'लेह' वारी, भाग १

Test

आयुष्यभर आठवणीत राहील असा अमोल ठेवा (६५०० km, १९ दिवस) शब्दात बांधण्याचा प्रयत्न करतोय.
हा तर... !!! गेल्या वर्षी मी आणि तुषार भीमाशंकरला गेलो होतो. दिवसभर झालेल्या गप्पांमध्ये दोन विषय लक्षात ठेवण्यासारखे झाले. १: बुलेट घ्यायची आणि २. लेह ला जायचं. पुढे मग साधारण महिना दोन महिने गेले असतील आणि तुषारचा फोन आला.

तुषार: समीर !!! मी पाडव्याला बुलेट बुक केली.
मी: काय SSS सहीच.. एकदम...!!! थांब मी पण बुक करून टाकतो. आयला परवा परवा पर्यंत माझ्या समोर पल्सर २२० ची महती गाणारा प्राणी अचानक बुलेट बुक करून आलास पण. भारीच !!! करणारच शेवटी आपली चॉईस हाय ;)

पुढे अश्याच शिळोप्याच्या (आईचा ठेवणीतला हा शब्द) गप्पा झाल्या आणि दोन दिवसांनी मी पण जाऊन बुलेट बुक केली. ट्रीपमध्ये चर्चा झालेला एक विषय हातावेगळा झाला होता. बुलेट १० महिन्यांनी मिळणार होती. आता वेध लागले होते दुसऱ्या विषयाचे. "Mission लेह" चे. त्यानंतर वर्षभर जेव्हा जेव्हा भेटलो, बोललो तेव्हा तेव्हा, किमान एकदा तरी लेह वारीची चर्चा व्हायची. पहिले ७-८ महिने काही वाटलं नाही पण जेव्हा गाडी कधी मिळणार याची चौकशी सुरु केली तेव्हा गाडी मिळायला एक दोन महिने जास्त वेळ लागणार म्हणून डीलर कुणकुण करू लागला आणि आम्ही "आम्हाला गाडी लवकर द्या !!! लेह ला जायचय" म्हणून भूनभून करायला लागलो. अखेर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुहूर्त लागला आणि दोघांनाही एकाच दिवशी गाड्या ताब्यात मिळाल्या. लेहला यंदा १००% जायचं अस ठरवलं असल्यामुळे गाड्या पळवायला सुरुवात केली. कारण २-३ सर्विसिंग (निदान ३००० - ४००० km तरी ) शिवाय गाडी घेऊन जाता येणार नव्हते. ४-५ लांब ट्रीपा मारल्या आणि तो कोटा भरून काढला.
Map
मधल्या काळात कुठून जायचं, कसं जायचं आणि काय काय समान न्यायचं/घ्यायचं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधून काढली. काही अनुभवाचे आणि काही फुकट असे भरपूर सल्ले मिळाले. सारं काही ऐकून (पटेल ते घेऊन) अखेर १८ ऑगस्टला निघायचं ठरवलं. १७ ऑगस्ट उजाडला. तुषारला फोन केला, घेऊन जाण्याचं सगळं समान गोळा झाल्याची खात्री केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.०० ला निघायचं ठरलं. ट्रेकिंगसॅग मध्ये सगळं काही भरून ठेवलं आणि झोपलो. पहाटे ४.०० ला उठून अर्ध्या तासात आवरलं आणि सॅग गाडीला बांधायला खाली आलो. सगळे प्रयत्न करून सुद्धा, ती मोठी पिशवी गाडीला नीट बांधता येईना. १० - १५ मिनिटे आणखी प्रयत्न केला पण काही जमेना मग सरळ ट्रेकिंगसॅग न्यायचं रद्द केलं. परत वर गेलो आणि ट्रेकिंग सॅग रिकामी करून सॅडल बॅग (फोटो मध्ये दिसेलच) मध्ये सगळं समान भरलं.
