ईर्शाळा !

आता पर्यंत ईर्शाळ्याला तीनवेळा गेलो..

एक :: दर गणपतीला,मोहरमला,दिवाळीत आणी नववर्षाला आमच्याईकडं "उचलाउचली" व्हायची.ती नावापुरती असली तरी ते लॉक-अप मधले दोन तास लै जिवावर यायचे,आणी वर पोलीसांना दिवाळी किंवा ईतर सणाबद्दल फुकटचा बोनस भेटायचा तो वेगळाच.पण काही वर्षापुर्वी नागपुरचाळीतल्या सामान्य गुंडानी ह्या परंपरेला तडा द्यायच ठरवल आणी मग पळापळ झाली.कोणी गावाकडे तर कोणी पाहुण्यांकडे पळाल.पण आम्ही सगळीकडेच तोंड काळं केल्याने काय कराव ह्या विवंचनेत होतो.कातकरी समाजच्या प्रदीपदादांचे वडील येरवडा जेलमध्ये चतुर्थ श्रेणीतील कामगार होते आणी आमचे शेजारी होते.त्यांच्या गावी जायचे ठरले,ते गाव म्हणजे ईर्शाळा. गेलो तर खर पण ईर्शाळा सर नाही करु शकलो.ठाकर वाडी पर्यंत गेलो आणी तिथुन प्रबळगडात शिरलो.तथाकथीत आणी छुप्या ३५० पाण्याच्या टाक्या शोधायच्या होत्या.२२- एक सापडल्या पण ३५० काही शोधु शकलो नाही,तिथुन पुढे करवलींचा डोंगर पाहिला आणी त्याच्या अक्षरश प्रेमात पडलो.आणी त्याच प्रेमापायी,पावसाच्या रिपरिपीत,घनदाट जंगलात,दोन दिवस रस्ता शोधत फिरत राहिलो.मला रस्ता दाखविणार्‍या ,धनगराच्या हाताची, स्टोव्ह वर बनविलेली आणी रिमझिम पावसात चाखलेली, नाचणीच्या भाकरीची आणी गावरान लाल मिरचीच्या ठेच्याची चव अजुनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.

हाच तो ईर्शाळा !!

दोन ::: दुसर्‍यांदा गेलो तेव्हा सुळका सर करायचाच असे ठरविले होते.पण घसरुन ५० फुट खाली पडलो.डाव्या तळपायाला ७ टाके पडले आणी उजव्या पायाच्या गुडघा सटकला.पण त्यावेळी दिड-दिवस ठाकरवाडीत ज्या तर्‍हेने माझा ईलाज केला त्या बद्द्ल मी त्या ठाकरवाडीच शतशः ऋणी आहे.शिवाय त्यांनी जे मला बांबुच्या कामठ्याला सतंरजी गुंडाळुन खोपोलीच्या सरकारी ईस्पितळापर्यंत आणले ते उपकार वेगळेच !!

हिच ती २५ एक घरांची ठाकर वस्ती .

तीन ::चार वर्षांनी पुन्हा एकदा जायचा योग आला. का आला ह्या करता एक वेगळा भाग लिहावा लागेल, पण ह्या वेळी पण परत येताना मात्र आयुष्यभर आठवणीत राहील असा दिवस घेउन आलो.

प्रवास सुरु होते तो ईथे ...जाताना नेहमी प्रमाणे दर्शन....प्रती शिर्डी...शिरसगाव.

आणी मग एक स्टॉप उदरभरणासाठी...पनवेल फाट्याच्या अलीकडे..

मिसळ महत्त्वाची नाही पण अश्या चटण्यांनी नाष्टार्जनाला रंगत आणली..

प्रवासाची सुरुवात होते ती ईथुन..पनवेल खोपोली रोडवर एक १७-१८ कि.मीवर धरणाचा फाटा फुटला की डाव्या बाजुला डांबरी रस्ता संपेपर्यंत जायच आणी पहिले धरण परिसर न्याहाळायचा. शेजारीच १५ एक घरांची कातकरी वस्ती..

ह्या सदगृहस्थाचा फोटो ईथे देण्याचा मोह आवरत नाहीये...एका एम-८० वर एका आख्ख्या संसाराला पुरतील ईतकी भांडी घेउन हिंडायच...स्वताच दुकान टाकण्याईतपत ऐपत नाही..खोपोलीतुन गाडीवर अडकावयची आणी मारवाड्याला गल्ला आणुन द्यायचा...वरच कमीशन आणी पेट्रोल वर मात्र ह्याचा स्वताचा संसार....

