तिरंगा भात.

Tiranga Bhat

हा तिरंगा भात टोमॅटो भात, साधा पांढरा भात आणि पालक भात ह्यांच्या एकमेळातून (combination) बनविला आहे.

साहित्यः

तांदूळ ३ वाट्या
टोमॅटो ७-८ नग
पालक एक मोठी जुडी.
हिरव्या मिरच्या ३
काश्मिरी तिखट चवीनुसार.
कांदे ३ मोठे
लसूण पाकळ्या ७-८,
आलं २ इंच
कोथींबिर एक मुठ
मोहरी १ लहान चमचा (टीस्पून)
धणे पावडर १ मोठा चमचा (टेबलस्पून)
कसूरी मेथी एक लहान चमचा
मीठ चवीनुसार
खायचा सोडा चिमुटभर
तुप ३ डाव
काळीमीरी सजावटीसाठी.

आधी एका पातेल्यात पाणी तापत ठेवून ते उकळले की त्यात टोमॅटो टाका. २-३ मिनिटे टोमॅटो उकडून, उकळत्या पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यात टाका. त्याने टोमॅटोची साले निघतील. ती काढून टोमॅटोचा गर मिक्सर मधून काढून त्याची मुलायम पेस्ट करून घ्या.

त्याच पाण्यात पालकाची धुतलेली पाने टाका. अर्धा चमचा मीठ आणि चिमुटभर खायचा सोडा टाकून झाकण न ठेवता पालक शिजवून घ्या. पालक शिजला की तोही उकळत्या पाण्यातून काढून थंड पाण्यात टाका. नंतर रोळीत काढून निथळून घ्या आणि त्याचीही मुलायम पेस्ट बनवून घ्या.

कांदा, लसूण, आलं, कोथींबिर बारीक चिरून घ्या.
हिरव्या मिरच्या बारीक चिरुन घ्या.

भात मोकळा शिजवून घ्या. एका परातीत सर्व भात काढून जरा थंड होऊ द्या. त्या भाताचे एकूण ३ भाग करा.

कढईत एक डाव तुप घ्या. ते नीट तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की चिरून ठेवलेल्या पैकी अर्धे आले, लसूण, कांदा आणि कोथींबिर कढईत टाकून नीट परतून घ्या.

आलं-लसुणाचा मस्त खमंग वास आला की त्यावर टोमॅटोची मुलायम पेस्ट, काश्मीरी तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून परतत राहा. टोमॅटो पेस्ट नीट शिजून त्यातील पाणी आटून तुप सुटले पाहिजे. असे झाले की त्यावर एक भाग भात टाकून परतून, व्यवस्थित मिसळून घ्या. भात कुठेही पांढरा दिसता कामा नये. चव पाहून आवश्यकता असल्यास मीठ घाला. तुप कमी आहे असे वाटल्यास थोडे टाकून परता. भाताला छान पैकी चकाकी येईल. हा टोमॅटो भात कढईतून काढून ठेवा.

कढई धुवून, पुन्हा गॅसवर ठेवा. एक डाव तुप गरम करून त्यावर उरलेला कांदा, आलं-लसूण, हिरवी मिरची आणि कोथींबिर घालून आलं-लसुणाचा खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्या. आता त्यावर पालकाची मुलायम पेस्ट, धणे पावडर, कसूरी मेथी पावडर टाकून परता. पालकातील पाणी आटून तुप सुटले पाहिजे. तसे झाले की त्यात एक भाग भात टाकून परता. नीट मिसळा. भात कुठेही पांढरा दिसता कामा नये. आवश्यकता भासल्यास जरा तुप मिसळा. भात नीट मिसळाला गेला की काढून ठेवा.

पुन्हा एकदा (शेवटची) कढई धुवून घ्या. त्यात एक डाव तुप टाकून तापवा. तुप तापले की उरलेला भात त्यावर टाकून परतून घ्या. ह्या भाताला फक्त चकाकी आणायची आहे. ती आली की चवीनुसार मीठ घालून मिसळा आणि उतरवून ठेवा.

आता एका काचेच्या पसरट चौकोनी भांड्यात, तिन रंगांचे भात, भारतीय ध्वजाच्या स्वरुपात मांडून मधल्या पांढर्‍या भागावर काळीमीरीच्या साहाय्याने अशोकचक्राची नक्षी काढा.

हे काचेचे भांडे असेच्या असे जेवणाच्या टेबलावर ठेवा.

जयहिन्द.

शुभेच्छा....!