Bike
पंक्चर काढण्याचं कीट, गाडीचे आणखी काही लागणारे पार्ट, कपडे आणि बाकी किरकोळ भरपूर गोष्टी मिळून अंदाजे ३० किलो वजन भरेल एवढं समान होतं आणि ते परत व्यवस्थित लावायचं होतं. या सगळ्या प्रकारात अर्धा पाउण तास गेला आणि तुषारला उशीर होतोय म्हणून फोन करायचा राहिला. इकडे हा बाबाजी ५.३० लाच निगडी नाक्यावर येऊन उभा राहिला होता आणि दर ५ मिनिटांनी फोन करत सुटला होता. मी इकडे पळापळ करून (३० किलो घेऊन) घामाघूम झालो होतो आणि मध्ये मध्ये याचे फोन. कसंबस गाशा गुंडाळला आणि ६.०० ला घरून निघालो. १८ ऑगस्ट उजाडण्या आधीच निघण्याचा बेत फसला होता. ढगाळ वातावरण होतं पण पाऊस पडत नव्हता म्हणून मग आणखी उशीर न करता रेन कोट नुसताच बरोबर घेतला. पण नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. घर सोडून १-२ km झाले असतील आणि तो (पाऊस) आला. मग न थांबता तसाच भिजत निगडी नाका गाठण्याचा ठरवलं आणि १५ मिनिटात तिथे पोहोचलो. आमच्यावर मुक्त तोंडाने फुले उधळण्यासाठी, साहेब आमची वाट बघत उभे होतेच. गुमान सगळं ऐकत मी अख्खा रेनकोट चढवला पण त्या शहाण्याने बडबडीच्या नादात नुसतेच जर्किन घातले. मी आपला हो हो म्हणत निघू म्हणालो आणि आवरत घेतलं. देशाच्या उत्तर टोकाचा प्रवास सुरु झाला होता.
देहूरोड येई पर्यंत पावसाचा जोर वाढला आणि आम्ही थांबलो. श्रीमंत गाडी थांबवून उतरले, गाडी साइडस्टॅंडला लावली आणि रेनकोट घालू लागले. कशी कुणास ठाऊक पण आम्ही गप्पा मारत असतानाच त्याची गाडी साइडस्टॅंडच्या विरुद्ध दिशेला कलंडली आणि पडली. मी मागेच उभा होतो पण, आधीच वजनदार (मी नव्हे, गाडी) आणि त्यात आणखी ३० किलो वजन जास्त असलेलं ते धूड मागे उभा राहून सांभाळणे केवळ अशक्य होतं. तरी लगेच पुढे झालो आणि जमिनीला आलिंगन दिलेली गाडी झटक्यात उचलली. "माझ्यात एवढं बळ कुठून आलं ?" माझं मलाच आश्चर्य वाटलं. गाडी पडली आणि त्याची पुढच्या ब्रेकची लिवर अर्धी तुटली. ती वाकून वजन न पेलवल्यामुळे तुटताना मी अगदी हतबल होऊन पहिली होती. प्रवासामध्ये अडथळ्यांची परीक्षा सुरु झालीच होती त्यात आणखी भर पडली. थोडसं वाईट वाटलं पण काय करणार, अर्धी तुटकी ती कांडी टाकली बॅग मध्ये आणि निघालो पुढे. लोणावळ्यात थोडावेळ थांबलो, पाऊस पण थांबला होता,सगळीकडे कसं हिरवागार टवटवीत होतं. गाड्या पुन्हा एकदा चेक केल्या आणि निघालो.
Bike2
घोडबंदर मार्गे अहमदाबाद हायवे पकडायचा आणि मग तो धरून, थेट उत्तरे कडे प्रयाण करायचे असं ठरवलं होतं. मुंब्र्या पर्यंत न चुकता आलो, टोल नाका पार करून हायवेला लागलो. आधी एकदा घोडबंदर मार्गे विरारला गेल्यामुळे, एक २-३ km पुढे गेल्यावर आपण रस्ता चुकलो आहोत कि काय असं वाटायला लागलं. "तो मी नव्हेच" असं तो (रस्ता) ओरडून ओरडून सांगत होता आणि तेच बरोबर होतं. तुषारला रस्ता चुकलोय असं खुणेने सांगितलं आणि एक ठिकाणी चौकशी केली तर कळलं आम्ही आग्रा हायवेवर आहोत. झालं कल्याण... असो..