१ टेबलस्पून घरच तूप.
१ टीस्पून मिठ.
तळायला तेल.

केळी हाताने कुस्करुन त्यात तूप अन मिठ मिसळुन घ्या.

आता त्यात मावेल तेव्हढी कणिक घाला. वरुन अजिबात पाणी घालायचं नाही. छानसा गोळा तयार करुन घ्या.

मी साधारण चहा करताना या पूर्या तळते, तोंवर हे तयार केलेलं पिठ फ्रिज मध्ये अगदी दोन तिन दिवस छान रहात.
आता एक चपातीच्या आकाराची पात लाटा अन वाटीने पूर्या कातून घ्या.

तळा.
हां हां हां! इथे जरा जपून हं. कारण हे पिठ इतकं हलक असत की पूर्या लगेच तांबूस होउन जळायची शक्यता असते, म्हणुन जरा लक्ष देउन ! बाकि काही नाही.

चला! या खायला!

__/\__
अपर्णा.