पहील्या भागाला दिलेल्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद.
पहिल्या भागातून
http://www.misalpav.com/node/20490
एवढे दमलो होतो की कसेबसे जेवण बनवले, जेवलो नि स्लीपिंग बॅग मध्ये शिरतानाच झोप लागली. झोपताना विचार केला की दिवसभरात आपली किती चाल झाली तर सकाळी ७ वाजता जीते गावापासून ते रात्री ८ वाजता घोळ गावापर्यंत एकूण १३ तासांचा ट्रेक झाला :).
सकाळी उठलो तेव्हा मस्त फ्रेश होतो आणी शाळेच्या बाहेर आलो तेव्हा कळले की घोळ गाव कसे वसले आहे
*****************************************************
जरी आदल्या दिवशी प्रचंड दमलेलो असलो तरी दुसर्या दिवशी भल्या पहाटेच जाग आली. शाळेच्या बाहेर आलो तेव्हा तोंडातून पहिलाच शब्द निघाला “वॉव्ह”....
समोरील डोंगररांगांच्या मागून सूर्योदय होत होता आणी त्याची पहीली किरणे घोळ गावावर पसरली होती. गावातले लोक थोडेसे कुतूहल मिश्रित नजरेने आमच्याकडे बघून आपापल्या कामाला जात होते. साधारण २५ ते ३० उंबर्याचे घोळ गाव हे दोन डोंगररांगांच्या मधल्या घळीत वसले आहे आणी गावात चौथीपर्यंत शाळा आहे. गावाच्या पाठीमागे कोकणदिव्याची रांग आणी समोर पानशेतची रांग आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा घोळपर्यंतच्या रस्त्याचे काम चालू होते आणी ते आता पूर्ण झाले आहे व माझ्या माहितीप्रमाणे सध्या स्वारगेटवरून संध्याकाळी घोळसाठी वस्तीची गाडी जाते.
समोर घोळ मधील शाळा व पाठीमागे घोळ गाव
काल जांच्याकडून जेवणासाठी लाकडे घेतली होती त्यांना पुढचा रस्ता विचारून ७ वाजता आम्ही घोळ गाव सोडले. आमचा पुढचा टप्पा होता गारजाईवाडी वाडी जी कोकणदिव्याच्या पायथ्याशी आहे. काल इतके चालून आल्यावर आता आम्हाला वाटले होते की पुढची वाटचाल सोपी नसली तरी कालच्यासारखी नसेल. पण तसे काही होणार नव्हते :(
गावातल्या लोकांनी सांगितले होते की गारजाईवाडी घोळ गावाच्या पाठीमागच्या डोंगराच्या पायथ्याला आहे पण तिथे जायला ५०० फुटाची दरी उतरून पुन्हा चढावी लागेल हे कळल्यावर आमची अवस्था अगदीच कठीण झाली. नशीब एवढेच होते की पूर्ण रस्ता जंगलातून होता त्यामुळे दमछाक कमी होणार होती.
गारजाईवाडीकडे जाणारा रस्ता
गारजाईवाडीकडे - समोरील दिसणार्या गवताच्या गंजीपाठीमागील जंगलात गारजाईवाडी वसली आहे.