थोडी विचारपूस केल्यावर पुढून भिवंडी मार्गे रस्ता आहे हे कळलं, पण भिवंडीच्या गर्दीतून आणि खराब रस्त्यावरून जाण्यात वेळ जाणार होता म्हणून मग हो-नाही करता करता मागे वळायच ठरलं. परत ठाण्यात येऊन घोडबंदर रोडला लागलो. आता रस्ता ओळखीचा वाटू लागला. लोणावळ्याहून निघाल्यावर कुठेही थांबलो नव्हतो. पोटात कावळे ओरडण्याबरोबर नाचायलाही लागले होते आणि वर ढग गडगडायला लागले होते. सगळीकडे अंधारून आलं होत. सकाळचे ९.३० वाजलेले असून सुद्धा संध्याकाळी ७.०० चं वातावरण होतं. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मग एक हॉटेल बघून थांबलो. रेनकोट वगैरे काढून ठेवताना नजर हॉटेलचा अंदाज घेत होती (साफ सफाई स्वच्छता वगैरे वगैरे). हॉटेलचा मालक अस्सल मुस्लीम पेहराव, डोक्यावर टोपी इत्यादी गोष्टी घातलेला. म्हंटल मुस्लीम असला म्हणून काय झालं, हॉटेल तसं बर दिसतंय. नित्यनियमा प्रमाणे काय काय मेनू मध्ये आहे, ते (पाठ झालेलं) त्याने सांगितलं. ऑर्डर गेली "एक कांदा उत्तपा आणि इडली सांबर". लगेच ती ५ मिनिटात आली सुद्धा पण घोर निराशेला बरोबर घेऊनच, अगदीच बकवास चव. बाहेर पाऊस धो-धो सुरु झाला होता आणि मी काहीतरी चांगलं खायचं सोडून बेचव उत्तपा खात होतो. तुषार पण वाकडतिकडं तोंड करून समोर आहे ते गप गिळत होता. माझा उत्तपा थोडा खाऊन झाल्यावर या महाराजांनी सांगितलं, "दोनीही गोष्टींना मटणाचा वास येतोय". त्यातल्यात्यात तुषारला तर जास्तच. त्यात हा प्राणी सगळे प्राणी खातो तरीही त्याला वास सहन होत नव्हता. का कुणास ठाऊक पण मला तसला कसलाही वास आला नाही. तसच अर्ध पोटी खाणं टाकलं, चहा प्यायला आणि रेनकोट घालून भर पावसात तिथून निघालो. १०.०० वाजले तरीही मुंबापुरी अजून फार काही लांब गेली नव्हती. आजचा पहिला मुक्काम होता घरापासून ८५० km लांब उदयपूरला, म्हणून मग सुसाट गाडी हाकायला सुरुवात केली. रस्ता एकदम चकाचक, ८०-९०-१०० km तशी वेगाने दोन बुलेट पळत होत्या. पाऊस धो-धो कोसळत होता, समोरचं १०० - २०० फुटाच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं, इतका तो जोरदार कोसळत होता. तो थांबायचं नाव घेत नव्हता आणि आम्ही थांबायचा काही प्रश्नच नव्हता. चकाचक रस्ता असला तरी उतार चढ असल्या मुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. अंगावर उडणाऱ्या पाण्याची फिकीर न करता भरधाव त्यातून आम्ही निघून जात होतो. एका पाटोपाठ एक ट्रक मागे टाकत आणि मधूनच एखाद-दोन चारचाकी सप्पकन आम्हाला मागे टाकून पुढे जात होत्या. अगदी महाराष्ट्राच्या सिमे पर्यंत हाच खेळ चालू होता. महाराष्ट्र सिमे जवळचा टोल नाका येई पर्यंत दुचाकी अगदी बोटावर मोजण्या इतक्याच (आमच्या दोन सोडून) दिसल्या. टोल नाक्याला पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता, मग तिथेच एक रिकाम्या लेन मध्ये गाड्यांना आणि स्वतःला विश्रांती देण्यासाठी थांबलो.
