अलख

हा अलख कुणा जोग्याचा
ही गहन कुणाची वाणी
प्राणांच्या कंठी रुजली
संध्यापर्वाची गाणी

झाकोळुन नभ गंगेच्या
पाण्यात उतरले थोडे
क्षितिजाच्या पार निघाले
अन् सूर्यरथाचे घोडे

या मूक उदास जलावर
धूसर वलये वाटोळी
रेखाटत बसली कुठल्या
कवितेच्या अनवट ओळी?

ज्या सांद्र वनातुन घुमले
अस्वस्थ क्षणांचे पावे
ते वन सोडून निघाले
अज्ञात दिशेला रावे

ढळत्या सांजेच्या पदरी
अस्फुटसा लुकलुक तारा
परतून चालला जोगी
अन् अलख घुमवितो वारा

footer