घोळ गावाच्या पाठीमागची दरी उतरून चढल्यानंतर उजवीकडे वळून गारजाईवाडीकडे जायला लागते. वाटेत भाताची खाचरे लागतात. ही लागल्यानंतर आम्हाला वाटले की गारजाईवाडी जवळ आली पण कसचे काय आम्ही फक्त चालत होतो. घोळपासून साधारण अर्धातास चालल्यानंतर एक खिंड येते तिथे एक रस्ता डावीकडे जातो (हाच रस्ता पुढे ४ तासांच्या चालीने खानू गावात जातो व तेथुन बोचेघोळ नाळीने रायगड खोर्यात उतरता येते) व एक सरळ जातो. सरळ जाणारा रस्ता पुढे गारजाईवाडीकडे जातो. घोळ गावात आम्हाला ही खुण सांगितली होती पण आम्ही गप्पांच्या नादात ही खूण विसरलो आणी हे दोन्हीरस्ते सोडून तिसर्याच रस्त्याने पुढे गेलो. अजूनही हा रस्ता भाताच्या मळ्यांमधून पुढे एक दरी/घळीकडे जात होता पण तिथपर्यंत पोचल्यावर आम्हाला कळले की आम्ही रस्ता चुकलोय. मग काय आम्ही, दरीच्या काठावर पाठीमागे जंगल आणी गारजाईवाडी कुठच्या दिशेला आहे माहीत नाही अश्या कात्रीत सापडलो. शेवटी शोधाशोध करून परत आल्यारस्त्याने जायचे ठरवले. येताना गावावाल्यांच्या नावाने हाका मारत येत होतो तेव्हढ्यात खाली दरीतून एक प्रश्ण आला “कोण गाव?” हा डोंगरातील गावातला चिरपरीचीत प्रश्ण ऐकून आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. मग त्या गावावाल्यानेच आम्हाला वाडीपर्यंत रस्ता दाखवला.
आता गारजाईवाडीविषयी थोडेसे -
आतापर्यंतच्या एतक्या वर्षांच्या सह्याद्रीतील भटकंतीत अनेक अतिशय दुर्गम वाडी किंवा गावात भटकायला मिळाले. सह्याद्री कुशीतील अनेक वाड्या ह्या रस्त्यांपासून दूर व दुर्गम ठिकाणी वसलेल्या आहेत पण अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेल्या वाडीपैकी गारजाईवाडी नंबर बराच वरचा लागेल.
ह्या वाडीचे ठिकाण बघून आम्ही थक्क झालो. अत्यंत दुर्गम आणी वीज, रस्ता, शाळा, वैद्यकीय सुविधा ह्या सोयींचा अभाव आणी घनदाट जंगलातील अश्या ह्या २५ घरांच्या वाडीत अजूनही साधेपणाने जीवन जगणारी माणसे बघून आम्हाला भरून आले. कधीकाळी ह्यावाडीत ५० नांदती घरे होती पण काळाच्या रेट्याने सद्यस्थीतीला ह्यातील निम्मी बंद आहेत. जी चालू आहेत ती कधी बंद होतील ते सांगता येत नाही. सगळ्या घरांमधून एकही ४० वर्षे वयाच्या खालील माणूस नाही. आजूबाजूच्या उंचसखल पठारावरील पावसाळ्यातील पिकण्यार्या शेतीवर व शहरातून पाठवल्या जाणार्या मनीऑर्डरवर ह्या गावाची गुजराण होते.
ह्यावाडीतील गावातील लोकांना जवळचे गाव म्हणजे कोकणातील सांदोशी म्हणजे साध्या मीठ मिरचीसाठी पण २५०० हजार फुटाचा चढ उतार करायचा.
गारजाईवाडी
वरच्या फोटोतील गावाकर्याने आमच्याकडे प्रथमोपचाराच्या औषधाची मागणी केली व सांगितले की आठवड्यातून एकदा दापसर गावातून एक सरकारी डॉक्टर गावात तपासायला येतो. मधल्याकाळात कोणाला वैद्यकीय सुवीधेची गरज लागली तर दापसर पर्यंत चालत जायचे किंवा सगळा घाट उतरून कोकणात सांदोशीला उतरायचे :(
गावात पोचल्यानंतर साहजिकच पहीली विचारपूस झाली व "कोर्या" चहाची ऑफर करण्यात आली कारण गावात दुध नाही. आम्ही नम्रपणे नकार दिला व पुढची वाट विचारून घेतली. गावकर्यांच्या रोजच्या वाहिवाटेतील असलाने की काय कोण जाणे पुढची वाट मस्त मळलेली होती. ह्या वाटेने साधारण २० मिनिटे चालल्यानंतर आपण कोकणदिव्याच्या पायथ्याशी येतो येथे डावीकडे वळले तर कोकणदिव्यावर जाता येते व सरळ वाट कावळ्या घाटाने कोकणात सांदोशीला उतरते. आमच्या ओरिजनल प्लॅन मध्ये कोकणदिवा बघायचे पण होते पण आधीच वाडीपर्यंत रस्ता चुकल्याने आम्ही कोकणदिव्याला खालूनच वळसा मारून कावळ्या घाटाकडे निघालो.