Stop
चांगली १५-२० मिनिटे आराम केल्यावर पुढचा प्रवास चालू केला. आमचा नाष्टा झाला होता पण गाडीचं काय? सकाळी निघाल्या पासून ३०० km झाले असतील तरी ती अजून उपाशीच होती, म्हणून मग थोडं पुढे गेल्यावर एक पंप दिसला आणि आत वळलो. पंप मस्त धुवून काढून, हार फुलांनी सजवलेला होता. पूजा अर्चा झालेली होती. पंपाकडे जाताना, दोन विचित्र माणसं, दोन काळ्या बुलेट, ते सुद्धा MH-14 पासिंगच्या, इकडे कुठे आल्या म्हणून लोकं कुतुहुलाने आमच्या कडे बघत होती. आम्ही आपलं गेलो आणि दोनीही टाक्या फुल करून घेतल्या. इतक्यात पंपाचा मालक बाहेर आला. कुठून आलात, कुठे चाललात वगैरे चौकशी केली. त्याला त्याच्या प्रश्नांची आश्चर्यकारक उत्तरं मिळाल्यावर गड्याने आमचे नाव पत्ते वगैरे लिहून घेतले. पंपाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून ही सजावट, पूजा वगैरे आहे असं त्याच्या कडून कळलं आणि सोबत सामोसे चहाचा नाष्टा पण मिळाला. सामोसे म्हणजे माझा जीव कि प्राण... अहाहा... !!! क्या बात... !!! पावसात भिजून आल्यावर गरम गरम सामोसे आणि चहा... वा... वा... एकदम मस्तच ! चांगले दोन तीन सामोसे हाणले. आणखी घेणार होतो पण "ऊस मुळा सकट खाऊन नये" हा वाक्प्रचार आठवला आणि स्वतःला आवरलं. सकाळच्या बेचव नाष्ट्याची उणीव याने भरून काढली. खाऊन पिऊन झाल्यावर निघायच्या वेळेला गोधरा मार्गे उदयपूरला जाण्याचा सल्ला मालकाने दिला. गाडीचं जेवण आणि आमचा नाष्टा दोनीही झालं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. गाडीचा वेग ताशी ९० -१०० km ठेवला होता. त्याच्या वर गेला तर बुलेट इतका थरथराट करते कि हातासकट अख्या शरीराला मुंग्या यायला लागतात. ९० ने सुटणे म्हणजे काय याचा शब्दशः अनुभव घेत दुपारी २.३० - ३.०० पर्यंत गाडी दामटत होतो. पोटात पुन्हा कावळे डिस्को करायला लागले म्हणून थांबलो. जेवलो ( तेवढीच गाडीला पण विश्रांती) आणि पुन्हा निघालो. संध्याकाळचे ६.०० वाजत आले तेव्हा बडोद्याची वेस दिसायला लागली. गोधरा मार्गे जायचं असल्यामुळे बडोद्याच्या बायपास वर अहमदाबाद रोड सोडला आणि एका गंभीर घटने मुळे उजेडात आलेल्या गावाचा (गोधाराचा) रस्ता धरला. उन्हं उतरायला लागली होती आणि उदयपूर अजून चिक्कार लांब होतं. घरातून निघताना, "रात्री गाडी न चालवण्याची सक्त ताकीद दिली गेली होती (दोघांनाही)". स्वतःच्या आणि गाडीच्या तब्यतीसाठी ती अमलात आणायची ठरवलं होतं. ज्या गावाबद्दल नुसत्या बातम्याच वाचल्या, ते कसं असेल, तिथली लोकं कशी असतील आणि आपण तिथेच रहायचं का? याचा हिशोब मनात सुरु झाला. पण आम्हाला गोधरा सुद्धा गाठता आलं नाही. अंधाराचं साम्राज्य पसरलं, तेव्हा आम्ही गोधरा पासून ५३ km अलीकडे "हलोल" मध्ये होतो. मग तिथेच पहिला मुक्काम पडला. सकाळी निघायला झालेला एक दीड तास उशीर, आग्रा रोडची गडबड आणि त्या धुडाला (बुलेटला) घेऊन १०० km ताशी वेग मर्यादा ओलांडता न येणे या मुळे ठरलेल्या योजनेचा (उदयपूरला पोहोचण्याचा) बट्याबोळ झाला होता. असो...त्या छोट्याश्या गावामध्ये एक छोटेखानी हॉटेल शोधलं, खोल्या चांगल्या असल्याची खातरजमा केली आणि तिथेच थांबण्याचा निश्चय केला. लगेच घरी फोन फोनी करून सगळा रेपोर्ट दिला आणि रिकामा झालो. मस्त फ्रेश झालो आणि जेवलो. हॉटेल लहान होतं पण जेवण मात्र अप्रतिम होतं. साधीच ऑर्डर दिली. दाल फ्राय, जीरा राइस, रोटी, पनीर टिक्का, मटर पालक. त्यात जोडीला ताक. अक्षरशः पोट भरून एक एक पदार्थ हाणला आणि तृप्त झालो. पहिला मुक्काम चुकलाच होता, त्यामुळे पुढचे मुक्काम बदलेले. मग पुढच्या दोन तीन दिवसाचा प्रवास आराखडा बांधला, कुठे थांबायचं, काय करायचं (साहेबाच्या भाषेत प्लान A, प्लान B वगैरे वगैरे) ठरवलं आणि सकाळी लवकर निघायचं ठरवून झोपलो. जवळपास ६०० km गाडी चालवून प्रवासाचा पहिला दिवस संपला होता.

क्रमशः