गाव: विजयदुर्ग
ग्रामपंचायत: विजयदुर्ग
जवळचे पर्यटन स्थळ: गिर्ये गाव, पवन चक्की, देवगड शहर, रामेश्वराचे देऊळ
देवगड व्हाया कात्रादेवी रस्त्यामार्गे अन्तर सुमारे ३८७ कि.मी. (पनवेल ते विजयदुर्ग)
जवळचे बस स्थानक: विजयदुर्ग
जवळचे रेल्वे स्टेशन: कणकवली
महाद्वारातील तोफ
विजयदुर्ग किल्ला
हा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोज याने सन ११९५ ते १२०० या कालावधीत बांधला. त्यावेळी हा किल्ला “घेरीया” नावाने ओळखला जात होता. कालांतराने हा किल्ला यादवांनी ताब्यात घेतला नंतर तो विजयनगरच्या राजाच्या ताब्यात गेला. १४३१ साली बहमनि सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाह याने तो ताब्यात घेतला. सन १४९० ते १५२६ या काळात बहमनी राज्याचे पाच तुकडे झाल्याने हा किल्ला विजापुरकरांकडे आला, तो १२५ वर्षे त्यांच्या अमलाखाली होता. सन १६५३ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या.
हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेला तसेच गोव्याच्या उत्तरेला असून किल्याच्या बाजूने ४० किमी लांबीची विजयदुर्ग नावाची खाडी आहे. हे एक उत्कृष्ठ बंदर आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई ते विजयदुर्ग असा जल प्रवास करणारी जहाजे प्रवाशांसाठी उपलब्ध होती, कारण त्याकाळी बस तसेच रेल्वे सुरु झालेली नव्हती. किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर एवढी आहे.
समुद्राकडील तटबंदिबाहेर उभी असलेली मच्छिमारी नौका
तटबंदितील बुरुज
समुद्राच्या बाजूची तटबंदी
शिवाजी महराजांनी ३ उंच तटबंद्या, टेहळणी बुरुज तसेच सुटसुटीत अश्या अंतर्गत इमारती बांधून किल्ल्याचे मजबुतीकरण केले. किल्याच्या प्रवेशद्वारात मारुती मंदिर, अंतर्भागात महादेव मंदिर असून भवानी मातेच्या मंदिराचे अवशेषही दृष्टीस पडतात.किल्याला एकूण २० बुरुज असून मध्यभागी घोड्यांच्या पागा आहेत.
किल्ल्याचे रेखाचीत्र (ट्रेकक्षितीज वरून साभार)

पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबत खाना, साहेबाचे ओटे तसेच दोन भुयारी मार्ग अशी पाह्ण्यासारखी ठिकाणे आहेत. पाण्याखाली बांधलेली भिंत ही ह्या किल्याची खासियत असून ही भिंत शत्रूच्या मोठ्या जहाजांपासून किल्याची राखण करत होती.
किल्यातील भुयार किवा धान्य साठवणीची जागा
किल्यावरुन दिसणारा माडबन गावचा समुद्रकिनारा
इंग्रज, पोतुगीज, डच ह्यांच्यासारख्या परकीयांनी जिब्राल्टर असा ह्या किल्ल्याचा उल्लेख केला होता. मराठ्यांच्या काळात कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.
किल्याचे विहंगम दृश्य
सध्या ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी छोटस बंदर तसेच S.T. महामंडळाचा डेपो आहे. किल्ल्यापासून जवळच ६-७ किमी च्या अंतरात श्रीदेव रामेश्वराचे जमीन पोखरून तयार झालेल्या जागेत बांधलेले भव्य मंदिर आहे. देवी चौडेश्वरी मंदिर देखील ह्याच परिसरात आहे, ह्या मंदिराचे हल्लीच नुतनीकरण करण्यात आले आहे. जवळच गिर्ये गावात स्थित असलेल्या पवनचक्क्या देखील पाहण्यासारखे ठिकाण आहे.
किल्यामागील विजयदुर्ग गावचा समुद्रकिनारा
पांगेरे गावातून निघणारा समुद्र मार्ग
समुद्र रस्ता

रत्नसिंधू प्रकल्पांतर्गत बांधलेल्या पुलामुळे रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आता अर्ध्या तासाच्या अंतरावर आले आहेत. ह्या किल्यावर राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावाजवळील पंगेरे गावातील जेटीवरून होडीनेदेखील जाता येते, तेवढीच समुद्र सफर.
काय मग जाताय का विजयदुर्ग भ्रमंतीला?
(नोंद: हा माझा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने काही तृटी राहिल्या असतील, तेव्हा जाणकारांनी आवश्यक ते मार्गदर्शन करावे हि विनंती)