कावळ्या घाटाकडे
कोकणदिवा पायथ्याकडून
घाट सुरु होईपर्यंत वाट सरळ व मळलेली आहे पण घाट सुरु झाल्यावर हीच वाट नागमोडी दगडगोट्यांची जंगलातील व प्रचंड उताराची होते. वाडीतील लोकांनी आम्हाला एक मोठ्या आंब्याची खुण सांगितली होती जिथे डावीकडे वळले की सांदोशीला जाता येते व उजवीकडे वळले की वाट भावले गावात उतरते. घाट उतरायला सुरु करून १ तास होउन गेलातरी तो आंबा काही येईना. आम्ही दगड गोट्यातून उतरतच होतो. वाटेत डोक्यावरून ओझे घेउन सांदोशीचा बाजार करून परत घरी वर चढणारी गारजाईवाडीतील माणसे भेटत होती पण कुणीही सांदोशीचे राहिलेले अंतर ३० मिनिटाच्या खाली आणेनात. मग मात्र आमचा धीर सुटला. एका गाववाल्याने तर सांदोशीचे अंतर किती राहिले विचारल्यावर “हे इथ २ मिनिटावर” सांगीतल्याला पण अर्धा तास झाला होता पण त्या गाववाल्याचे "२ मिनीटे" काय येईनात. शेवटी बराच उतार उतरल्यावर ते आंब्याचे झाड आले आणी अजून २० मिनिटे चालल्यावर सांदोशी गावाची घरे पण दिसायला लागली. पहिल्या प्लॅन प्रमाणे आम्ही १० वाजता सांदोशीला येण्यार्या गाडीने पाचाडला जाऊन पुढे रायगड चढणार होतो पण आम्हाला सांदोशी गावात उतरायलाच ११.०० वाजले आणी गाडी चुकली.
आंब्याच्या झाडाच्या इथून दिसणारा कोकण दिवा
सांदोशी गाव
सांदोशी गावातून रायगड दर्शन
सांदोशी गावातून दिसणारा कोकणदिवा (कोकणदिव्याच्या डाव्या उताराकडील पायथ्याच्या जंगलातील घळ म्हणजेच कावळ्या घाट)
कावळ्या घाट उतरताना रायगडचे समोरून जे दर्शन होते त्याला उपमा नाही. रायगडचे पुस्तकातून, फोटोग्राफीच्या प्रदर्शनातून जे चित्र मनात ठसले आहे त्यापेक्षा एकदम वेगळे व टकमकचे भेदकपण न जाणवणारे असे रायगड चे वेगळे रूप देखील मनाला भावते.
रायगड चहू बाजूंनी बघावाच हेच खरे.
गावात चौकशी केल्यावर कळले की पुढची गाडी ३ वाजताची आहे. ह्या गाडीसाठी थांबलोतर रायगडवारी चुकणार होती जे आम्हाला बिलकुल करायचे नव्हते. मग कळले की सांदोशीवरून अर्धा तास चालत गेलेतर छत्री-निजामपूर गाव लागेल व तिथे १.३० वाजता गाडी मिळेल मग आम्ही १२ वाजता सांदोशीवरून निजामपूरला निघालो (पुर्वीची महाड-रायगडवाडी गाडी आता छत्री-निजामपूर पर्यंत जाते). निजामपूरला जाताना वाटेत काळ नदीचे प्रचंड पात्र ओलांडायला लागते. साधारण २५-३० उंबर्याच्या निजामपूर गावाला शिवकालातील एका घटनेमुळे छत्री-निजामपूर असे नाव पडले. ह्या घटनेबद्दल जरी दुमत असले तरी गाव मात्र मस्त आहे यात दुमत नाही.
