साहित्य: तांदूळ १ कप, उभा जाडसर चिरलेला कांदा अडीच कप , हरभरा डाळ १ टेबलस्पून , मोहरी अर्धा टीस्पून, मेथ्या एक अष्टमांश टीस्पून, हिंग एक अष्टमांश टीस्पून, हळद पाव टीस्पून, कढीलिंबाची एक काडी, धणेपूड एक टीस्पून,
जिरेपूड अर्धा टीस्पून, काळीमिरीपूड पाऊण टीस्पून, लिंबूरस १ टेबलस्पून, तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी, थोडे तूप, कोथिंबीर व खोबरे, मीठ.
कृती: तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. कांदा जाडसर चिरावा. फोडणीचे साहित्य तयार असावे. पाणी तापण्यास ठेवावे. पातेल्यात नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलाची मोहरी, हिंग, हळद, मेथ्या घालून फोडणी करावी. कढीलिंब व हरभरा डाळ घालून थोडे परतावे. त्यात चिरलेला कांदा घालावा व परतावे. त्यास एक वाफ आणून धुतलेले तांदूळ घालावेत व हलक्या हाताने परतावेत. तांदळाचा रंग किंचित बदलला की आधणाच्या पाण्यापैकी निम्मे पाणी त्यात घालावे. नंतर धणे, जिरे व मिरेपूड, मीठ घालावे. पाणी आटत आल्यानंतर उरलेल्यापैकी निम्मे पाणी घालावे व झाकून शिजू द्यावे. मधेच एक दोनदा हलवावे. त्यावेळी लिंबूरस घालावा. लागल्यास आणखी पाणी घालून मंद आचेवर भात अगदी मऊ व मोकळा शिजायला हवा. किंचित पाणी त्यात असतानाच साजुक तूप कडेने सोडून झाकून ठेवावे व आंच बंद करावी. वाफ मुरल्यावर भात वाढावा. वरून ओले खोबरे व कोथिंबीर घालून उपयोगात आणावा. याबरोबर आमसुलाचे गोडसर ताक द्यावे.
टीपा: १. तांदूळ कोणत्याही प्रकारचा वापरता येतो.
२. कांदे शिजून कमी होत असल्याने जास्त घ्यावेत व जाड चिरावेत म्हणजे शिजून गाळ होत नाही.
३. काळी मिरीचा वापर तब्येतीस झेपेल त्याप्रमाणे करावा.
४. पाणी लागेल तसे थोडे थोडे घालावे.
५.यात गूळ, साखर घालू नये. कांद्याचा गोडसरपणा पुरतो.
६. आमसुलाचे गोडसर ताक करण्यासाठी, नेहमीप्रमाणे ताक करून घेणे. त्यात आमसूलाचे पाणी अथवा आगळ घालावे. आगळ गोड असल्याने साखर नाममात्र घालावी. फक्त आमसूलाचे पाणी /अर्क असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे. कोथिंबीर घालावी. मीठ, हिरवी मिरची, आले व एक लसणाची पाकळी यांचे वाटण घालून ताक तयार होते. त्यास फोडणी नाही.
पावसाळी हवेत या भाताचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेता येतो. एखाद्या पावसाळी संध्याकाळी, सौ. आई हा भात करीत असे.