वस्ती सोडली की जंगलात शिरायच..

जे वरतुन असे दिसते..

जाताना प्रदीपदादांनी एक डिंक-भुंगा पकडला..

सुरुवातीला उजवा डोंगर आणी मग डावा....पण फोटोकडे जरा व्यवस्थित बघा...माझ्याकडे नाही त्या डाव्या बाजुला सुळक्याकडे एखादी मानवी चेहर्‍याची प्रतिमा दिसतेय का ? हे ईर्शाळ्याला आहे,होय .एक चेहरा तर थेट हनुमानाच्या चेहर्‍यासारखा दिसतो...तो सुळका कुठुनही बघा...दिसतो म्हणजे दिसतोच

दुसरी ही पायवाट संपली

डोंगर चढायला सुरुवात केली आणी हळु-हळु धरण छोटे होत गेले..

वरुन दिसणारे सृष्टी-सौंदर्य..

डोगंरमाची पर्यंत पोहोचे पर्यंत छातीचा भाता झाला होता..आणी पायवाट ही नीटशी दिसत नव्हती पण ईर्शाळा मात्र एकदम स्पष्ट...

आणी ठाकर वस्तीला वळसा घालुन सुळक्याकडे निघालो...वरच्या चित्रात एक कातळाला पडलेल नेढं लक्षात ठेवा..त्यात पंधराजण तरी बसु शकतात..

टेकाडाला रिंगण घालुन सुळक्यापर्यंत जात येत .एखादा ९ नंबरचा शुज आडवा केला की जितकी जागा होईल तितक्याच जागेईतकी पायवाट ...

ईथवर रस्ता संपतो आणी चढाईला सुरुवात होते..

आणी शेवटी शिडी सापडली ...

आणी पाणी ही....ईथे आणी वरच्या सुळक्यावर दोन टाक्या आहेत . ..वरती साचलेले शेवाळ नाही...कसलीतरी पानं आहे ..हे पाणी ईथे १२ महिने असते...आणी पिण्याजोगते,,

टाकीशेजारी असलेल औदुबंराच झाड्...आणी लांबवर जो दुसरा सुळका दिसतोय तो कर्नाळा..

योगेशने मंदीराची साफसफाई केली ..त्याचा जो पाय खाली गेलाय ..तिथुनच मी खाली पडलो होतो...पावसामुळे निसरड झालत.

ईथुन साधारण १५-२० फुट वर सरळ चढ्ण आहे..पण एकावेळेस एकजण जाउ शकतो..आणी पहिला वर गेला की त्याने दुसर्‍याला आवाज द्यायचा..त्यामुळे फोटोज नाही काढता आले ..पण वर ..हेच ते नेढं

ही वरची टाकी..एखाद्या ईंटेरियर डिझायनरने बनवावी तशी...एक वर्तुळाकार टाकीच्या मधोमध खांब बसविला...मागच्या कातळाला नेढं आहे नेढातुन सुर्यप्रकाश थेट टाकीच्या पाण्यात शेजारी औंदुबराच झाड्..पण एकावेळेस एक माणुस थांबु शकेल ईतकीच शेजारी जागा..

नावं बघुन गडबडु नका...ठाकर गड्याच लग्न झाल की ठाकर गडी,गडणी आणी पुर्ण परिवाराला ईथे ह्या जागी याव लागत्..सासु सासर्‍यासकट्...पुर्वीच्या काळी ईथे काहीतरी दगडाने कोरायचे ..पण आता सुशिक्षीत झाल्याने नावे टाकतात ..ईथे पाच माणसांच्या वर लोक उभे राहु शकत नाही...पण प्रदीपदादानी सांगीतले की ईथे एक आख्खा उत्सव होतो...मला विश्वास बसला नाही..पण प्रदीपदादा मात्र ठाम होता...

शेवटी खाली आलो...संध्याकाळी प्रदीपदादाकडे जेवलो..अ‍ॅन्ड रिटर्न टु पुणे..

हे असेच काहीसे..

एक ठाकर आणी ठाकर वाडीतील घरे.

एक ठाकर आणी प्रबळगड

ही कातकर्‍यांची वस्ती