काळ नदीचे पात्र. माहीत नाही कसे ते पण फोटो काढताना थोडा गंडलाय :(
छत्री-निजामपूर गावाकडे जाताना
गावाच्या अगदी समोरच रायगडचा पहाड जो गावातून एका नजरेत मावत नाही. अगदी नाकासमोर टकमक टोक दिसते.
आपण नाट्यगृहात पहिल्या पाच रांगात बसावे आणी समोर भव्य बॅकड्रॉपचा पडदा असावा असा रायगड निजामपूर मधून दिसतो.
निजामपूर गावातून दिसणारा रायगड
गावात पोचल्यानंतर १.३० वाजेपर्यंत गाडीची वाट बघत थांबलो. थोडाजर वेळ हातात असेल तर गाडीची वाट न बघता निजापूर गावातून रायगडवाडीत चालत जायचे आणी तिथून चितदरवाजा गाठायचा. पण आमच्या हातात वेळ कमी होता त्यामुळे आम्ही गाडीने रोपवे पायथ्याला जाउन रोपवेने रायगड गाठायचे ठरवले.
निजामपूर गावातून रायगडवाडी कडे जाताना दिसणारे टकमक टोक
वाडीतून चितदरवाज्याकडे जाताना दिसणारा रायगड
२.३० वाजता जेव्हा रोपवे पायथ्याला उतरलो तेव्हा कळले की रोपवे साठी २ तासांचे वेटिंग आहे :( रायगड तर करायचाच होता त्यामुळे परत आम्ही चितदरवाज्यापाशी आलो. ३ वाजता रायगड चढायला सुरुवात केली आणी वरती पोचून राजदरबार, जगदीश्वराचे दर्शन घेउन परतीला निघालो तेव्हा ६.३० वाजले होते. गडावरच्या देशमुख हॉटेलमध्ये कळले होते की रायगडवरून महाडसाठी शेवटची ७.३० ची गाडी आहे. महादरवाज्यापाशी जेव्हा आलो तेव्हा पायथ्याच्या निजामपूर गावातून एस्टी परत निघालेली दिसली आणी शेवटचा उरलासुरला जोर काढून अक्षरश: धावत रायगड उतरायला सुरुवात केली. पायांनी कितीही कुरबुर केली तरी त्याकडे लक्ष न देता धावत जेव्हा चितदरवाज्यापाशी उतरलो तेव्हा ७.१५ झाले होते आणी गाडीचा रायगडवाडीतून चढ चढण्याचा आवाज येत होता. हुश्श करून बसतो न बसतो तोच गाडी आली आणी आम्ही महाडला रवाना झालो.
महाडवरून मुंबईला जरी परतायला पहाटेचे २ वाजले तरी पदरात पडलेल्या समाधानापुढे त्याचे कोणालाही काही वाटले नाही.
प्रचंड दमलेलो असूनही महाड ते मुंबई प्रवासात जेव्हा रायगडचा डोंगर रांगाकडे नजर गेली तेव्हा असे वाटले हा ट्रेक हा फक्त ट्रेक किंवा नुसती वाटचाल नव्हती तर ही सह्याद्रीच्या हाकेला दिलेली “ओ” होती.
असेच पुन्हा केव्हातरी पुढच्या ट्रेकला भेटूया.
धन्यवाद..
समाप्त.
*************************************************************
वरील सगळे फोटो माझ्या मोबाईल कॅमेराने काढले आहेत.